राईसमिल, पोहे निर्मितीतून व्यवसायवृद्धी

वेहेळे (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथे शंकर जाधव यांनी आपल्या शेतीला पूरक म्हणून राईसमिल उभारली. त्यात आधुनिकता आणली. बचत गटाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पहिली पोहा मिल सुरू करून उलाढाल वाढवली.
While processing rice at the rice mill and poha production
While processing rice at the rice mill and poha production

वेहेळे (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथे शंकर जाधव यांनी आपल्या शेतीला पूरक म्हणून राईसमिल उभारली. त्यात आधुनिकता आणली. बचत गटाच्या माध्यमातून जिल्ह्यातील पहिली पोहा मिल सुरू करून उलाढाल वाढवली. रोजगारनिर्मिती केली. आता पाचशे सदस्यांना एकत्र करीत शेतकरी कंपनीची स्थापना व त्यामाध्यमातून व्यवसायवृद्धी सुरू केली आहे. कोकणातील अनेक तरुण नोकरी व्यवसायासाठी मुंबईत जातात. वेहेळे (ता. चिपळूण, जि. रत्नागिरी) येथील शंकर जाधव देखील १९९० च्या सुमारास शिक्षणानंतर मुंबईत गेले. तेथे टेम्पो घेऊन वाहतूक व्यवसाय सुरू केला. त्या निमित्ताने राज्यातील विविध भागांत फिरण्याचे प्रसंग आले.त्या निमित्ताने कृषीपूरक व्यवसायही त्यांच्या पाहण्यात आले. त्यांचे अर्थकारण व त्यातील संधी यांचा अभ्यास करून त्यात उतरण्याचे नक्की केले. मग मुंबईतील मालमत्ता विकून ते गावी परतले. पश्‍चिम महाराष्ट्रातील दुग्ध व्यवसायाची प्रेरणा घेऊन गावात दुग्ध सोसायटी सुरू करण्यासाठी पुढाकार घेतला. गायी, म्हशी विकत घेत इतरांनाही प्रोत्साहन दिले. गावातून ८०० लीटर दूध जमा होण्यास सुरुवात झाली. त्यात शंभर लीटर दूध जाधव यांच्याकडील होते. त्यातून चांगला पैसा मिळू लागल्यानंतर ५०० पक्षांचा पोल्ट्री व्यवसाय केला.

राईस मिलची सुरुवात

  • अडरे (ता. चिपळूण) येथे शंकर यांचे वडील दौलत यांची पिठाची गिरणी सुरू होती. त्यात शंकर यांनी आधुनिकता आणण्याचे प्रयत्न केले. राईस मिलही सुरू केली. पंचक्रोशीतील सुमारे १५ गावांमधून भात येऊ लागला. जाधव यांच्याकडे वाहतुकीची कला असल्यामुळे ग्राहकांना घरपोच सेवा सुरू केली.
  • सन २००० मध्ये वेहळे गावात १२ गुंठे जागा घेऊन राईस मिल चालू केली. त्यासाठी विटा बँकेचे दहा लाखांचे कर्ज घेतले. गुणवत्ता व खात्रीशीर सेवा या जोरावर शंकर यांच्या व्यवसायाचे नाव संपूर्ण तालुक्यात झाले. पन्नास किलोमीटरवरूनही शेतकरी मिलवर भात घेऊन येऊ लागले. महिन्याची उलाढाल लाख रुपयांपर्यंत पोचली.
  • व्यवसायाचा विस्तार

