कोरोनात भाजपची भूमिका बेजबाबदारपणाची : नाना पटोले

केंद्रातील मोदी सरकारने महाराष्ट्राला या कठीण परिस्थितीत किती मदत केली हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सांगायला हवे होते, अशी विचारणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.
कोरोनात भाजपची भूमिका बेजबाबदारपणाची : नाना पटोले
कोरोनात भाजपची भूमिका बेजबाबदारपणाची : नाना पटोले

मुंबई : महाराष्ट्र सध्या कोरोनाच्या मोठ्या संकटात आहे. राज्यातील परिस्थिती चिंताजनक आहे. राज्य सरकार सर्व पातळ्यांवर मोठ्या ताकदीने काम करत असताना राज्यातील विरोधी पक्ष मात्र बेजबाबदारपणे वागत आहे. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सरकारला लक्ष्य करताना पाश्चिमात्य देशांनी दिलेल्या पॅकेजची आकडेवारी देत राज्य सरकारच्या मदतीबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे. परंतु, केंद्रातील मोदी सरकारने महाराष्ट्राला या कठीण परिस्थितीत किती मदत केली हे फडणवीस यांनी सांगायला हवे होते, अशी विचारणा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे.  यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, मागील वर्षभरापासून महाराष्ट्र विविध संकटाचा सामना करत आहे. कोरोना साथ, चक्रीवादळ, अतिवृष्टी अशी संकटाची मालिकाच सुरू आहे. अशा परिस्थितीतही मविआ सरकार जनतेला दिलासा देण्यासाठी नेहमी तत्पर राहिले आहे. कोरोनामुळे माझ्यासमोर आर्थिक संकट असतानाही जनतेच्या हितासाठी सरकारने कधीही हात आखडता घेतला नाही. परंतु दुर्दैवाने केंद्रातील मोदी सरकारने नेहमीच महाराष्ट्राला दुजाभावाची वागणूक दिली. राज्याच्या हक्काचा जीएसटी परतावा तसेच इतर निधीही देण्यास टाळाटाळ केली. राज्य संकटात असताना राज्यातील भाजपाचे नेते मात्र मविआ सरकारविरोधात कटकारस्थाने करत राहीले. कधी राजभवनच्या माध्यमातून, कधी काही अधिकाऱ्यांना हाताशी धरून षडयंत्र रचण्यातच ते मग्न राहिले. केंद्रीय तपास यंत्रणांच्या आडून भाजपाच्या नेत्यांनी महाराष्ट्रातील वातावरण गढूळ करून देशात बदनामी केली. राज्याला आर्थिक मदतीची गरज असताना मुख्यमंत्री मदतनिधीत पैसे जमा न करता राज्यातील भाजपा नेत्यांनी पंतप्रधान केअर फंडात पैसे जमा केले.  फडणवीस यांची मागणी रास्तच आहे पण त्यांनी नरेंद्र मोदी यांच्याकडे विचारणा करणे अपेक्षित आहे. कदाचित त्यांना दिल्लीत मोदी- शहा गांभीर्याने घेत नाहीत म्हणून ते राज्य सरकारच्या नावावर मोदींना सुचवत असावेत, अशी कोपरखळीही पटोले यांनी मारली. 

प्रतिक्रिया... राज्य सरकारला पॅकेज संदर्भात विचारणा करणारे देवेंद्र फडणवीस व भाजप नेते यांनी मोदी सरकारकडून महाराष्ट्राला भरीव आर्थिक मदत मिळावी यासाठी काय केले? मोदींनी जाहीर केलेल्या २० लाख कोटी रुपयांच्या पॅकेजचे काय झाले ? त्यातून महाराष्ट्राला किती कोटी मिळाले? याची उत्तरे त्यांनी जनतेला द्यावीत.  - नाना पटोले, प्रदेशाध्यक्ष, काँग्रेस   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com