बोंड अळी वर्षातच नियंत्रणात; कृषी विभागाचा होणार गौरव !

राज्यात कापसाच्या पिकावर गुलाबी बोंड अळीचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे कापूस उत्पादन अडचणीत होते. कोलमडलेल्या शेतकऱ्यांना या संकटातून बाहेर काढण्यासाठी बोंड अळीचा प्रादुर्भाव थांबविण्याचे मोठे अाव्हान कृषी विभागासमोर होते. मात्र, शेतकऱ्यांच्या मदतीने कृषी विभागाने केलेले काम आणि जनजागृतीचा परिणाम म्हणून गुलाबी बोंड अळीचे निर्मूलन करण्यात यश आले. त्याची केंद्र सरकारने दखल घेतली असून, केंद्राचे अधिकारी कापूस उत्पादकांशी चर्चा करण्यासाठी आलेले आहेत. - पंडित लोणारे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, नगर
बोंडअळी
बोंडअळी

नगर ः देशातील अन्य राज्यांत बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी दोन ते तीन वर्षांचा कालावधी गेला. मात्र महाराष्ट्रात वर्षभरातच बोंड अळी नियंत्रणात आणण्याला कृषी विभागाला यश आले. देशात सर्वांत कमी कालावधीत बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखल्यामुळे केंद्र राज्याचा गौरव करणार आहे. त्यासाठी सोमवारपासून केंद्राचे दोन सदस्यीय पथक राज्यात आले आहे. पाच दिवस ते राज्यातील विविध भागात जाऊन कापूस उत्पादकांशी संवाद साधत ‘‘बोंड अळीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी काय उपाययोजना केल्या, याची माहिती घेत असून त्यांच्या अहवालानुसार राज्याच्या कृषी विभागाचा केंद्र सरकार गौरव करणार आहे.  देशाभरात सुमारे १ कोटी २२ लाख हेक्टर क्षेत्रावर कापसाचे पीक घेतले जाते. त्यात सर्वाधिक क्षेत्र महाराष्ट्रात आहे. त्यापाठोपाठ गुजरातेत २४ लाख, तेलंगणात १९ लाख, मध्यप्रदेशात ८ लाख व कर्नाटक, मध्यप्रदेश, पंजाब, हरियाणात मिळून जवळपास २० लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावर कापसाचे उत्पादन घेतले जाते.  देशभरात कापसाचे पीक गेल्या पाच वर्षांत सातत्याने अडचणीत येत आहे. बोंड अळीच्या प्रादुर्भावानंतर तर मोठ्या प्रमाणात कापसाचे पीक वाया गेले. त्याचा मोठा आर्थिक फटका उत्पादकांना बसला आहे. त्यामुळे बोंड अळीचे संकटापासून शेतकऱ्यांना वाचवण्यासाठी शासनाला मोठी कसरत करावी लागली. बोंड अळीमुळे कापसाच्या उत्पादनात ८० टक्के घट झाल्यामुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना गेल्या वर्षी (२०१७-१८) राज्यात ९०० कोटी रुपयांची तर नगर जिल्ह्यामध्ये १५७ कोटी रुपयांची मदत द्यावी लागली होती. त्यामुळे बोंड अळीचे संकट हटविण्यासाठी कृषी विभागाने जनजागृती केली. प्रत्येक कृषी सहायकाच्या माध्यमातून प्रत्येक गावांत सभा घेतल्या, पत्रके वाटली. त्याचा परिणाम म्हणून बोंड अळीचा होणारा प्रादुर्भाव एक वर्षात रोखण्यात राज्यात यश आले. त्याचा परिणाम म्हणून यंदा राज्यात कोठेही गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव दिसून आला नाही.  गेल्या पाच वर्षांपासून देशात बोंड अळीचे संकट आहे. अन्य राज्यांत बोंड अळीचा प्रादुर्भाव कमी करण्याठी दोन ते तीन वर्षांचा कालावधी लागला होता. कृषी विभागाने केलेल्या गुलाबी बोंड अळी व्यवस्थापन कामाची केंद्र सरकारने दखल घेतली असून राज्यात केलेल्या विविध बाबींचा तपासणी करण्यासाठी केंद्र सरकारच्या दोन शास्त्रज्ञानाचे पथक सोमवारपासून राज्यात आले आहे. नगरसह जळगाव, औरंगाबाद व अन्य कापसाचे क्षेत्र जास्ती असलेल्या भागात पाहणी करणार आहे. या अधिकाऱ्यांसोबत राज्यातील कृषी विभागाचेही अधिकारी आहेत. शेतकरी, जिनिंग प्रेसिंग वाल्याशी ते संपर्क साधणार आहेत. गुलाबी बोंड अळी निर्मूलनात राज्याने केलेल्या प्रभावी कामाचा केंद्र सरकार राज्याच्या कृषी विभागाचा गौरव करणार असल्याचे सांगण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com