'पुणे पाना'ला २५ कोटींचा फटका; उत्पादक त्रस्त

पुणे ः लॉकडाऊनमुळे खाण्यासाठी लागणाऱ्या नागवेलीच्या पानांचे उत्पादन करणाऱ्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे 25 कोटींहून अधिक नुकसान झाले आहे. परिणामी शेतकरी हतबल झाले असून शासनाकडे नुकसानभरपाईची मागणी करत आहेत.
पानमळा उत्पादकांना २५ कोटींचा फटका
पानमळा उत्पादकांना २५ कोटींचा फटका

पुणे  ः लॉकडाऊनमुळे खाण्यासाठी लागणाऱ्या नागवेलीच्या पानांचे उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. गेल्या वीस ते पंचवीस दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील पानाचे बाजार बंद असल्याने पाने तोडून बांधावर फेकून देण्याची वेळ शेतकऱ्यांवर आली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांचे 25 कोटींहून अधिक नुकसान झाले आहे. परिणामी शेतकरी हतबल झाले असून शासनाकडे नुकसानभरपाईची मागणी करत आहेत.

पुणे जिल्ह्यात 500 ते 600 शेतकऱ्यांनी साडे तीनशे एकरहून अधिक क्षेत्रावर पानमळे उभारले आहेत. पुणे जिल्हयात इंदापूर तालुका हा पान उत्पादनात अग्रेसर आहे. पानाला आयुर्वेदात खूप महत्व असले तरी जीवनाश्यक वस्तूमध्ये त्याचा समावेश नाही. त्यामुळे लॉकडाऊनमध्ये पानांच्या विक्री होत नसल्याने पानमळा उत्पादक शेतकरी हतबल झाले आहेत. पान उत्पादक शेतकऱ्याला सहा ते सात लाखांपर्यंत फटका बसत आहे. जिल्ह्याचा विचार करता शेतकऱ्यांचे २५ कोटींचे नुकसान झाले आहे.

इंदापूर तालुक्यात निमगाव केतकी परिसरसह, उजनी बॅक वॉटरच्या परिसरात सुमारे 300 एकरहून अधिक क्षेत्रावर पानमळे उभारलेले आहेत. त्यातच संचारबंदीच्या पार्श्वभूमीवर दीडशे वर्षात पहिल्यांदाच निमगाव केतकी येथील पान बाजार बंद पडला आहे. मागील वीस ते पंचवीस दिवसांपूर्वी दर आठवड्याला बाराशे ते पंधराशे डागाची (सहा हजार पानाचा एक डाग) आवक बाजारात होती. कळीच्या डागाला तीन हजार रूपयांपर्यत तर फपड्याच्या डागाला पाच हजार रूपयांपर्यंत दर होता. उन्हाळी हंगामात विड्याच्या पानाला पान टपरीवर मोठी मागणी असून दरातही चांगली वाढ झालेली असते.

येथील पानाची प्रामुख्याने पुणे, मुंबई, श्रीरामपूर, बार्शी, पंढरपूर, फलटण तसेच राजकोट येथे मोठी विक्री होते. अनेक व्यापारी निमगाव केतकी येथे येऊन पानाची खरेदी करतात. मात्र, कोरोनामुळे पानटपऱ्या बंद असल्यामुळे पान उत्पादक शेतकऱ्यांचे मोठे नुकसान होत आहे. त्यामुळे पान उत्पादक शेतकरी चांगलाच अडचणीत आला आहे.

गोरख बळीराम आदलिंग म्हणाले, कि पंधरा ते वीस दिवसांपासून बाजार बंद आहे. अजून तो कधी चालू होईल याचीही शाश्वती नाही. त्यामुळे या हंगामात सुमारे वीस कोटींहून अधिक नुकसान होणार आहे. संचारबंदी लांबल्याने मोठे शेतकरी पदरमोड करून पाने खुडून फेकून देतील व उतरण करतील. पण छोट्या शेतकऱ्यांना मळा बंद केल्याशिवाय पर्याय नाही. शासनाने त्यांच्या विक्रीसाठी पुढाकार घेऊन मार्ग काढला तर पानमळे टिकतील, अन्यथा हे पानमळे उद्धस्त झाल्याशिवाय राहणार नाहि. त्यामुळे सरकारने किमान नुकसान भरपाई द्यावी, अशी आमची मागणी आहे. ----प्रतिक्रिया--- पाने चांगली आली होती. अर्ध्या एकराला दीड लाख रूपये खर्च केला आहे. परंतु कोरोनामुळे बाजार बंद असल्याने पाने खुडून बांधावर फेकून द्यावी लागत आहे. पुन्हा उत्पादन घेण्यासाठी एक ते दीड लाख रूपयांचा खर्च असून तो कुठून आणायचा असा प्रश्न पडला आहे. - दाजीराम तात्याबा शेंडे, निमगाव केतकी, जि. पुणे

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com