मुखई (जि. पुणे) येथील अभिजित धुमाळ या तरुण शेतकऱ्याने दर्जेदार ऊस रोपांची निर्मिती व विक्री व्यवसाय यशस्वी केला आहे. सुमारे नऊ वर्षांपासून सुरू असलेला हा व्यवसाय महाराष्ट्रासह अन्य तीन राज्यांतही विस्तारला असून वर्षाला सुमारे २० लाख रोपांची विक्री करण्यापर्यंत धुमाळ यांनी झेप घेतली आहे. पुणे जिल्ह्यात मुखई (ता. शिरूर) येथील अभिजित धुमाळ शेतीबरोबर ऊस बेणे विक्रीचा पारंपरिक व्यवसाय वडील आणि भावासोबत करायचे. एका जैविक खत कंपनीचे जिल्ह्याचे वितरक म्हणून काम करीत असताना विविध दौऱ्यांमध्ये ऊस उत्पादकांशी संवाद व्हायचा. उत्पादनवाढीत दर्जेदार बेणे उपलब्ध होण्याचा मुद्दा त्यातून प्रकर्षाने पुढे यायचा. अभिजित यांना त्यामध्ये संधी दिसली. त्यातून उसाची दर्जेदार रोपे तयार करण्याच्या व्यवसायास चालना मिळाली. व्यवसायाची सुरुवात
२०१२ मध्ये स्वतःच्या शेतीसाठी चार गुंठ्यांचे शेडनेट उभारले. कंपनीतील अधिकाऱ्यांनी रोपे बनविण्याचे मार्गदर्शन केले. कोकोपीट, ट्रे आणून को ८६०३२ या जातीची पाच हजार रोपे तयार केली. - पुढे २० हजार रोपे बनवली. या रोप लागवड प्रयोगातून उत्पादनात वाढ मिळाली. त्यातून आत्मविश्वास आला. २०१४ मध्ये १५ गुंठ्यांचे शेडनेट उभारले. त्यातून १५ लाख रोपांची विक्री शक्य झाली. मात्र शेडनेटमध्ये उगवणशक्ती तुलनेने कमी मिळत असल्याचे जाणवले. २०१५ मध्ये पॉलिहाऊस उभारण्याचे ठरवले. मात्र त्यासाठी शासकीय योजना नव्हती. मग कॅनरा बॅंकेच्या शिक्रापूर शाखेकडून १७ लाख रुपयांचे कर्ज घेत १६ गुंठ्याचे पॉलिहाऊस उभारले. त्यातील नियंत्रित तापमानामुळे उगवणशक्तीची टक्केवारी १५ ते २० टक्क्यांनी वाढली. रोपांच्या संख्या वाढली. साधारण २५ लाखांपर्यंत रोपविक्री झाली. आजचा व्यवसाय दृष्टिक्षेपात
सुमारे २५ एकरांत बेणेमळा तर दोन एकरांत नर्सरी नऊ महिन्यांच्या बेणेमळ्यात एकरी ६० टनांपर्यंत उत्पादन दरवर्षी सुमारे २० लाख रोपांची विक्री. पाऊस व हवामान अनुकूल असलेल्या वर्षी ३५ ते ४० लाखांपर्यंत विक्री या वाणांची रोपे उपलब्ध - को - ८६०३२, फुले २६५, व्हीएसआय ८००५, रसवंतीसाठीचा ०३१०२, पाडेगावचा १०००१ दरवर्षी शंभर ग्राहकांची नव्याने भर. तर दोनशे जुने ग्राहक रोपांसाठी एक महिना आगाऊ बुकींग. होम डिलिव्हरी. शंभर किलोमीटर परिघासाठी अडीच रुपये प्रति रोप दर. दीडशे किलोमीटरच्या पुढे आणि परराज्यात एका बाजूचे भाडे या तत्त्वावर २५ रुपये प्रति किलोमीटर दर महाराष्ट्रापुरता व्यवसाय सिमित न ठेवता गुणवत्ता, खात्रीशीर सेवा व ‘माऊथ पब्लिसिटी' या जोरावर तो मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थानापर्यंत पोचवला. मागील वर्षी मध्य प्रदेशात ८० हजार तर गुजरातमध्ये २० हजार रोपांची विक्री झाली. ॲग्रोवन कृषी प्रदर्शनामुळे चालना
