भारतीय राज्यव्यवस्था शेतकरीविरोधी ः विनय हर्डीकर

‘पोशिंद्याचे आख्यान ः एक प्रश्नोपनिषद’ या पुस्तकाचे प्रकाशन
‘पोशिंद्याचे आख्यान ः एक प्रश्नोपनिषद’ या पुस्तकाचे प्रकाशन

पुणे  : वसाहतवादाच्या काळापासूनच भारतीय राज्य व्यवस्था ही शेतकरीविरोधी राहिलेली आहे. स्वातंत्र्य मिळाल्यानंतरही त्यात काही बदल झाला नाही. ही स्थिती सुधारायची असेल तर संपूर्ण समाजाला या लढाईत ओढावं लागेल. संपूर्ण समाजाचा शेती आणि शेतकऱ्यांकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला पाहिजे, असे मत लेखक-पत्रकार विनय हर्डीकर यांनी व्यक्त केले. 

‘अॅग्रोवन’चे उप-वृत्तसंपादक रमेश जाधव यांनी लिहिलेल्या ‘पोशिंद्याचे आख्यान ः एक प्रश्नोपनिषद’ या पुस्तकाच्या प्रकाशन समारंभात गुरुवारी (ता. २५) श्री. हर्डीकर बोलत होते. या वेळी निवृत्त सनदी अधिकारी उमेशचंद्र सरंगी, ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ नीरज हातेकर, साप्ताहिक साधनाचे संपादक विनोद शिरसाठ उपस्थित होते.  

या वेळी श्री. हर्डीकर म्हणाले, की शेतकऱ्यांना लाचारीने जगणे सोपे आणि सोयीचे वाटत असताना संघर्ष करत स्वाभिमानाने जगण्यात एक वेगळ्या प्रकारचा आनंद आहे, ही जाणीव शरद जोशी यांनी शेतकऱ्यांमध्ये रुजवली. परंतु आज मात्र शेतकऱ्यांना पुन्हा लाचारीच्या मार्गाकडे ओढण्याचे कारस्थान सगळेच राजकीय पक्ष करत आहेत. त्याला शह दिला पाहिजे. भारत विरुद्ध इंडिया ही संघर्षरेषा आता संपली असून भारत आणि इंडिया यांनी एकमेकांच्या सहकार्याने वाटचाल केली पाहिजे, हा विचार केंद्रस्थानी ठेवून भारत-इंडिया फोरम या प्लॅटफॉर्मची सुरवात केली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.

श्री. सरंगी यांनी शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करून उत्पादन व उत्पन्न कसे वाढविता येईल हेच उद्दिष्ट सरकारी यंत्रणेच्या केंद्रस्थानी हवे, असे सांगितले. निविष्ठांवर आधारित शेतीच्या विकासाकडे गेल्यानंतर उत्पादन वाढले. मात्र, शेतकरी समृद्ध झाला नाही. उलट १९९० नंतर शेतकरी आत्महत्या वाढल्या. त्यामुळे आता कृषी विद्यापीठे व कृषी विभागाने उत्पादन खर्च कमी करणे हीच संशोधनाची दिशा ठेवली पाहिजे, असे श्री. सरंगी म्हणाले.

या वेळी सर्व वक्त्यांनी पोशिंद्याचे आख्यान ः एक प्रश्नोपनिषद या पुस्तकातील एकूण मांडणी आणि परखड भूमिकेचे कौतुक केले. राज्यकर्त्यांना प्रश्न विचारणे व त्यांचा छुपा अजेंडा उघडा पाडणे हे माध्यमांचे काम आहे. गेल्या पाच वर्षांत केंद्र व राज्य सरकारचे शेतीविषयक धोरणे, कार्यक्रम आणि निर्णयांची चिकित्सा या पुस्तकात केली आहे, असे श्री. जाधव या वेळी म्हणाले. कार्यक्रमाला साखर आयुक्त शेखर गायकवाड, भूजल सर्वेक्षण व विकास यंत्रणेचे संचालक कौस्तुभ दिवेगावकर, माजी कुलगुरू डॉ. राजाराम देशमुख, पाणी पंचायतच्या कल्पनाताई साळुंके, शेतकरी संघटनेचे विजय विल्हेकर, अनंत देशपांडे आदी मान्यवर उपस्थित होते.    शेतीप्रश्नांची अराजकीय चर्चा करणे झालेय कठीण ः हातेकर समाजातील परंपरागत शहाणपण, सामूहिक विवेक आणि संघटित कृती या माध्यमातून शेतीच्या प्रश्नावर मार्ग काढणे शक्य आहे, असे मत अर्थतज्ज्ञ नीरज हातेकर यांनी व्यक्त केले. आज माणसामाणसामध्ये फूट पाडणारे राजकारण खेळले जात असल्याने शेतीप्रश्नांची अराजकीय चर्चा करणे कठीण झाले आहे, याकडे त्यांनी लक्ष वेधले. ग्रामीण समाजाची सर्वंकष समज आणि वर्षानुवर्षांच्या अनुभवातून विकसित झालेली शहाणीव या आधारे धोरणे आखली तर बदल निश्चितच होतील, असा आशावाद त्यांनी व्यक्त केला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com