हवामान अनुकूल रुंद वरंबा सरी तंत्रज्ञान

बदलत्या हवामानामध्ये राज्यातील प्रमुख पिकांसाठी रुंद वरंबा सरी (Broad Bed Furrow) हे तंत्रज्ञान प्रभावी दिसून आले आहे. या अवलंब करणाऱ्या शेतकऱ्यांना हवामानातील लहरीपणामुळे तौलनिक रित्या कमी नुकसान सहन करावे लागले.
 broad bed furrow method
broad bed furrow method

बदलत्या हवामानामध्ये राज्यातील प्रमुख पिकांसाठी रुंद वरंबा सरी (Broad Bed Furrow) हे तंत्रज्ञान प्रभावी दिसून आले आहे. या अवलंब करणाऱ्या शेतकऱ्यांना हवामानातील लहरीपणामुळे तौलनिक रित्या कमी नुकसान सहन करावे लागले. राज्यातील औरंगाबाद, बीड, जालना, जळगाव, लातूर. उस्मानाबाद, परभणी, हिंगोली, नांदेड, अकोला, अमरावती, बुलढाणा, वाशीम, वर्धा आणि यवतमाळ या १५ जिल्ह्यामधील ५१४२ गावामध्ये नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राबविण्यात येत आहे. त्या अंतर्गत शेतकऱ्यांना बदलत्या हवामानाशी जुळवून घेण्यासाठी हवामान अनुकूल तंत्रज्ञानाचा अवलंब करण्यास प्रवृत्त करण्यात येत आहे. बदलत्या हवामानामध्ये राज्यातील प्रमुख पिकांसाठी रुंद वरंबा सरी (Broad Bed Furrow) हे तंत्रज्ञान प्रभावी दिसून आले आहे. या अवलंब करणाऱ्या शेतकऱ्यांना हवामानातील लहरीपणामुळे तौलनिक रित्या कमी नुकसान सहन करावे लागले. त्यांच्या उत्पादनामध्ये वाढ दिसून आली आहे. २०१८ मध्ये प्रकल्पाच्या अंमलबजावणी सुरुवात झाल्यानंतरच्या सलग दोन्ही खरीप हंगामामध्ये सरासरी २१-२५ दिवसांचा पावसामध्ये खंड पडला होता. अशा परिस्थितीत ज्या शेतकऱ्यांनी पेरणीसाठी रुंद वरंबा सरी (बीबीएफ) तंत्रज्ञान अवलंब केला होता, त्यात पावसातील खंड काळातही पिकांवर प्रतिकूल परिणाम जाणवला नाही. या पद्धतीने गादीवाफ्यावर पेरणी न केलेल्या पिकांना जमिनीतील ओलाव्याच्या कमतरतेचा मोठा ताण आला. त्यांच्या उत्पादनात कमालीची घट आढळून आली. याशिवाय खरिपानंतर जमिनीतील ओलाव्यावर रब्बी हंगामात हरभरा या पिकाची पेरणी केली जाते, तिथेही रुंद वरंबा सरी (बीबीएफ) तंत्राने पेरलेल्या पिकाची वाढ तौलनिकरित्या अधिक जोमाने झाल्याचे दिसून आले. खारपान पट्ट्यातील गावांतील शेतीसाठी हे तंत्रज्ञान विशेष फायद्याचे आढळून आले आहे. सन २०२० मध्ये मोठी मोहीम प्रकल्पांतर्गत प्रत्येक गावातील शेतकऱ्यांपर्यंत रुंद वरंबा सरी (बीबीएफ) हे तंत्रज्ञान पोहोचविण्यासाठी शेतीशाळा, प्रशिक्षण, अभ्यास दौरे, कार्यशाळा, तांत्रिक साहित्य इ. माध्यमातून प्रसार करण्यात येत आहे. शेतीशाळा या माध्यमातून सन २०१९-२० मध्ये काही गावांमध्ये रुंद वरंबा सरी या पद्धतीने बीबीएफ यंत्राने पेरणी केली होती. यावेळी तंत्रज्ञान