अभिजित यांनी ॲग्रोवनच्या सुरुवातीच्या दोन- तीन कृषी प्रदर्शनात भाग घेतला. त्यातून शेतकऱ्यांशी संवाद वाढला. मध्य प्रदेशातील काही शेतकऱ्यांनीही रोपांची मागणीही नोंदविली. प्रदर्शनात गुगलच्या प्रतिनिधींनी भेट घेऊन वेबसाईट सुरू करण्याचा सल्ला दिला. प्रतिनिधी क्षेत्रावर आले. आज वेबसाईटद्वारेही रोपांना मागणी होऊ लागली आहे. रोपनिर्मिती व फायदा (ठळक बाबी)
एक महिन्याचा कालावधी कमी होतो. रोपांची उगवण चांगली होते. उत्पादन खर्च कमी होऊन एकरी उत्पादनात वाढ होते. बेणे लागवड ते ऊस सव्वा महिन्याचा होईपर्यंत खर्च एकरी सुमारे १६ हजार येतो. तर सव्वा महिन्याच्या रोपलागवडीचा खर्च साडे ११ हजारांपर्यंत येतो. बेणेप्रक्रिया करण्यात येते. कोकोपीट आणि गांडुळखताचे ५०-५० टक्के मिश्रण ट्रे मध्ये भरले जाते. त्यानंतर बेणे डोळे लावण्यात येतात. कोंब आल्यानंतर ट्रे खुल्या वातावरणात ठेवले जातात. यानंतर एक किंवा सव्वा महिन्यानंतर रोपांची पाहणी करून त्यांचे विलगीकरण केले जाते. ट्रे मधील कमी वाढ झालेली रोपे काढून टाकली जातात. चांगली वाढ झालेली रोपे विक्रीसाठी पाठवली जातात. आई, पत्नी व भावाची मोलाची साथ
व्यवसाय वाढल्यामुळे अभिजित यांना सातत्याने फिरती असते. काहीवेळा चालक उपलब्ध नसेल तर स्वतः वाहन घेऊन रोपे घरपोच करण्याची जबाबदारी असते. या काळात आई विद्यादेवी आणि पत्नी किर्ती व्यवसाय सांभाळतात. सुमारे ४० ते ५० कामगारांचे नियोजन, रोजच्या कामांचे व्यवस्थापन या दोघी कुशलपणे सांभाळतात. बंधू अतूल माजी सरपंच असून शेती नियोजनात त्यांचीही मोठी मदत असते. या सर्वांच्या पाठबळामुळेच व्यवसाय आणखी वाढविण्यासाठी अभिजीत प्रयत्नशील आहेत. नुकतेच पॉलिहाऊससाठी घेतलेले कर्ज फिटले आहे हे सांगताना त्यांना समाधान होते. आपल्या संपूर्ण उसासाठी लागणारे गांडूळखत स्वतःच्या शेतातच तयार केले जाते. गावातील शेण खरेदी करून एका सपाट जागेवर पसरवून घेण्यात येते. त्यावर गांडुळ कल्चर सोडून उसाचे पाचट पसरण्यात येते. गरजेनुसार त्यावर पाणी फवारले जाते. या पद्धतीतून वर्षाला सुमारे १०० टन खताची निर्मिती होते. बाजारभावानुसार सहा रुपये प्रति किलोने मिळणारे खत निम्म्याहून अधिक दरात तयार करणे शक्य होते. अभिजित व त्यांचे बंधूही कुस्तीगीर आहेत. ८४ किलो वजनी गटात दोघांनीही यापूर्वी पहिल्या अग्रणी क्रमांक मिळवले आहेत. कुस्तीचा वडिलोपार्जित वारसा या कुटूंबाने जपला आहे. अभिजित यांचा पुतण्या पुणे येथे सहावीत शिकत असून त्यालाही कुस्तीची तालीम कोल्हापूर येथील वस्तादांकडून देण्यात येत आहे. संपर्कः अभिजित धुमाळ - ९५२७७८७१७१