आजारी जनावरे रोगवाहक म्हणूनही काम करू शकतात, ज्यामुळे भविष्यात आजाराचा प्रादुर्भाव लवकर दिसून येऊ शकतो. हे लक्षात घेऊन पशुतज्ज्ञांकडून शिफारशीत कालावधीत लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. आजारपणामुळे जनावरांच्या दूध उत्पादनावर परिणाम होतो. तसेच, त्यांची प्रतिकारशक्ती कमी होते, त्यामुळे पुढील काळातील दुग्धोत्पादनावर परिणाम होतो. जनावरांना जिवाणू आणि विषाणूंच्या प्रादुर्भावामुळे आजार होतात.
संसर्गजन्य आजारांपासून जनावरांचे संरक्षण करणे गरजेचे आहे. आजारी जनावरे रोगवाहक म्हणूनही काम करू शकतात. ज्यामुळे भविष्यात आजाराचा प्रादुर्भाव लवकर दिसून येतो. अशा जनावरांच्या औषधोपचारावर खर्चही वाढतो. जनावरांमध्ये लाळ्या खुरकूत, फऱ्या, घटसर्प, संसर्गजन्य गर्भपात, काळपुळी व पिसाळणे हे संसर्गजन्य आजार आहेत. हे आजार जिवाणूजन्य व विषाणूजन्य अशा प्रकारात मोडतात. हे आजार जनावरांना होऊ नयेत यासाठी त्यांना ठरावीक कालावधीत, आवश्यक मात्रेमध्ये पशुतज्ज्ञांकडून लसीकरण करून घेणे आवश्यक आहे. पशुतज्ज्ञांनी लसीकरणाची माहिती गावातील सर्व पशुपालकांना द्यावी, जेणेकरून सर्व जनावरांना एकाच वेळी लस मात्रा देणे सोपे होईल. लस देण्यापूर्वी कमीतकमी एक आठवडा आधी जंतनाशक द्यावे, जेणेकरून जनावरावरील ताण कमी होईल. लसीकरणाचा योग्य परिणाम होतो. गावातील सर्व जनावरांचे लसीकरण एकाच दिवशी करावे. लसीकरण करताना घ्यावयाची काळजी
पशुतज्ज्ञाच्या सूचनेनुसार लसीकरण सकाळी किंवा संध्याकाळी थंड वातावरणात करावे. थंड वातावरणात लसीची शीत साखळी अबाधित राखण्यास मदत होते. जनावरांना दिलेल्या लसीची नोंद ठेवावी. लसीकरणानंतर लगेच जनावरांना लांब पल्ल्याची वाहतूक किंवा अतिश्रमाची कामे करायला लावू नयेत. यामुळे जनावरांवर अतिरिक्त ताण येऊन लसीमुळे निर्माण होणाऱ्या प्रतिकारशक्तीवर विपरीत परिणाम होऊ शकतो. लस मात्रा देण्यासाठी वापरण्यात येणारी सुई प्रत्येक जनावरासाठी वेगळी वापरावी. लसीकरण केल्यानंतर काही वेळा जनावरांच्या अंगावर गाठी येणे किंवा ताप येणे अशा तात्पुरत्या स्वरूपाच्या तक्रारी उद्भवू शकतात, त्यासाठी पशुवैद्यकाच्या संपर्कात राहावे. त्यांच्या मार्गदर्शनाने पुढील उपाय करावेत. गाठ येते किंवा ताप येतो म्हणून लसीकरण टाळू नये. अशा गाठीमुळे जनावरांच्या जीवाला काही धोका होत नाही, त्यामुळे न घाबरता लसीकरण करून घ्यावे. लसीकरण केल्याने जनावरे गाभडण्याची लक्षणे दिसतात, असे काही पशुपालकांचे म्हणणे असते. लसीकरणाने जनावरे गाभडत नाहीत. मुळात गाभडण्यामागे जनावरातील प्रतिकारशक्ती व इतर असंसार्गिक व पोषणाशी संबंधित कारणे असू शकतात. अशावेळी आपल्या जनावरांची अगोदरच शारीरिक तपासणी करून घेणे उपयुक्त ठरते. गाभण जनावरांना शेवटच्या तीन महिन्यांत लसीकरण केल्यास अतिरिक्त ताणामुळे गाभडण्याची लक्षणे दाखवू शकतात. अशावेळी पशुतज्ज्ञांच्या सल्ल्याने लसीकरण करावे की नाही हे ठरवावे. लसीकरणानंतर दूध कमी होते असे काही पशुपालक सांगतात. लसीकरण केल्यामुळे येणाऱ्या ताणामुळे काहीवेळा दूध उत्पादन कमी होऊ शकते; परंतु ते तात्कालिक असते. त्यामुळे या कारणासाठी लसीकरण टाळू नये. दूध उत्पादन कमी होण्यापेक्षा सांसर्गिक आजाराने जनावरांचे होणारे नुकसान जास्त असते. कोणत्याही आजाराची लस जनावरांना तो आजार होण्यापूर्वी किमान २१ दिवस आधी देणे गरजेचे आहे. हा वेळ त्या आजारासाठी शरीरात प्रतिकारशक्ती तयार होण्यास लागत असतो. म्हणून योग्य नियोजन करणे गरजेचे आहे. आजाराचा प्रादुर्भाव झाल्यानंतर घाईघाईत लसीकरण करू नये. यासाठी पशुसंवर्धन विभागाने दिलेल्या वेळापत्रकानुसार लसीकरण करून घ्यावे. संपूर्ण काळजीपूर्वक लसीकरण केले तरीही जनावरांच्या आरोग्यावर काही विपरीत परिणाम दिसत असतील तर तशी माहिती तत्काळ आपल्या पशुतज्ज्ञांना द्यावी. त्यांच्या सूचनेनुसारच पुढील खात्रीलायक उपचार आणि प्रतिबंधात्मक कार्यवाही करावी. संपर्कः ०२०-२५६९७९६२ (लेखक पशुसंवर्धन विभाग, पुणे येथे कार्यरत आहेत.)