औरंगाबाद : केंद्रीय पथकाने अनुभवली पीक नुकसानीची दाहकता

सिल्लोड तालुक्यातील वांजोळा शिवारात सुभाष बमनावत (उजवीकडून पाहिले)  केंद्रीय समितीला आले पिकाचे नुकसान दाखवून स्थिती मांडताना.
सिल्लोड तालुक्यातील वांजोळा शिवारात सुभाष बमनावत (उजवीकडून पाहिले) केंद्रीय समितीला आले पिकाचे नुकसान दाखवून स्थिती मांडताना.

औरंगाबाद  : मराठवाड्यात केंद्राच्या द्विसदस्यीय समितीने पावसामुळे झालेल्या नुकसानीची दाहकता दौऱ्याच्या पहिल्याच दिवशी औरंगाबाद जिल्ह्यात अनुभवली. शेतात केंद्रीय समिती दाखल होताच गेवराई सेमी येथील मुरलीधर कापडे यांनी टाहो फोडत ‘‘पावसामुळे आमची कपाशी गेली, मका गेली, जे दिसतंय त्याला कोंब फुटलेत,’’ अशी कैफियत मांडून आपल्या भावनांना वाट मोकळी करून दिली.

ऑक्टोबर-नोव्हेंबरमध्ये अतिवृष्टीने झालेल्या नुकसानीची केंद्राच्या द्विसदस्यीय समितीने शुक्रवारी (ता.२२) पाहणी केली. डॉ. व्ही. तिरूपुगाझ व डॉ. के. नारायणन यांचा या पथकात समावेश आहे. विभागीय आयुक्तालयात आयुक्त सुनील केंद्रेकर यांनी कृषी, महसूल विभागाच्या उपस्थितीत मराठवाड्यात झालेल्या नुकसानीचे सादरीकरण केले. त्यानंतर पथकाने आयुक्त केंद्रेकर, औरंगाबादचे जिल्हाधिकारी उदय चौधरी, विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव दिवेकर, अधीक्षक कृषी अधिकारी डॉ. तुकाराम मोटे, जिल्हा परिषद कृषी विकास अधिकारी आनंद गंजेवार आदींसह औरंगाबाद जिल्ह्यातील नुकसानीची पाहणी केली. 

चौका येथील कांचनबाई वाघ यांच्या शेतात मका पिकाची, लहानाची वाडी शिवारातील कृष्णा जाधव यांच्या कपाशी पिकाची तर पाथरी येथील प्रदीप पाथरीकर यांच्याही कपाशी नुकसानीची पाहणी केली. त्यानंतर गेवराई सेमी शिवारात पथक दाखल होताच मुरलीधर कापडे, साहेबराव ताठे भावुक झाले. ‘‘नुकसान न भरून निघणारं झालं. कपाशी गेली, मका गेली, जे दिसतंय त्याला कोंब फुटले. सारं संपलं साहेब,’’ अशी व्यथा त्यांनी मांडली. निल्लोड येथील रामेश्वर आहेर यांच्या शेतीची पाहणी केल्यानंतर पथक सिल्लोड तालुक्यातील वांजोळा शिवारातील विष्णू पंडित, सुभाष बमनावत यांच्या शेतात दाखल झाले.

बमनावत म्हणाले, की लाख रुपयांची बैलजोडी घेतली, तिला खायला घालायला चारा नाही. पदरात काही पडलं नाही. मका सोंगायची गरज पडली नाही, तर अद्रक सडून चालली. मुलीचं लग्न करायचं, काय करावं हा प्रश्न आहे. त्यांच्या सोबत असलेल्या शेतकऱ्यांनी ‘‘नुकसानीची मदत देताना दोन हेक्टरची मर्यादा का घातली. मोठ्या शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालंय, साहेब हे बरं नाही, केंद्राकडे हे मांडा, विम्याचा परतावा शंभर टक्के मिळेल असं काही करा,’’ अशी विनंती पथकाकडे केली.

भराडी येथील नुकसानीची पाहणी करून पथक कन्नड तालुक्याच्या दिशेने रवाना झाले. समिती शनिवारी (ता. २३) बीड जिल्ह्यात तर रविवारी (ता. २४) जालना जिल्ह्यात नुकसानीची पाहणी करणार आहे. तीन जिल्ह्यांत होणाऱ्या पाहणीनंतर प्रशासनाकडून या संपूर्ण दौऱ्याविषयी माहिती दिली जाण्याची शक्यता आहे.

नियोजित दौऱ्यात बदल केंद्रीय पथकाच्या नुकसान पाहणी दौऱ्यात समिती सदस्यांच्या सूचनेवरून बदल करण्यात आला. अचानक सिल्लोड तालुक्यातील निल्लोड व वांजोळ शिवारातील नुकसानीची पाहणी पथकाने केली. पाहणी करताना पथकातील सदस्य सात बारा उतारा, पेरा, गट नंबर आदी बाबी तपासत होते. शिवाय शेतकऱ्यांकडून प्रत्यक्ष माहिती जाणून घेत होते. जिल्हाधिकारी उदय चौधरी शेतकरी देत असलेली माहिती समिती सदस्यांना इंग्रजीतून सांगत होते. विभागीय आयुक्त श्री. केंद्रेकर शेती पिकांची अवस्था, शेतकऱ्यांसमोरील प्रश्न आदी समिती सदस्यांना सांगत होते.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com