नगरच्या हमीभाव केंद्रांवर अवघी ५०० क्विंटल खरेदी

हमी केंद्रावर अवघी पाचशे क्विंटल खरेदी
हमी केंद्रावर अवघी पाचशे क्विंटल खरेदी

नगर ः आधारभूत किमतीने मूग, उडीद सोयाबीनची खरेदी करण्यासाठी नगर जिल्ह्यामध्ये शासनाने नऊ हमी केंद्रे सुरू केली खरी, मात्र यंदा पहिल्यांदाच या हमी केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली आहे. आतापर्यंत ८ हजार ३७३ शेतकऱ्यांनी विक्री करण्यासाठी ऑनलाइन नोंदणी केली. मात्र, आतापर्यंत अवघ्या २२२ शेतकऱ्यांनी मूग, उडिदाची विक्री केली आहे. विशेष म्हणजे यंदा सोयाबीनची खरेदीच झाली नाही. माल विक्रीला आणा, असा संदेश देऊनही शेतकऱ्यांनी हमी केंद्राकडे पाठ फिरवल्याने प्रशासन अक्षरशः हतबल झाले आहे. खरेदी करण्याच्या अटीमुळेच पाठ फिरवली असल्याचे बोलले जात आहे.

शेतकऱ्यांच्या मालाची हमीदरानुसार खरेदी करणे बंधनकारक असताना व्यापारी कमी दराने खरेदी करत असल्याने मूग, उडीद, सोयाबीनसह अन्य शेतमालाची हमीदराने खरेदी करण्यासाठी जिल्ह्यामध्ये हमी केंद्रे सुरू झाली. यंदा त्यासाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशनने कृषी विभागाकडून उत्पादनाच्या शक्‍यतेची माहिती घेऊन खरेदी केंद्रे सुरू करण्याचे वरिष्ठांना कळवले होते.

त्यानुसार कर्जत, जामखेड, नगर, नेवासा, राहाता, राहुरी, पारनेर, श्रीरामपूर, श्रीगोंदा, नेवासा येथे खरेदी केंद्रे सुरू करण्याची दोन-अडीच महिन्यांपूर्वी मागणी केली होती. त्यासाठी शेतकऱ्यांकडून ऑनलाइन नोंदणी करून घेतली. नोंदणीला फारसा प्रतिसाद मिळाला नसल्याने सातत्याने मुदतवाढ करावी लागली होती. मात्र, सुरवातीला मागणी सातत्याने हमी केंद्राबाबत मागणी होत असताना, आता मात्र हमी केंद्राकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवल्याची स्थिती निर्माण झाली आहे.

जिल्हामध्ये नऊ ठिकाणी हमी केंद्रे सुरू केल्याचे जाहीर करण्यात आले असले, तरी आतापर्यंत फक्त चार केंद्रावरच मूग, उडिदाची खरेदी झाली आहे. सोयाबीनची तर एकाही क्विंटलची खरेदी झाली नाहीत, असे सांगण्यात आले. शेतकऱ्यांनी हमी केंद्रावर मूग, उडीद खरेदीसाठी आणावेत, असे अावाहन जिल्हा मार्केटिंग अधिकारी भारत पाटील यांनी केले आहे.

‘एसएमएस’ देऊन शेतकरी फिरकेनात जिल्ह्यामध्ये आतापर्यंत ८ हजार ३७३ शेतकऱ्यांनी विक्रीसाठी ऑनलाइन नोंदणी केली. आतापर्यंत तीन वेळा नोंदणीला मुदतवाढ मिळाली. अजूनही ३० नोव्हेंबरपर्यंत नोंदणी सुरू आहे. आतापर्यंत मुगाची विक्री करण्यासाठी १६१६, उडिदासाठी ६ हजार ५७८, सोयाबीनसाठी १७९ शेतकऱ्यांनी ऑनलाइन नोंदणी केली आहे. त्यातील जवळपास पाच हजार शेतकऱ्यांनी माल विक्रीला आणावा, यासाठी एसएमएस (मोबाईल संदेश) दिले आहे. मात्र, शेतकरी हमी केंद्राकडे फिरकायला तयार नाहीत.

शासनाने मुळात खरेदी केंद्रे सुरू करण्याला उशीर केला. त्यात खेरदी करण्यासाठी ज्या अटी घातल्या त्या किचकट आहेत. पैसेही वेळेवर मिळत नाहीत. त्यामुळे मानसिक त्रास सोसण्यापेक्षा विक्रीच करायची नको, अशी भूमिका घेतलेली दिसते. शासनाचीच याबाबत उदासीनता दिसते. - बाळासाहेब पटारे, विभागीय अध्यक्ष, शेतकरी संघटना

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com