नगर ः ‘‘महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना अटी-शर्तींविना आहे. ही ‘आधार’ आधारित योजना आहे. योजनेसाठी कुठलाही अर्ज करण्याची शेतकऱ्यांना गरज नाही. मात्र, जिल्ह्यातील बहुतांश शेतकऱ्यांचे आधार क्रमांक, मोबाईल क्रमांक बॅंका, विविध कार्यकारी सेवा सहकारी सोसायट्यांमध्ये अद्ययावत नाहीत. अशा शेतकऱ्यांनी मंगळवारपर्यंत (ता. ७) संबंधित बॅंका, सोसायट्यांमध्ये जाऊन आधार अद्ययावत करावे,’’ असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल द्विवेदी, जिल्हा उपनिबंधक दिग्विजय आहेर यांनी केले.
योजनेत ज्या शेतकऱ्यांचे कर्ज मुद्दल व व्याजासह दोन लाखांपेक्षा एक रुपयाही जास्त असेल, त्यांना कर्जमुक्तीचा लाभ मिळणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी (ता. २) झालेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती देण्यात आली. जिल्हा विशेष लेखापरीक्षक राजेंद्र निकम, जिल्हा सहकारी बॅंकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रावसाहेब वर्पे, अग्रणी बॅंकेचे जिल्हा प्रबंधक संदीप वालावलकर आदी उपस्थित होते.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हिवाळी अधिवेशनात कर्जमाफीची घोषणा केली. त्यानुसार एक एप्रिल २०१५ ते ३० सप्टेंबर २०१९ या काळात मुद्दल व व्याजासह थकीत असलेले व परतफेड न झालेले दोन लाख रुपयांपर्यंतचे कर्ज माफ करण्यात आले.
याबाबत जिल्हाधिकारी म्हणाले, ‘‘कर्जमाफीसाठी दोन लाखांपर्यंतच्या थकीत रकमेचे कर्जदार शेतकरी पात्र ठरणार आहेत. पात्र लाभार्थींना योजनेचा लाभ मिळावा, यासाठी शेतकऱ्यांचे आधार क्रमांक व मोबाईल क्रमांक यांची माहिती घेण्याचे काम सहकार विभागातर्फे सुरू आहे.’’
श्री. आहेर म्हणाले, ‘‘जिल्ह्यात १४०० विविध कार्यकारी सेवा संस्था आहेत. त्यापैकी ९०० संस्थांचे कामकाज संगणकीकृत झाले आहे. उर्वरित संस्था संगणकीकृत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांनी योग्य ती दक्षता घ्यावी. आधार क्रमांकाची माहिती संबंधित संस्थेकडे जमा करावी.’’
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.