मुंबई : भारतीय संविधानाचे शिल्पकार, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला शुभेच्छा दिल्या असून ‘कोरोना’च्या संकटामुळे आंबेडकर जयंती यंदा ‘डिजिटल’ माध्यमातून साजरी करावी, असं आवाहन केले आहे.
उपमुख्यमंत्री पवार यांनी शुभेच्छा संदेशात महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या कार्याचे, विचारांचे स्मरण करून त्यांना विनम्र अभिवादन केले आहे. डॉ. बाबासाहेब हे द्रष्टे विचारवंत, कृतीशील नेते होते. भारतीय राज्यघटनेच्या माध्यमातून त्यांनी राष्ट्रउभारणीत दिलेले योगदान अजरामर राहणार आहे. समाजातील दुर्बल, वंचित, उपेक्षित घटकांना त्यांनी आत्मसन्मान व समानतेची संधी मिळवून दिली. ताठ मानेने जगण्याची ताकद दिली. डॉ. आंबेडकर हे त्यांच्या विचारांनी, कार्याने महामानव ठरले आहेत. एकता, समता, बंधुतासारखे त्यांचे मानवतावादी, सुधारणावादी विचारच आपल्या सर्वांना पुढे नेतील, अशा शब्दात उपमुख्यमंत्र्यांनी त्यांच्याबद्दलचा आदर व्यक्त केला.
डॉ. आंबेडकर यांच्या उदारमतवादी विचारांचे, मानवतावादी शिकवणींचे पालन करुन देशहितासाठी, समाजाच्या भल्यासाठी आपण सर्वजण उद्या, घरातच थांबून त्यांची जयंती साजरी करू. त्यांना अभिवादन करू. डॉ. आंबेडकर यांना अभिवादन करतानाची छायाचित्रे, ध्वनिचित्रफिती समाजमाध्यमांवर टाकून त्यांच्याबद्दलचा आदर व ‘कोरोना’विरुद्धच्या लढाईतील आपली एकजूट दाखवून देऊया. असे आवाहनही उपमुख्यमंत्र्यांनी केले आहे.
‘कोरोना’विरुद्धची लढाई आता गंभीर वळणावर आली असून ३० एप्रिलपर्यंत वाढवलेली टाळेबंदी आपल्या सर्वांचा जीव वाचवण्यासाठीच आहे. सरकारच्या या निर्णयाचा आदर राखून सर्वांनी घरातच रहा, सुरक्षित रहा असेही उपमुख्यमंत्र्यांनी आपल्या शुभेच्छा संदेशात म्हटले आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.