ऊस गाळप यंदा वाढणार 

गेल्या वर्षी महापूर व अवर्षणामुळे पिछाडीवर पडलेला राज्यातील साखर हंगाम यंदा उसळी घेण्याची शक्‍यता आहे.
Sugarcane
Sugarcane

कोल्हापूर: गेल्या वर्षी महापूर व अवर्षणामुळे पिछाडीवर पडलेला राज्यातील साखर हंगाम यंदा उसळी घेण्याची शक्‍यता आहे. ऊस पट्यांमधील जिल्ह्यांमध्ये यंदा पावसाने समाधानकारक हजेरी लावल्याने गाळपाबरोबर उसाचे एकरी टनेजही वाढण्याची शक्‍यता साखर उद्योगातून व्यक्त होत आहे. पश्‍चिम महाराष्ट्रात महापुराची शक्‍यता संपुष्टात आली, यामुळे संभाव्य नुकसान टळले याचा सकारात्मक परिणाम ऊस उत्पादन वाढीवर होणार असल्याचा अंदाज कारखाना प्रतिनिधींचा आहे. 

साखर आयुक्तालयाच्या अंदाजानुसार राज्यात यंदा ८१५ लाख टन ऊस गाळपासाठी उपलब्ध होणार आहे. गेल्या वर्षी राज्यात ५४५ लाख टन उसाचे गाळप झाले होते. पश्‍चिम महाराष्ट्रात महापूर तर उर्वरित राज्यात दुष्काळी परिस्थितीमुळे गेल्या हंगामात उसाचे मोठे नुकसान झाले. या पार्श्‍वभूमीवर यंदाचा हंगाम वाढीव उसाचा असणार आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत सुमारे २७० लाख टन उसाचे जादा गाळप होइल असा अंदाज आहे. वाढीव गाळप पहाता यंदा एकूण ९२ लाख टनापर्यंत साखर उत्पादन होवू शकेल. गेल्या वर्षी ६० लाख टन साखर उत्पादन झाले होते   

एकरी उत्पादनातही वाढ शक्‍य  यंदा राज्यातील ऊस पट्यात पावसाचे प्रमाण चांगले राहिले. जूनच्या उत्तरार्धापासून बहुतांशी ठिकाणी चांगला पाऊस झाला. यामुळे गाळपासाठी तयार होणाऱ्या उसाला याचा मोठा फायदा झाला. दहा ते पंधरा दिवसाच्या अंतराने दोन-तीन दिवस असे पावसाचे स्वरुप राहिल्याने उसाच्या वाढीवर याचा सकारात्मक परिणाम दिसून आला आहे. यामुळे सरासरी हेक्‍टरी पाच ते दहा टनापर्यंत उसाचे उत्पादन वाढू शकते असा अंदाज आयुक्तालयाचा आहे.   

उसाची लागवड २९ टक्‍यांनी वाढली  गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा ऊस लागवडीतही वाढ दिसून आली आहे. गेल्यावर्षी राज्यात ८.२२ लाख हेक्‍टर क्षेत्रावर ऊसाची लागवड होती. यंदा यात वाढ होवून ही ती १०.६६ लाखापर्यंत पोचली आहे. महापुराच्या तडाख्यानंतर अनेकांनी इतर पिकांऐवजी पुन्हा उसाला प्राधान्य दिल्याने पश्‍चिम महाराष्ट्रातील ऊस पट्यात उसाची लागवड वाढल्याचे कारखानदार प्रतिनिधींनी सांगितले. 

यंदा १९० साखर कारखाने हंगाम सुरु करण्याची शक्‍यता आहे. ऑनलाइन परवान्याची प्रक्रीया सुरु आहे. यंदाचा हंगाम १५ ऑक्‍टोबरपासून सुरु होण्याचे नियोजन आहे. कोविडचे संकट, कारखान्यांची तयारी, मजूरांची उपलब्धता यावरच यंदाचा हंगाम प्रत्यक्षात कधी सुरु होइल हे स्पष्ट होणार असल्याचे साखर उद्योगातील सुत्रांनी सांगितले. 

कोल्हापूर विभाग आघाडीवर राहणार  यंदा कोल्हापूर विभागातील कोल्हापूर सांगली जिल्ह्यात गाळपासाठी २.६९ लाख टन ऊस उपलब्ध होणार आहे. गेल्या वर्षी २.३० लाख हेक्‍टर क्षेत्र उसाखाली होते. यामुळे यंदाही उसाच्या गाळपात हे दोन्ही जिल्हे आघाडीवर रहातील, असा अंदाज साखर आयुक्तालयाचा आहे.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com