जालना : प्रादुर्भावग्रस्त मका पिकाची मोडणी

प्रादुर्भावग्रस्त मका पिकाची मोडणी
प्रादुर्भावग्रस्त मका पिकाची मोडणी

जालना : जिल्ह्यातील गेवराई बाजार येथील शेतकऱ्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून मका पिकावरील लष्करी अळीची तीव्रता निदर्शनास आणून दिली. त्याची दखल घेऊन २४ तासांच्या आत औरंगाबादच्या राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पासह खरपुडी कृषी विज्ञान केंद्राच्या तज्ज्ञांनी सोमवारी (ता. ९) पीक प्रादुर्भावग्रस्त शेतात जाऊन शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले.

मका उत्पादक शेतकरी लष्करी अळीच्या प्रादुर्भावग्रस्त पिकांची मोडणी करीत आहेत, अशी माहिती शेतकरी गणेश जोशी यांनी खरपुडी कृषी विज्ञान केंद्राकडे सोशल मीडियाच्या माध्यमातून पुरविली. त्याअनुषंगाने या तज्ज्ञांनी लागलीच प्रादुर्भावग्रस्त शेतांना भेट दिली. औरंगाबादच्या राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्पाचे प्रमुख डॉ. एस. बी. पवार, खरपुडी कृषी विज्ञान केंद्राचे कीटकशास्त्रज्ञ प्रा. अजय मिटकरी, प्रा. पंडित वासरे, पशुतज्ञ प्रा. हनुमंत आगे, विभागीय कृषी विस्तार केंद्राचे रामेश्‍वर ठोंबरे, सेवानिवृत्त कृषी अधिकारी नंदकुमार पुंड आदींचा तज्ज्ञांमध्ये समावेश होता.   

ज्या शेतात प्रादुर्भाव झाला असेल आणि पीक शेतात उभे ठेऊन उत्पादन हाती येण्याची खात्रीच नसेल, अशी मका उपटून वाळवावी. त्यामुळे त्यावरील कीड नाहीशी होईल. नंतर तो सुका चारा म्हणून उपयोग होईल. १०० टक्के प्रादुर्भाव असेल, त्या ठिकाणच्या शेतकऱ्यांनी हिरवा मका चारा म्हणून उपयोग करू नये. मका पिकावर रब्बी ज्वारी पीक घेण्याऐवजी हरभरा पीक घेणे हिताचे ठरेल. कारण ही लष्करी अळी एकदल पिकात पोग्यात दडून बसते. त्यामुळे नियंत्रण करणे अवघड जाते. 

काही शेतकरी थेट मका पिकात रोटाव्हेटर मारून पीक नाहीसे करत असले, तरी त्यामुळे कीड नाहीशी होणार नाही, हे लक्षात घ्यावे. त्या ऐवजी पीक कापून उन्हात वाळवावे. साधारण महिनाभरानंतर चारा म्हणून वापर करता येईल. कोरडवाहू क्षेत्रातील मका पीक असेल आणि प्रादुर्भाव खूप असेल, अशा वेळी निदान रब्बी पीक तरी घेता आले पाहिजे. उपलब्ध ओलीवर रब्बी पीक उगवले पाहिजे,  हे पण लक्षात घ्यावे लागेल, असे तज्ज्ञांनी सांगितले.  

‘‘कुठलाही निर्णय घेण्यापूर्वी कृषी शास्त्रज्ञ, कृषी विभाग, कृषी विज्ञान केंद्रातील शास्त्रज्ञांच्या संपर्कात राहण्याचा सल्ला तज्ज्ञांनी दिला. 

डॉ. पवार म्हणाले, ‘‘मोठे पीक मोडून टाकणे योग्य नाही. इथून पुढे होणारे नुकसान १०० टक्‍के नसेल. ‘एफएओ’च्या तज्ज्ञांच्या मतानुसार होणारे नुकसान २० टक्‍क्‍यांपर्यंत असेल. ते ५० टक्‍क्‍यांपर्यंत झाले, तरी येणारे उत्पादन फायद्याचेच असेल. मक्याच्या सध्याच्या किमती ते सुचवित आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांनी पर्यायाचा विचार करावा. पीक मोडून टाकण्याचा निर्णय तातडीने घेऊ नये.’’  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com