वापरताना शेतकरी आणि क्षेत्रीय कर्मचाऱ्यांना येणाऱ्या अडचणींचा अभ्यास करण्यात आला. त्यात प्रामुख्याने बीबीएफ यंत्राची उपलब्धता कमी असणे, बीबीएफ यंत्राची जोडणी आणि यंत्र वापरण्याच्या कौशल्याचा अभाव, बीबीएफ यंत्राची बाजारातील किंमत, यंत्राची देखभाल इ. बाबी समोर आल्या. या तंत्राची उपयुक्तता लक्षात घेता त्याचा अवलंब वाढवणे क्रमप्राप्त आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना जाणवणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी आणखी काही उपक्रम प्रकल्पामध्ये समाविष्ट केले गेले. क्षेत्रीय कर्मचाऱ्यांची कौशल्यवृद्धी प्रकल्पाचा गावातील चेहरा म्हणजे कृषी सहाय्यक, समूह सहाय्यक आणि शेतीशाळा प्रशिक्षक. या तिघांच्याही बीबीएफ तंत्राविषयी क्षमता बांधणीसाठी जिल्हा आणि उपविभाग स्तरावर अनुभवी अधिकाऱ्यांच्या, कृषी विद्यापीठ/ कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांच्या साह्याने प्रशिक्षण व कार्यशाळा घेण्यात आल्या. ही प्रक्रिया निरंतर सुरूच आहे. यातून काही क्षेत्रीय कर्मचाऱ्यांच्या कौशल्यामध्ये चांगलीच सुधारणा दिसून आली. शेतकऱ्याकडून शेतकऱ्याला प्रशिक्षण प्रकल्प गावामध्येच शेतकऱ्यांना बीबीएफ तंत्राचे आणि यंत्राचे प्रशिक्षण देण्यासाठी “ शेतकऱ्याकडून शेतकऱ्याला” ही प्रशिक्षणाची संकल्पना राबविण्यात येत आहे. यासाठी वाशिमचे शेतीनिष्ठ शेतकरी दिलीप फुके (संपर्क- ९९२२०१०३९९) यांच्या प्रमुख मार्गदर्शनाखाली शेतकरी प्रशिक्षकांचा चमू तयार करण्यात आला आहे. त्यांच्या प्रेरणेने वर्धा, यवतमाळ, बुलढाणा आणि इतरही जिल्ह्यामध्ये अनुभवी शेतकरी प्रशिक्षण देण्यासाठी पुढे येत आहेत. पुढील वर्षभरात १०० बीबीएफ प्रशिक्षक शेतकरी तयार करण्याचे ध्येय ठेवण्यात आले आहे. यावर्षी खरीप हंगामपूर्व कोरोनामुळे मर्यादा आल्या असताना योग्य त्या सुरक्षा पाळून प्रकल्प गावामध्ये बीबीएफ यंत्राने प्रत्यक्ष पेरणीचे प्रशिक्षण देण्यात आले. बीबीएफ शेतीशाळा प्रकल्पाच्या प्रत्येक गावामध्ये त्या गावातील प्रमुख पिकाची शेतीशाळा घेण्यात येते. सहभागी शेतकऱ्यांना बीबीएफ तंत्र आणि यंत्राबद्दल प्रात्यक्षिकासह सखोल माहिती दिली जाते. बहुतांशी गावामध्ये खरिपात सोयाबीन आणि रब्बी हंगामात हरभरा पिकाची पेरणी केली जाते. बीबीएफ तंत्राने पेरणी केल्यास होणाऱ्या फायद्याची प्रत्यक्ष शेतावरच माहिती करून दिली जाते. घेतली जाते.यामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढण्यास मदत होते. बीबीएफ प्लॉट आणि नियंत्रित प्लॉट यामधील वाढीच्या काळातील फरक, उत्पादनातील फरक आणि उत्पादन खर्चातील फरकच सर्व काही सांगून जातो. बीबीएफ यंत्रांची नोंद ऐन पेरणीच्या वेळी सर्वांना यंत्राची उपलब्धता व्हावी, या उद्देशाने गावामध्ये किंवा परिसरामध्ये ज्यांच्याकडे बीबीएफ यंत्र उपलब्ध आहे, त्यांची माहिती घेण्यात आली आहे. ही माहिती नुकतीच प्रकल्पाच्या शेतीशाळा अॅपमध्ये भरण्याची सुविधा केली आहे. यामध्ये संबधित गावाचे कृषी साहाय्यक/ समूह साहाय्यक/शेतीशाळा प्रशिक्षक हे बीबीएफ यंत्र असलेल्या ट्रॅक्टरधारकांची मोबाईल क्रमांकासह नोंद करता येते. यामुळे सर्व शेतकऱ्यांना त्यांना संपर्क साधणे सोपे होते. बीबीएफ खरेदीसाठी अर्थसाहाय्य प्रकल्प क्षेत्रामध्ये बीबीएफ यंत्रांची वाढती मागणी लक्षात घेऊन प्रकल्प गावातील वैयक्तिक शेतकऱ्यांना बीबीएफ खरेदीसाठी ६० टक्के अर्थसाहाय्य उपलब्ध करण्यात आलेले आहे. बीबीएफ बँक शेतकरी गट/ महिला गट किंवा शेतकरी उत्पादक कंपनीने भाडेतत्त्वावर बीबीएफ यंत्राच्या सेवा उपलब्ध द्याव्यात, यासाठी प्रयत्न करण्यात आले. त्यामध्ये दोघांचाही म्हणजे शेतकऱ्याचा आणि गटाचा फायदा आहे. प्रकल्प गावामध्ये अशा इच्छुक गटास किंवा शेतकरी कंपनीस औजारे बँकेसाठी ६० टक्के अर्थसाहाय्य देण्यात येत आहे. अशा गटांनी आणि प्रकल्प जिल्ह्यातील कोणत्याही शेतकरी उत्पादक कंपनीने केवळ बीबीएफ यंत्रांची बँक निर्माण केल्यास त्यांनाही त्यांचे प्रकल्प खर्चाच्या ६० टक्क्यांपर्यंत अर्थसाहाय्य देण्याचे प्रकल्पाचे धोरण आहे. बीबीएफ तंत्रज्ञानामुळे अपेक्षित आर्थिक फायदे प्रकल्प क्षेत्रामधील ५ हजार गावांमध्ये सुमारे ८ लाख हेक्टर क्षेत्रावर सोयाबीनची आणि २.६ लाख हेक्टर क्षेत्रावर हरभरा पिकाची पेरणी केली जाते. यांपैकी केवळ १० टक्के क्षेत्रावरील पेरण्या बीबीएफ तंत्राने केल्या तरी एकूण उत्पादनामध्ये सोयाबीन सुमारे १ लाख टन तर हरभऱ्याचे सुमारे ३० हजार टन उत्पादन वाढेल. त्यातून रु. ६६ कोटी इतका आर्थिक फायदा होऊ शकतो. खर्चामध्ये १५-२० टक्के बचत होईल. या गावांमधील शेतकऱ्यांची रु.२१ कोटी इतकी बचत होऊ शकते. बीबीएफ पेरणीची आत्ताची काही उदाहरणे चालू खरीप हंगामात प्रकल्प गावामध्ये काही शेतकऱ्यांनी मोठ्या क्षेत्रावर सोयाबीनची पेरणी केली आहे.

  • समीर सुरजसिंग गहिरवार, नंदपूर ता.समुद्रपूर,जि.वर्धा यांनी ४० एकर क्षेत्रावर सोयाबीन
  • कृष्णा बर्दापुरे, रायवाडी, ता. लातूर यांनी २२ एकर क्षेत्रावर सोयाबीन.
  • त्याच्या अनुभवातून अन्य शेतकरीही प्रेरित होतील, यात शंका नाही.
  • संपर्क- विजय कोळेकर, ९४२२४९५४९७ (कृषिविद्यावेत्ता, नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प, मुंबई.)

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com