वाशीम ः सद्यःस्थितीत कोरोना या विषाणूजन्य आजारावर गर्दी टाळणे हाच एकमेव उपाय असल्याने लाॅकडाउन घोषित करण्यात आला आहे. संचारबंदीत गर्दी टाळून शेतकऱ्यांना यंदाच्या खरीप हंगामासाठी खते व बी-बियाणे उपलब्ध व्हावे या उद्देशाने कृषी विभागाने बी-बियाणे, खते पुरविण्याचे नियोजन केले आहे. याला तालुक्यातील शेतकऱ्यांकडून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे. तीन दिवसांत सुमारे ७८६ शेतकऱ्यांनी नोंदणी केल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी संतोष वाळके यांनी दिली. शेतकऱ्यांनी थेट पुरवठ्यासाठी कृषी विभागाच्या संकेतस्थळावर जाऊन नोंदणी करावी, असेही ते म्हणाले.
यंदा कृषी विभागाने शेतकऱ्यांच्या बांधावर खते व बी-बियाणे पुरविण्यासाठी नियोजन केले आहे. यासाठी तालुक्यातील शेतकऱ्यांनी कृषी विभागाने दिलेल्या संकेतस्थळावर खते व बियाण्याची नोंदणी करणे गरजेचे आहे. बाजारातील गर्दी टाळून शेतकऱ्यांपर्यंत त्यांच्या पसंतीचे खते व बी-बियाणे पोहचविले जाणार आहे. यासाठी कृषी विभागाच्या संकेतस्थळावर एक अर्ज उपलब्ध करून दिला असून त्या अर्जात शेतकऱ्याला लागणाऱ्या बियाणे व खताची मागणी नोंदवावी. त्याकरिता, गावातील कृषी सहायकाचीही मदत होणार आहे.
एका गावातील एकसारखी मागणी असणारे व एकाच कृषी सेवा केंद्रातून खरेदी करण्यास इच्छुकांचा तात्पुरता गट तयार करून एका गटप्रमुखांची निवड करीत त्याच्या सल्ल्याने व मदतीने पुढील कारवाई करण्यात येईल. निवड केलेल्या कृषी सेवा केंद्रामार्फत संपर्क करून शेतकऱ्यांचे खते व बियाणे गावात पोच देण्याची व्यवस्था करण्यता येईल. खताची व बियाण्याची रक्कम कृषी सेवा केंद्राला विचारून आॅनलाइन किंवा रोख स्वरूपात अदा करता येईल. शासकीय दर किंवा कंपनीने ठरवून दिलेल्या दरापेक्षा अधिक दराने विक्री करता येणार नाही. तसेच गुणवत्तापूर्वक निविष्ठा शेतकऱ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी कृषी विभाग नियंत्रण ठेवणार आहे, असेही श्री. वाळके म्हणाले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.