पूरस्थिती हाताळण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवा ः थोरात

पूरस्थिती हाताळण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवा ः थोरात
पूरस्थिती हाताळण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवा ः थोरात

मुंबई ः राज्याच्या बहुतांश भागामध्ये अभूतपूर्व पूरस्थिती निर्माण झाली आहे. अनेक शहरांमध्ये आणि गावांमध्ये पुराचे पाणी शिरल्याने हजारो लोक बेघर झाले आहेत. आत्तापर्यंत पुरामुळे वीसहून अधिक नागरिकांचा बळी गेला आहे. लाखो जनावरे वाहून गेली आहेत. पूर परिस्थिती हाताळण्यात सरकार पूर्णपणे अपयशी ठरले आहे. सरकारने कुठलाही राजकीय अभिनिवेश न बाळगता पूरस्थिती हाताळण्यासाठी सर्वपक्षीय बैठक बोलवावी, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी केली.

थोरात म्हणाले, की भयंकर दुष्काळातून कसेबसे सावरत असताना राज्यावर पुराचे संकट ओढवले आहे. मुंबई, कोकणासह, उत्तर महाराष्ट्र व पश्चिम महाराष्ट्रातल्या बहुतांश भागांत जोरदार पाऊस झाल्याने पूरस्थिती निर्माण झाली आहे. गोदावरीला पूर आल्याने नाशिक शहरासह नदीकाठच्या अनेक गावांमध्ये पाणी शिरल्याने हजारो कुटुंबे उघड्यावर आली आहेत. कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात तर परिस्थिती अत्यंत गंभीर झाली आहे. कोल्हापूर शहराला पुराच्या पाण्याने वेढा घातला आहे. हजारो लोक बेघर झाले आहेत. सांगली, सातारा जिल्ह्यांतही तीच परिस्थिती आहे. गावे पाण्यात बुडाली आहेत. गृहोपयोगी सामान वाहून गेले आहे.

पुरामुळे पिकांची मोठी नासाडी झाली असून, पशुधन संकटात सापडले आहे. पूर परिस्थिती इतकी गंभीर आहे, की सरकारी यंत्रणेच्या मदतीपासून बहुतांशी नागरिक दूर आहेत. अनेक भागांत स्थानिक नागरिक आणि राजकीय पक्षाचे कार्यकर्तेच मदत आणि बचावकार्य करत आहेत. पुरामुळे अनेक भागांत पिण्याचे शुद्ध पाणीही लोकांना मिळत नाही ही परिस्थिती आहे. ज्या भागात पुराचे पाणी ओसरू लागले आहे त्या भागात रोगराई पसरण्याची शक्यता आहे. अशा संकटकाळात मदतकार्याची अपेक्षा आहे.

पण अनेक ठिकाणी प्रशासनाची मदत पोचत नाही. त्यामुळे सरकारने या अभूतपूर्व पूरस्थितीवर मात करण्यासाठी व लोकांना तात्काळ मदत पोचवण्यासाठी कोणताही राजकीय अभिनिवेश न बाळगता सर्वपक्षीय बैठक बोलवावी. यापूर्वीही राज्यावर जेव्हा संकटे आली तेव्हा त्या वेळच्या सरकारांनी अशा बैठका बोलावून सर्वांशी विचारविनिमय करून मदतकार्य गतिमान केल्याचे महाराष्ट्राने पाहिले आहे. 

या संकटकाळातून महाराष्ट्राला बाहेर काढण्यासाठी विरोधी पक्ष पूर्णपणे सरकारला मदत करायला तयार आहे. सरकारनेही आपण सगळे करतोय तेवढेच पुरेसे आहे किंवा योग्य आहे, असे समज करून न घेता सर्वांशी चर्चा करावी, असे थोरात म्हणाले आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com