उद्‌घाटनानंतर २४ तासांतच कालव्याला भगदाड

झारखंडमधील भाजप सरकार सर्वच कामांचे श्रेय घेण्यासाठी निकृष्ट आणि अपूर्ण कामांचे उद्‌घाटन करून जाहिरातबाजी करण्यात मश्‍गूल आहे. सरकारचा नाकर्तेपणा आणि दुर्लक्षामुळेच ही घटना घडली आहे. - अलोक दुबे, विरोधी पक्षनेते
कालवा भगदाड
कालवा भगदाड

रांची, झारखंड ः  राज्यातील हजारीबाग जिल्ह्यात कोनार नदी सिंचन प्रकल्पावर कालवा निर्माण करण्याची संकल्पना ४२ वर्षांपूर्वी पुढे आली. मात्र, दोन वेळा कामाचे उदघाटन होऊनही २००३ मध्ये काम कासवगतीने सुरू झाले. कामांचा खर्चही १२ कोटींवरून २ हजार १७६ कोटी रुपयांवर पोचला. बुधवारी (ता.२८) या कालव्याचा लोकार्पण सोहळा झारखंडचे मुख्यमंत्री रघुबार दास यांच्या हस्ते पार पडला. मात्र त्यानंतर लगेच २४ तासांतच कालव्याला भगदाड पडून ३५ गावांतील जमीन वाहून गेली. या घटनेच्या चौकशीसाठी राज्य सरकारने आता समिती नेमली आहे. झारखंडमधील हझारीबाग जिल्ह्यात कोनार नदी सिंचन प्रकल्पावरील कालव्याला बिश्‍नुगड येथे मोठे भगदाड पडले. या वेळी कालव्याचे पाणी शेतात जावून ३५ गावांतील जमीन पाण्याने वाहून गेली. मिळालेल्या माहितीनुसार, राज्य सिंचन विभागाच्या अधिकाऱ्यांनी हे भगदाड पडण्यामागे उंदरांना दोषी धरले आहे. कालव्यात ज्या ठिकाणी सिमेंट कॉंक्रिटीकरण करणे बाकी होते या ठिकाणी उंदरांनी बीळ केल्यामुळे कालव्याला भगदाड पडले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. शुक्रवारी सरकारने प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले, की उंदरांनी तयार केलेल्या बिळांमुळे कालव्याचे नुकसान झाले. त्यामुळेच कालव्याला भगदाड पडले. राज्याचे अतिरिक्त मुख्य सचिव, अरुण कुमार सिंह म्हणाले, की कालव्याला भगदाड पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले. या नुकसानीची पाहणी करण्यासाठी मुख्य अभियंत्यांच्या अध्यक्षतेखाली उच्च स्तरिय समिती स्थापन करण्यात आली आहे.   १२ कोटींचा खर्च गेला २१७६ कोटींवर हझारीबाग जिल्ह्यात कोनार नदी सिंचन प्रकल्पावर कालवा निर्माण करण्यासाठी सरकारने १९७८ मध्ये मान्यता दिली. तत्कालीन बिहारचे (तेव्हा बिहार आणि झारखंड एकच राज्य होते) राज्यपाल जग्गनाथ कौशल यांनी कालव्याचे कामाचे उदघाटन केले. मात्र सरकारांमधील विसंगतीमुळे हा प्रकल्प रेंगाळत राहिला. प्रकल्पाचे काम सुरू होण्याला तब्बल चार दशकांचा उशीर झाला. या काळात प्रकल्पाच्या खर्च १२ कोटींवरून २ हजार १७६ कोटी रुपयांवर पोचला. दोनवेळा कामाचे उदघाटन १९७८ मध्ये तत्कालीन राज्यपालांनी कालव्याच्या कामाचे उदघाटन केल्यानंतरही काम सुरू न झाल्याने शेवटी २००३ मध्ये मुख्यमंत्री अर्जून मुंडा यांनी पुन्हा कामाचे उदघाटन केले आणि कासवगतीने का होईना कामाला सुरवात झाली. २०१२ मध्ये ४०४.१७ किलोमीटर लांबी असलेल्या या प्रकल्पाचे काम मुंबई येथील कंपनीला देण्यात आले. कालव्याने १७०० क्युसेक पाणी सोडण्याची क्षमता निर्माण करण्याचे उद्दीष्ट होते. मात्र, सध्या या कालव्यातून केवळ ८०० क्युसेकने पाणी सोडता येत आहे.  प्रतिक्रीया कालव्याला भगदाड पडल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. प्रशासनाने या भागाची पाहणी करावी आणि शेतकऱ्यांना नुकसानभरपाई द्यावी. शासनाने या घटनेची चौकशी करणे आवश्‍यक आहे. - नागेंद्र माहोतो, आमदार

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com