पावणेतीन लाख हेक्‍टरला ‘जलयुक्त’चा फायदा

जलयुक्त शिवार
जलयुक्त शिवार

नगर ः जलयुक्त शिवार अभियानातून गेल्या दोन वर्षात झालेल्या कामामुळे नगर जिल्ह्यामध्ये सुमारे दोन लाख सत्तर हजार हेक्‍टर क्षेत्राला लाभ देण्याएवढे जास्तीचे पाणी उपलब्ध झाले आहे. दोन वर्षात २४ हजार ५७१ कामे पूर्ण झाली असून, त्यावर तब्बल पावणेचारशे कोटी रुपये खर्च झाले आहेत. जलयुक्तमुळे पाणी साठा वाढला असल्याचे जिल्हा प्रशासन सांगत आहे. टंचाईशी सामना करणाऱ्या गावांत शाश्‍वत पाणी उपलब्ध व्हावे यासाठी शासनाने तीन वर्षापासून सिंचनाशी सबंधित विविध योजना एकत्र करून "जलयुक्त शिवार अभियान'' सुरू केले. सातत्याने टॅंकरने पाणीपुरवठा करण्यासह दुष्काळाशी सामना करणाऱ्या गावांची या योजनेसाठी निवड केली. क्षेत्रफळाने मोठा असलेल्या आणि गावांची संख्याही अधिक असलेल्या नगर जिल्ह्यामध्ये पहिल्या वर्षी २७९, दुसऱ्या वर्षी २६८, तिसऱ्या २४१ गावांची निवड केली. मंजुरीनंतर दोन वर्षे काम पूर्ण करण्याचा नियम असल्याने आतापर्यंत पहिल्या दोन वर्षात निवडलेल्या गावांतील कामे पूर्ण करण्यावर भर दिला आहे.  पहिल्या वर्षीच्या सगळ्या गावांतील (२०१५-१६) सर्व १४ हजार ६४८ कामे पूर्ण झालेली असून त्यावर २०६ कोटी ७९ लाख रुपये खर्च झाले आहेत. दुसऱ्या वर्षीची (२०१६-१७) कामे पूर्ण करण्यावर प्रशासनाने भर दिला. त्यावर्षी ९ हजार नऊशे तेवीस कामे मंजूर झाली होती. या मार्च अखेरपर्यंत त्यातील ४० कामे शिल्लक होती. ती पूर्ण करण्याला मुदतवाढ मिळाली आहे. दुसऱ्या वर्षाच्या कामांवर १६८ कोटी ३२ लाख रुपये खर्च झाले आहेत. अभियानात तिसऱ्या वर्षी (२०१७-१८) २४१ गावे निवडलेली असून साडेआठ हजार कामे मंजूर आहेत. त्या कामाला मात्र अजून गती आलेली नाही. यंदा (२०१८-१९) चौथ्या वर्षी अपात्र गावे वगळता सर्व राहिलेली २४८ गावे अभियानात निवडली आहेत. अभियानातून कामे करतानाच लोकसहभाग वाढीवरही नूतन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी आणि जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी पंडित लोणारे यांनी भर दिला आहे.  पहिल्या दोन वर्षात झालेल्या कामांमुळे १ लाख ३९ हजार ७२५ टीसीएम पाणी उपलब्ध झाल्याने चब्बल एक लाख सत्तर हजार हेक्‍टरला फायदा झाला आहे. जलयुक्तच्या कामांमुळे पाणी टंचाईची तीव्रताही अत्यंत कमी आहे. कोपरगाव, राहाता, राहुरीसह दुष्काळी पारनेर, शेवगाव, पाथर्डी, जामखेड, श्रीगोंदा, कर्जत भागातही काही ठिकाणी उन्हाळी पिके घेतली आहेत. दोन वर्षात सतराशे तलावातील गाळ काढला असून त्यातून सात हजार पाचशे ४२ टीसीएम अतिरिक्त पाणी उपलब्ध झाले असल्याचे सांगण्यात आले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com