  • मिळणाऱ्या नफ्याचे स्मार्टपणे व्यवस्थापन करून ते व्यवसायात गुंतवले.
  • ग्राहकांच्या सूचनांनुसार राईसमिल यंत्राचे आधुनिकीकरण वा बदल
  • घरपोच सेवा देण्यासाठी एकेक करीत चार वाहनांची खरेदी
  • सुमारे आठ ते १० महिने हा व्यवसाय चालतो.
  • पावसाळ्यात कामगारही शेती करतात. या काळात मिल बंद राहू नये यासाठी मसाला गिरणी सुरू केली. पत्नी शिल्पा त्या जबाबदारी पाहतात. शंकर आपले बंधू रवींद्र जाधव यांच्या मदतीने राईसमिल सांभाळतात.
  • दररोज होते १२ टन भातावर प्रक्रिया
  • भात भरडून देण्याचे शुल्क १०० रुपये प्रति क्विंटल
  • सध्याची मासिक उलाढाल- तीन लाख रू.
  • गटामार्फत पोहा निर्मिती अडरे परिसरात २०१७ मध्ये शंकर यांच्या पुढाकाराने रामकृष्ण हरी शेतकरी गट तयार झाला. त्यामाध्यमातून आधुनिक पोहा मिल सुरू केली. त्यासाठी ३० लाख रुपये खर्च आला. दहा लाख रुपये महाराष्ट्र बँकेने कर्ज दिले तर ‘आत्मा’ अंतर्गत १० लाखांचे अनुदान मिळाले. उर्वरित रक्कम शेतकरी सदस्यांनी उभी केली. गटाच्या माध्यमातून पोहा मिलचा हा जिल्ह्यातील पहिला प्रकल्प सुरू करण्याचा मान मिळाला.

    पोहा मिल- ठळक बाबी

  • दिवसाला दोन टन पोहा निर्मिती
  • मुंबई, पुण्यासह रत्नागिरी जिल्ह्यात पुरवठा
  • अडरे परिसरात पूर्वी भातशेती मोठ्या प्रमाणावर व्हायची. हळूहळू त्याचे प्रमाण घटले. आता सिंधुदुर्ग जिल्ह्यातील व्यापाऱ्यांकडून १६०० रुपये प्रति क्विंटल दराने भाताची खरेदी होते. यंदा ३० टन खरेदी पांढरा पोहा किलोला ४० रुपये तर लाल पोहा ५० रुपये दराने विकला जातो. दिवाळी हंगामात दर वाढतो.
  • डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाने कर्जत शताब्दी हे भाताचे वाण खास पोह्यासाठी तयार केले आहे. गटाच्या माध्यमातून हे बियाणे परिसरातील शेतकऱ्यांना दिले जाणार आहे. हा भात गटामार्फत खरेदी करून पोह्याचे उत्पादन वाढवण्याचा विचार आहे.
  • सध्या जाड तांदळाची किलोला २५ ते २८ रुपये तर बारीक तांदळाची ३५ ते ४० रुपये दराने विक्री.
  • राईस व पोहा मिल मिळून सुमारे १० जणांसाठी रोजगार निर्मिती.
  • पोह्याचे उत्पादन वाढवण्यासाठी गटाने मध्यप्रदेश, छत्तीसगड येथे जाऊन तेथील पोहा उत्पादक कंपन्यांना भेट व माहिती घेतली.
  • शेतकरी कंपनीची स्थापना

  • सन २०१८ मध्ये याच शेतकऱ्यांनी एकत्र येत माय कोकण अ‍ॅग्रो प्रोड्युसर ही कंपनी वेहळे गावात स्थापन केली आहे. (महाराष्ट्र स्पर्धाक्षम कृषी विकास प्रकल्पांतर्गत)
  • परिसरातील पाचशे शेतकरी त्यास जोडले गेले आहेत.
  • कंपनीमार्फत तांदूळ, पोहा, पीठ, मसाला, बचत गटाचे पापड यांची खरेदी- विक्री
  • खते आणि बियाणे विक्रीचाही परवाना मिळाला आहे. भात, नाचणी बियाणे व हळदीचे बेणे विक्रीतून कंपनीने चार लाख रुपये उत्पन्न मिळवले आहे. यंदा बियाणे शेतकऱ्यांसाठी घरपोच उपलब्ध करून दिले जाणार आहे.
  • शंकर यांचा मुलगा प्रथमेश हे गट व कंपनीचे अध्यक्ष आहेत. प्रक्रिया उद्योगातून स्थानिक शेतकऱ्यांची मानसिकता बदलायची आहे. शासनाकडून नवे प्रकल्प किंवा योजना येतात त्यावेळी ते राबवण्यासाठी आमच्याकडे विचारणा होते असे शंकर अभिमानाने सांगतात. तालुका कृषी अधिकारी, आत्मा व कृषी वसंत शेतकरी विकास संस्थेचे गटाला सातत्याने मार्गदर्शन मिळते.
  • संपर्क- शंकर जाधव-७५८८९०५८६८ प्रथमेश जाधव- ९४०४७७३

    Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com