दोन्ही शिंदेंना आत्मविश्वास नडला

दोन्ही शिंदेंना आत्मविश्वास नडला
दोन्ही शिंदेंना आत्मविश्वास नडला

सोलापूर : सोलापूर आणि माढा लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निकालानंतर जिल्ह्याचे राजकारण बदलले अाहे. सोलापुरात काँग्रेसचे सुशीलकुमार शिंदे आणि माढ्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे संजय शिंदे या दोघांना मतदारांना गृहित धरणे महागात पडलेच, पण त्याहूनही अधिक त्यांना आत्मविश्वास नडला. या निवडणुकीचे परिणाम आता जिल्ह्याच्या आगामी राजकारणावर पडणार आहेत. सुशीलकुमार शिंदे यांनी ही माझी शेवटची निवडणूक आहे, अशी घोषणा केली. पण पराभवानेच त्यांना राजकारणाचा शेवट करावा लागला. माढ्यातील राष्ट्रवादीचा बुरुज ढासळण्यास हातभार लावणाऱ्या, भाजपवासी झालेल्या मोहिते पाटील गटाला मात्र या निवडणुकीने चांगलेच बळ दिले.   

जिल्ह्यातील सोलापूर आणि माढा हे लोकसभा मतदारसंघ अत्यंत प्रतिष्ठेचे आणि लक्षवेधी ठरले. सोलापुरात काँग्रेसचे सुशीलकुमार आणि भाजपचे डॅा. जयसिद्धेश्वर महास्वामी यांच्यातील दुरंगी लढतीमुळे शिंदे यांना विजयाचा विश्वास वाटत होता. पण एैनवेळी वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर इथे अवतरले. त्यामुळे शिंदे यांचे विजयाचे स्वप्न भंगले. या दरम्यान, ही माझी शेवटची निवडणूक आहे, असे भावनिक आवाहनही शिंदे यांनी केले. पण ते मतदारांच्या फारसे पचनी पडले नाही. 

शिंदे यांच्या पारड्यात पडणारी दलित, मुस्लिम मते या वेळी अॅड. आंबेडकरांच्या पारड्यात पडली. शिवाय शिंदे यांना हमखास पडणारी लिंगायत मतेही भाजपचे डॅा. महास्वामी यांनी खेचली. त्यामुळे शिंदे यांची दोन्ही बाजूंनी ओढाताण झाली. पण तरीही आत्मविश्वासाने त्यांनी मतदारांना गृहित धरत जिंकूच, हा विश्वास बाळगला आणि त्यानेच त्यांचा घात केला. 

माढा हा सुरवातीपासूनच राष्ट्रवादी काँग्रेससाठी प्रतिष्ठेचा मतदारसंघ राहिला आहे. स्वतः शरद पवार आणि त्यानंतर विजयसिंह मोहिते पाटील यांनी येथून प्रतिनिधित्व केले. यंदा मात्र इथले चित्र काहीसे विरोधाभासी राहिले. निवडणुकीच्या तोंडावर मोहिते पाटील गटाने थेट भाजपत प्रवेश केल्याने राष्ट्रवादी काँग्रेसची चांगलीच कोंडी झाली. भाजपच्या पाठिंब्यावर जिल्हा परिषद अध्यक्ष राहिलेल्या संजय शिंदे यांना राष्ट्रवादीत घेऊन शरद पवार यांनी थेट शिंदे यांना उमेदवारी जाहीर करत ही निवडणूक रंगतदार केली. शिवाय विळ्या-भोपळ्याचे वैर असणाऱ्या मोहिते पाटील-शिंदे गटामध्ये त्यामुळे चांगलीच चुरस वाढली. पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही जिंकण्याच्याच इराद्याने मोहिते पाटील यांच्याकडे निवडणुकीच्या प्रचाराची जबाबदारी दिली. फलटणच्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांना मैदानात उतरवले, अर्थात, सोलापूर आणि सातारा जिल्ह्यातील राजकीय गणित हेरून हा निर्णय घेतला, नेमका तो त्यांना फायदेशीर ठरला. 

राष्ट्रवादी काँग्रेस आणि संजय शिंदे यांनी केवळ मोहिते पाटील यांच्याच भोवती प्रचाराचा मुद्दा तापवत ठेवत आपणच जिंकू हा आत्मविश्वास बाळगला. पण तो सपशेल कुचकामी ठरला. यात भाजपची रणनिती मात्र यशस्वी झाली. या निवडणुकीने मोहिते पाटील गटाला राजकीय बळ मिळाले आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com