कापूस उत्पादनात मोठी घट, पीक परवडेना

अतिपावसात १२ एकर कापूस पिकात फूलगळ झाली. माझी जमीन पाण्याचा निचरा करणारी असतानादेखील हवे तेवढे बोंडे लागली नाहीत. आता वेचणी पूर्ण होत आली आहे.
jalgaon crop damage
jalgaon crop damage

जळगाव ः अतिपावसात १२ एकर कापूस पिकात फूलगळ झाली. माझी जमीन पाण्याचा निचरा करणारी असतानादेखील हवे तेवढे बोंडे लागली नाहीत. आता वेचणी पूर्ण होत आली आहे. पण उत्पादन फक्त एकरी पाच क्विंटलपर्यंतच हाती आले, पीक परवडेल की नाही, अशी स्थिती झाली आहे, अशी व्यथा कोळन्हावी (ता.यावल, जि.जळगाव) येथील शेतकरी देवानंद विठ्ठल सोळंके मांडत होते. देवानंद म्हणाले, की तापी नदीकाठी माझे शेत आहे. गेल्या वर्षीदेखील अतिपाऊस होता. यंदाही तशीच स्थिती आहे. सुरवातीला स्थिती बरी वाटत होती. माझा कापूस जूनमध्ये लागवडीचा होता. चांगली वाढ सप्टेंबरपर्यंत दिसत होती. बोंडे जोमात होती. पाते, फुले लागत होती. पीक चांगले दिसत असल्याने मीदेखील कीटकनाशके व इतर बाबींवर खर्च केला. परंतु सप्टेंबरपासून पाऊस सुरू झाला. ऑक्टोबरमध्येही अतिपाऊस झाला. या पावसात पिकाची अतोनात हानी झाली. बोंडे खराब झाली. पहिली वेचणी जोमात झाली असती. कारण पीक सप्टेंबरपूर्वी चांगले दिसत होते. पावसासोबत वादळी एकदा आले. अतिपावसाने तणही एवढे वाढले की, तणनाशकांचा उपयोग करण्याची स्थिती तयार झाली. मजूर मिळत नाहीत. आमच्या भागात माझीच नाही, तर इतर शेतकऱ्यांचीदेखील अशीच स्थिती आहे.  एकरी आठ ते नऊ क्विंटल उत्पादन आले असते, पण आता फक्त पाच क्विंटल उत्पादन हाती आले आहे. पीक आणखी महिनाभर राहीले असते. परंतु त्यात वेचणीयोग्य बोंडेच तयार नाहीत. त्यामुळे ते उपटून फेकण्याची वेळ आली आहे. जेवढा खर्च केला, तेवढेच उत्पादन हाती येईल, अशी स्थिती झाली आहे. मजुरांची समस्या आहे. शेतकरी काय करणार, असा हतबल प्रश्‍नही सोळंके यांनी केला. सनपुले (ता.चोपडा) येथील किरण पाटील म्हणाले, की ऑक्टोबरच्या पावसाने मोठी हानी झाली. एकरी चार क्विंटलही उत्पादन येणार नाही. कापसाचे दर सध्या ४३०० ते ४८०० रुपये प्रतिक्विंटल आहेत. शासकीय खरेदी सुरू नाही. एकरी खर्च १५ हजार रुपयांपर्यंत आला आहे. परंतु उत्पादन लक्षात घेता फक्त पाच ते सात हजार रुपये एकरी सुटतील. चार महिने पिकाचा लहान मुलासारखा सांभाळ केला. आता पिकाची डोळ्यासमोर माती झाली आहे. पंचनामे झाले. पण मदत दिवाळीपूर्वी मिळणे अपेक्षित आहे. कारण पुढे रब्बीसाठी हाती निधी हवा आहे. हा निधी बँका देणार नाहीत. घरात शेतमाल नाही. दिवाळीदेखील कशी आनंदात साजरी होईल, असाही मुद्दा शेतकरी पाटील यांनी उपस्थित केला.

कापसाची लागवड अधिक, फटकाही मोठा जिल्ह्यात कापसाची सर्वाधिक पाच लाख २५ हजार हेक्टरवर लागवड झाली आहे. पूर्वहंगामी कापूस पिकाची त्यात सुमारे ६५ हजार हेक्टरवर लागवड आहे. तर गिरणा पट्ट्यात कापूस पिकाला गिरणा धरणाचे पाणी सिंचनासाठी उपलब्ध होणार आहे. परंतु पीकच हातचे गेले आहे. कोरडवाहू पिकातही हवी तशी वाढ हलक्या, मुरमाड जमिनीत नाही. कापूस पिकाचे सव्वादोन लाख हेक्टरवर ६० टक्क्यांवर नुकसान झाले आहे. तर मुगाचे सुमारे १२ हजार हेक्टरवर, उडदाचे नऊ हजार हेक्टरवर ८५ टक्क्यांवर नुकसान झाले आहे. सोयाबीनचेदेखील सुमारे ११ हजार हेक्टरवर अतिपावसाने नुकसान  झाले. यासंदर्भात पंचनाम्याची कार्यवाही पूर्ण झाल्याची माहिती मिळाली.

प्रतिक्रिया माझ्या चार एकरातील सोयाबीन पिकाची अतोनात हानी झाली आहे. शेतात पीकच दिसत नाही. काय करावे, अशी स्थिती आहे. - प्रमोद पाटील, शेतकरी, पळासखेडा (जि.जळगाव)

कापूस पीक आता हिरवे होत आहे. पण त्यात गुलाबी बोंडअळी येत आहे. पीक काढावे लागेल. परतीचा पाऊस आला नसता तर चांगले उत्पादन आले असते. पंचनामे झाले आहे. सरकारने मदत घोषित केली. मदतही तोकडी असून, मदतीची प्रतीक्षा आहे. - अनिल सपकाळे, करंज, जि. जळगाव

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com