देशातील गळीत हंगाम अंतिम टप्प्यात 

देशात साखर उत्पादनाची विक्रमी घोडदौड मार्चच्या मध्यापर्यंत सुरुच आहे. १५ मार्च अखेर देशात २५८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे.
Sugar Factory
Sugar Factory

कोल्हापूर: देशात साखर उत्पादनाची विक्रमी घोडदौड मार्चच्या मध्यापर्यंत सुरुच आहे. १५ मार्च अखेर देशात २५८ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. यंदा गेल्या वर्षीच्या तुलनेत ४२ लाख टनांनी उत्पादन वाढले आहे. या कालावधीत देशातील ५०२ पैकी १७१ साखर कारखान्यांचा हंगाम आटोपला आहे. 

देशातील गळीत हंगाम सुरु होऊन साडेसहा महिन्यांचा कालावधी लोटला आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सुरु असणारी साखर उत्पादनाची वाढ अंतिम टप्प्यातही कायम राहिली. सुरवातीच्या तीन महिन्यांत गेल्या वर्षीच्या तुलनेत २५ लाख टनांनी साखर उत्पादन वाढले होते. यात वाढ होत आता हे उत्पादन ४२ लाख टनांनी वाढले आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, उत्तर प्रदेशात झालेली साखर उत्पादन वाढ देशाचे उत्पादन वाढविण्यास कारणीभूत ठरली आहे. 

कर्नाटकातील हंगाम देशात पहिल्यांदा आटोपला आहे. राज्यातील ६६ पैकी ६२ साखर कारखान्यांनी आपला हंगाम संपविला. मार्च मध्यापर्यंतच्या आकडेवारीनुसार देशाच्या साखर उत्पादनात महाराष्ट्राचा दबदबा कायम राहिला आहे. या कालावधीत राज्यात ९४ लाख टनाचे साखर उत्पादन झाले आहे. ४८ कारखान्यांचा हंगाम संपला आहे महाराष्ट्रापाठोपाठ उत्तर प्रदेशात ८४ लाख टन साखरेचे उत्पादन झाले आहे. देशातील गळीत हंगाम हळूहळू अंतिम टप्प्यात येत आहे. 

साखर आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार या कालावधीत महाराष्ट्रात गेल्या वर्षीपेक्षा यंदा तब्बल ३९ लाख टनांनी साखरेच्या उत्पादनात वाढ झाली आहे. सोलापुरातील सर्वाधिक ३१ साखर कारखान्यांचा गळीत हंगाम संपला आहे. येत्या काही दिवसांत पुणे, सोलापूर, नगर, औरंगाबादमधील कारखाने जलद गतीने बंद होतील. कोल्हापूर विभागातील बहुतांशी कारखाने एप्रिलच्या पहिल्या सप्ताहात बंद होण्याची शक्‍यता आहे. साखर उद्योगातील सूत्रांच्या अंदाजानुसार यंदाच्या हंगामात राज्याचे साखर उत्पादन १०० लाख टनांपेक्षा जास्त होवू शकते.  ८० कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा  यंदा ३२५ कोटी लिटर इथेनॉल निर्मितीचे उद्दिष्ट केंद्राने देशातील कारखान्यांना दिले आहे. ८ मार्च अखेर ८० कोटी लिटर इथेनॉलचा पुरवठा कारखान्यांनी तेल कंपन्यांना केला आहे. पुरवठा केलेल्या इथेनॉलपैकी ७८ टक्के इथेनॉल हे उसाचा रस व बी-हेवी मोलॅसिस पासून तयार करण्यात आले आहे.  देशाच्या हंगामाची स्थिती (१५ मार्च अखेर) (उत्पादन लाख टन) 

राज्य साखर उत्पादन बंद कारखाने 
महाराष्ट्र ९४.०५ ४८ 
कर्नाटक ४१.३५ ६२ 
उत्तर प्रदेश ८४.२५ १८
गुजरात ८.४९ २ 

(आकडेवारी स्त्रोतः इस्मा) 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com