नगर जिल्ह्यात आणखी ५० हजार जनावरे छावण्यांमध्ये होतील दाखल

संग्रहित छायाचित्र
संग्रहित छायाचित्र

नगर ः दुष्काळाच्या झळा सोसत असलेल्या नगर जिल्ह्यामधील ४६० गावांत आतापर्यंत जनावरांच्या छावण्या सुरू झालेल्या आहेत. अजून साधारण ५० हजार जनावरे नव्याने छावण्यांमध्ये दाखल होतील. त्या अनुषंगाने शंभर छावण्या सुरू होतील, असा अंदाज प्रशासनाकडून व्यक्त केला जात आहे. आतापर्यंत सुरू झालेल्या सर्व छावण्या दक्षिण नगरमधील असून, उत्तर नगरमध्ये दुष्काळग्रस्त गावे जाहीर केली असले तरी अजून एकही छावणी सुरू झालेली नाही. 

नगर जिल्ह्यात यंदा दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. गतवर्षी पुरेसा पाऊस नसल्याने खरीप, रब्बीची पिके आली नाहीत. त्यामुळे चाऱ्याचा प्रश्न गंभीर आहे. शासनाने दुष्काळ जाहीर केला. दुष्काळग्रस्त भागातील जनावरे जगविण्यासाठी चारा छावण्या सुरू केल्या आहेत. जिल्ह्यात साधारण १८ लाख जनावरे आहेत. आतापर्यंत ४९० छावण्यांना मंजुरी मिळालेली असून ४६० छावण्या प्रत्यक्षात सुरू झालेल्या आहेत. सध्या या छावण्यांमध्ये २ लाख ८५ हजार जनावरे आहेत. मात्र, दुष्काळाची तीव्रता पाहता अजूनही जिल्हाभरातील अनेक गावांत छावण्यांची प्रतीक्षा आहे.

जिल्ह्यातील ११ तालुक्यांत प्रशासनाने तीव्र दुष्काळ जाहीर केला आहे. सध्या दक्षिण नगर जिल्ह्यातील अनेक भागात जनावरांच्या छावण्या सुरू आहेत. अजून जिल्हाभरात साधारण ५० हजारांच्या जवळपास जनावरे चारा छावणीत दाखल होतील, असा प्रशासनाचा अंदाज आहे. त्यामुळे अजून साधारण शंभराच्या जवळपास छावण्या सुरू होतील. प्रशासनाच्या नियोजनानुसार ३० जूनपर्यंत म्हणजे अजून साठ दिवस छावण्या सुरू राहणार आहेत.

जिल्ह्यातील दक्षिण भागाप्रमाणेच उत्तर भागातही दुष्काळाची तीव्रता अधिक आहे. या भागात २०१२ मध्ये लोणी, संगमनेर कारखाना व वेल्हाळे (संगमनेर) येथे तीन जनावरांच्या छावण्या सुरू झाल्या होत्या. यावर्षी त्यावेळपेक्षाही परिस्थिती गंभीर आहे. अकोले, श्रीरामपूर, कोपरगाव तालुक्यांतील काही गावांत दुष्काळ जाहीर केलेला आहे. या तालुक्याला भंडारदरा, निळवंडे धरणातून पाणी मिळते. यंदा मात्र धरणातच पुरेसे पाणी नाही. दुष्काळ जाहीर झालेला नसला तरी हा भागही दुष्काळाची तीव्रता सहन करीत आहे. मात्र या भागातील एकाही गावात जनावरांच्या छावण्या सुरू झालेल्या नाहीत. मागणी नसल्याने छावण्या सुरू झालेल्या नाहीत. राहुरी तालुक्यातून एका गावांत छावणी सुरू करण्याबाबत ग्रामपंचायतीने परवानगी मागीतलेली होती. मात्र ग्रामपंचायतीला छावणी सुरु करण्यासाठी परवानगी देत नसल्याने छावणी सुरू झाली नाही, असे प्रशासनाकडून सांगण्यात आले.  मुरघासमुळे चाराटंचाई नाही जिल्ह्याच्या उत्तर भागातील शेतकऱ्यांनी यंदा दुष्काळाची तीव्रता  ओळखून मुरघास तयार करण्याला प्राधान्य दिलेले आहे. त्यामुळे यंदा या भागात चाराटंचाई नाही. नेमका किती मुरघास सध्या तयार आहे याची माहिती नसली चाराटंचाई निर्माण होणार नाही, असे अधिकारी सांगत आहेत. असे असले तरी ज्या शेतकऱ्यांकडे चारा नाही त्यांना मात्र दुष्काळाच्या झळा सोसाव्याच लागत आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com