सुपारी फळगळीचे संकट

मुसळधार झालेला पाऊस आणि सतत ढगाळ वातावरण यामुळे जिल्ह्यातील सुपारी बागांना फळगळीने ग्रासले आहे. परिपक्व होण्याआधीच सुपारीची फळे गळून पडत असून बागांमध्ये फळांचा खच साचला आहे.
सुपारी संग्रहित आणि प्रातिनिधीक छायाचित्र
सुपारी संग्रहित आणि प्रातिनिधीक छायाचित्र

सिंधुदुर्ग: मुसळधार झालेला पाऊस आणि सतत ढगाळ वातावरण यामुळे जिल्ह्यातील सुपारी बागांना फळगळीने ग्रासले आहे. परिपक्व होण्याआधीच सुपारीची फळे गळून पडत असून बागांमध्ये फळांचा खच साचला आहे. सलग दुसऱ्यावर्षी बागायतदारांना फळगळीचा सामना करावा लागत असून बागायतदारांची चिंता वाढली आहे. फळगळीने बागायतदारांचे लाखोंचे नुकसान होत आहे. जिल्ह्यात सांवतवाडी, दोडामार्ग, वेंगुर्ला आणि मालवण तालुक्यांतील काही भागांत व्यापारी दृष्टिकोनातून सुपारीची लागवड केलेली आहे. सावंतवाडी आणि दोडामार्ग तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांचे सुपारी हेच मुख्यपीक आहे. त्या कुटुंबाचा उदरनिर्वाहच सुपारी बागांवर चालतो. परंतु अनेक कुटुंबाचा आधार असलेले सुपारीचे पीकच फळगळीमुळे धोक्यात आल्यामुळे बागायतदार हवालदिल झाले आहेत. मुसळधार पाऊस आणि सतत ढगाळ वातावरण यामुळे बुरशीचा प्रादुर्भाव सुपारीवर दिसून येत आहे. बुरशीमुळे जिल्ह्यातील झोळंबे, तळकट, कोलझर, असनिये या गावांसह परिसरातील अनेक गावांमध्ये सध्या फळगळ मोठ्या प्रमाणात दिसून येत आहे.  प्रत्येक सुपारी बागायतदारांच्या बागांमध्ये फळांचा ढीग साचला आहे. पडलेली फळे साठविण्यासाठी बागायतदारांना घरातील जागा कमी पडत आहे. सुपारीच्या देखभालीवर मोठा खर्च बागायतदारांना करावा लागतो. परंतु यावर्षी खर्चही बागांमधून वसूल होणार नाही, अशी स्थिती सध्या पाहायला मिळत आहे. सलग दुसऱ्या वर्षी सुपारीचे नुकसान झाल्यामुळे यापूर्वी सुरक्षित मानले गेलेले सुपारी पीक देखील इतर पिकांप्रमाणेच बेभरवशाचे बनले आहे. बागायतदारांनी आपल्याकडे असलेली पुंजी बागांवर खर्च केली. आता उदरनिर्वाहाचा प्रश्न त्यांच्यासमोर आहे. गेल्यावर्षी नुकसान झाले असले तरी यावर्षी सुपारीला चांगला दर होता. त्यामुळे गेल्यावर्षीचे नुकसान भरून येईल अशी अपेक्षा बागायतदारांना होती. परंतु हे वर्ष देखील वाया गेले आहे. सध्या बागायतदारांमध्ये निराशा असून पडलेली फळे गोळा करण्याचे काम बागायतदार करीत आहेत. या फळांना अगदी नगण्य असा दर मिळतो आहे. परंतु गोळा करण्याव्यतिरिक्त बागायतदारांच्या हातात दुसरा कोणताही पर्याय राहिलेला नाही.

प्रतिक्रिया गेल्यावर्षी सुपारीची फळगळ झाली होती. त्याचा अनुभव असल्यामुळे यावर्षी सुपारी बागांवर फळगळ रोखण्यासाठी कृषितज्ज्ञांच्या सल्ल्याने फवारण्या घेतल्या. परंतु तरीदेखील फळगळ थांबली नाही. आतातरी सरकारने बागायतदारांचा विचार करून त्यांना आधार देण्याच्या दृष्टीने पाऊल उचलावे. - विश्वनाथ सखाराम गवस, बागायतदार, झोळंबे, ता. दोडामार्ग

फळगळीने सुपारी बागायतदार हैराण झाले असून त्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. नुकसानीचे पंचनामे करण्याची मागणी तहसीलदारांकडे करण्यात आली आहे. नुकसानभरपाईसाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज आहे. - सौ.धनश्री गवस, उपसभापती, पंचायत समिती, दोडामार्ग,

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com