नदीकाठावरील ऊस वाहून गेला

बहे रामलिंग बेटाच्या परिसरातील शेकडो हेक्टरवरील ऊस कृष्णा नदीच्या पुरात वाहून गेल्याचे विदारक चित्र समोर येत आहे.
नदीकाठावरील ऊस वाहून गेला The cane from the river was carried away
नदीकाठावरील ऊस वाहून गेला The cane from the river was carried away

नेर्ले, जि. सांगली : बहे रामलिंग बेटाच्या परिसरातील शेकडो हेक्टरवरील ऊस कृष्णा नदीच्या पुरात वाहून गेल्याचे विदारक चित्र समोर येत आहे. वाळवा तालुक्यातील तांबवेपासून तब्बल एक किलोमीटरचे कृष्णा नदीचे पात्र पूर्णता भरून चालल्याचे दिसून येत आहे. या प्रवाहात अनेकांचे संसार वाहत होते. ऊस वाहून गेल्याने लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे.  नरसिंहपूर, शिरटे या गावाला जोडणाऱ्या पुलावरून कृष्णा नदीचे पाणी वाहत होते. या वेळी परिसरातील ऊस नदीच्या पुरामध्ये वाहून गेला आहे. त्यामुळे या वर्षी महापुरात ऊस शेतीला मोठा फटका बसणार आहे. शेतकऱ्यांच्या शेतीची मातीही पाण्याबरोबर वाहून गेली आहे. पात्र रुंद झाले आहे. त्यामुळे शेतीचे मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झाले आहे. तांबवे, बहे, बोरगाव या गावांना आपल्या कवेत घेत कृष्णानदी सांगलीकडे प्रवाहीत होत आहे. रेठरे हरणाक्ष, गौडवाडी, जुनेखेड, वाळव्यासह इतर गावे देखील कृष्णा नदीने नदीच्या पाण्याने वेढलेली दिसून येतात. पेठ, वाटेगाव, नेर्ले, कासेगाव या गावांना तिळगंगा ओढ्यामुळे मोठे नुकसान झाले आहे. घरात पाणी शिरून संसार साहित्य वाहून गेले आहे. त्यामुळे नदीकाठवरील लोकांचे मोठे नुकसान झाले आहे.

धरणांतील पाणीसाठा वारणा धरणात रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत ३१.२५ टीएमसी पाणीसाठा झाला असून, या धरणाची साठवण क्षमता ३४.४० टीएमसी इतकी असल्याचे जलसंपदा विभागाने कळविले आहे. विविध धरणातील पाणीसाठा व कंसात साठवण क्षमता टीएमसी प्रमाणात पुढीलप्रमाणे, कोयना ८८.४४ (१०५.२५), धोम १०.७१ (१३.५०), कन्हेर ७.६९ (१०.१०), दूधगंगा  १९.९३ (२५.४०), राधानगरी ८.२२ (८.३६), तुळशी ३.१८ (३.४७), कासारी २.१८ (२.७७), पाटगांव ३.२८ (३.७२), धोम बलकवडी ३.४७ (४.०८), उरमोडी ७.०६ (९.९७), तारळी ५.०६ (५.८५), अलमट्टी  ७३.३१ (१२३).

असा सुरू आहे विसर्ग  रविवारी सकाळी ८ वाजेपर्यंत विविध धरणातून सांडवा, कालवा व विद्युतगृहाद्वारे सोडलेला विसर्ग क्युसेक्समध्ये पुढीलप्रमाणे- कोयना ३१,३३२, धोम ७,१२३, कण्हेर ५,२३७, वारणा ८,७२०, दुधगंगा १,०००, राधानगरी १,४००, धोम बलकवडी १,६६९, उरमोडी १,२५१, तारळी ४,१६० व अलमट्टी २ लाख ५० हजार क्युसेक्सने विसर्ग आहे.

प्रतिक्रिया कृष्णा नदीकाठच्या गावातील लोकांचे स्थलांतर करीत आहोत. शेतीच्या बाबतीत किती नुकसान झाले आहे, या बाबत माहिती घेण्याचे आदेश स्थानिक प्रशासनाला दिले आहेत. - रवींद्र सबनीस, तहसीलदार, वाळवा

राधानगरी धरण भरले कोल्हापूर : राधानगरी धरण उच्चत्तम पातळीपर्यंत भरले असून, धरणाचे दोन स्वयंचलित दरवाजे रविवारी (ता.२५) दुपारी खुले झाले आहेत. प्रत्येक दरवाजातून १४२८ प्रमाणे २८५६ क्युसेक व वीजनिर्मितीसाठी १४०० क्युसेक, असे एकूण ४२५६ क्युसेकचा विसर्ग भोगावती नदीत सुरू झाला आहे. पावसाचा जोर कमी असला तरी अधुनमधून सरी पडत आहेत. धरणाची दुपारी ३ वाजता पाणीपातळी ३४७.३७ फूट होती. गेट खुले होण्यासाठी अजून ०.१३ ने पाणी पातळी कमी होती. एखादा स्वयंचलित दरवाजा खुला झाला की, धरण भरले, असे समजले जाते. ३४७.५० फुटांवर पाणी आले की, ही स्थिती येते. दुपारी तीन नंतर पाणलोट क्षेत्रात पाऊस वाढल्याने पातळी वाढली व पाठोपाठ दोन दरवाजे खुले झाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com