तूर, मूग, उडीद आयातीची प्रक्रिया सुरू; बाजारावर परिणाम कमीच

केंद्र सरकारने पंचवार्षिक करार करून म्यानमार आणि मालावी देशातून तूर, मूग आणि उडीद आयातीची प्रक्रिया सुरू केली आहे. शेतकऱ्यांचा मूग आणि उडीद सध्या बाजारात येत असून, आवकेचा हंगाम अद्याप पुढे आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयावर टीका होत आहे.
तूर, मूग, उडीद आयातीची प्रक्रिया सुरू; बाजारावर परिणाम कमीच
तूर, मूग, उडीद आयातीची प्रक्रिया सुरू; बाजारावर परिणाम कमीच

पुणे : केंद्र सरकारने पंचवार्षिक करार करून म्यानमार आणि मालावी देशातून तूर, मूग आणि उडीद आयातीची प्रक्रिया सुरू केली आहे. शेतकऱ्यांचा मूग आणि उडीद सध्या बाजारात येत असून, आवकेचा हंगाम अद्याप पुढे आहे. त्यामुळे सरकारच्या या निर्णयावर टीका होत आहे. सरकारने हा निर्णय घेतला असला तरी देशांतर्गत उत्पादनाबाबतची अनिश्‍चितता, नगण्य शिल्लक साठा आदी कारणांमुळे बाजारात परिणाम होण्याची शक्यता कमीच असल्याचे मत जाणकारांनी व्यक्त केले आहे. भारताने म्यानमार आणि मालावी या देशांशी पाच वर्षांचा आयातीचा सामंजस्य करार करून आयातीसाठी देशाची दारे खुली होती. या करारानुसार पुढील पाच वर्षे (२०२५-२६) देशात दरवर्षी म्यानमार देशातून अडीच लाख टन उडीद, एक लाख टन तूर आणि मालावी देशातून ५० हजार टन तूर आयातीला परवानगी दिली आहे. त्यानुसार विदेश व्यापार महासंचालनालयाने ६ सप्टेंबर रोजी काढलेल्या नोटिफिकेशननुसार आयातीची प्रक्रिया सुरू केली आहे. भारताने २४ जून रोजी हा पंचवार्षिक आयातीचा करार केला होता. त्यानुसार दरवर्षी खासगी व्यापाऱ्यांच्या मार्फत आयात केली जाणार आहे. देशातील मुंबई, कोलकाता, तुतिकोरीन, चेन्नई आणि हजिरा या बंदारांवर ही आयात होणार आहे. सरकारने जून महिन्यात हे करार केले मात्र नेमका शेतकऱ्यांचा मूग आणि उडीद बाजार येण्याच्या दिवसांत आयातीची प्रक्रिया सुरू केल्याने शेतकऱ्यांसह अभ्यासकांनी नाराजी व्यक्त केली आहे. सरकारने एकतर त्याच वेळी ही प्रक्रिया करण्याची गरज होती किंवा शेतकऱ्यांचा माल बाजार येऊन गेल्यानंतर ही प्रक्रिया का केली नाही, असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करत आहेत. बाजारावर फारसा परिणाम होणार नाही शेतीमाल बाजार विश्‍लेषक आणि अभ्यासक राहुल चौहान म्हणाले, की सरकारने पंचवार्षिक करार केल्यानंतर सर्वांना माहीत होते, की देशात आयात होणार आहे. त्यामुळे या निर्णयाने फारसा पॅनिक होईल असे वाटत नाही. देशात उडदाचे उत्पादन गरजेपेक्षा कमी होते. त्यामुळे दरवर्षी आयात करूनच गरज भागवावी लागते. जागतिक पातळीवर उडदाचे उत्पादन घटत आहे. त्यामुळे पंचवार्षिक करार करून सरकारने तेथील शेतकऱ्यांना खरेदीचे आश्‍वासन दिले आहे. यंदाही देशात उत्पादनाबाबत स्पष्टता नसल्याने दरावर फारसा परिणाम होईल असे वाटत नाही. जाणकारांच्या मते या कारणांमुळे बाजारावर परिणाम होणार नाही...

  • पेरणी उशिरा झाल्याने उत्पादकतेबाबत अस्पष्टता
  • मूग आणि उडीद काढणीच्या काळात सुरू असलेला पाऊस
  • अनेक भागांत अतिपाऊस, दुष्काळ, पावसाचा ताण याचा पिकावर झालेला परिणाम
  • गत हंगामातील नगण्य शिल्लक साठा
  • आयात होणाऱ्या देशांत उपलब्धही कमीच
  • देशातील उडीद आयात (टनांत)

  • एप्रिल २०१९ ते मार्च २०२० : ३ लाख १२ हजार
  • एप्रिल ते जुलै २०२१ : १ लाख ४१ हजार
  • देशातील तूर आयात (टनांत)

  • एप्रिल २०१९ ते मार्च २०२० : ४ लाख ४९ हजार
  • एप्रिल ते जुलै २०२१ : ८३ हजार
  • शेतकरी आणि जाणकार यांनी उपस्थित केलेले प्रश्‍न

  • आयातीचे करार करून सरकार त्या देशांतील शेतकऱ्यांना खरेदीची शाश्‍वती देते. मात्र देशातील शेतकऱ्यांचा माल हमीभावाने खरेदी करत नाही. सरकार देशातील शेतकऱ्यांना संपूर्ण कडधान्ये हमीभावाने खरेदीची शाश्‍वती का देत नाही?
  • देशांतर्गत बाजारात कडधान्याचे दर हमीभावाच्या खालीच आहेत. अपवाद वगळता दर हमीभावाचे वर गेलेच नाहीत. त्यामुळे आयातीचा निर्णय आताच का घेतला?
  • आयातीच्या निर्णयामुळे शेतकऱ्यांना मिळणारा दर कमी झाला, मात्र ग्राहकांना डाळींसाठी द्यावा लागणारा दर कमी झाला नाही. त्यामुळे हा निर्णय नेमका कुणाच्या भल्यासाठी घेतला.
  • देशांतर्गत बाजारात मालाचा तुटवडा होऊन दर वाढतात, त्या वेळी मात्र सरकार आयात करत नाही तर शेतकऱ्यांचा माल बाजारात येण्याच्या काळात असा निर्णय घेतला जातो. त्यामुळे शेतकऱ्याचे दर पाडले जातात.  
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com