केंद्र सरकार शेतकऱ्यांना आत्मनिर्भर करणार ः चौधरी

शेतकऱ्यांना संघटित करीत त्यांना देखील शेतीमालाचे दर ठरविता यावे याकरिता देशात दहा हजार शेतकरी उत्पादक कंपन्यांची उभारणी केली जाणार आहे.
award
award

नागपूर : शेतकऱ्यांना संघटित करीत त्यांना देखील शेतीमालाचे दर ठरविता यावे याकरिता देशात दहा हजार शेतकरी उत्पादक कंपन्यांची उभारणी केली जाणार आहे. शेतकरी कंपन्यांनी उभारलेल्या भांडवलाच्या इतकीच रक्कम केंद्र सरकार यात हिस्सा म्हणून टाकेल. शेतकरी आत्मनिर्भरतेच्या दिशेने हे पाऊल असल्याचे मत केंद्रीय कृषिराज्यमंत्री कैलास चौधरी यांनी व्यक्त केले. 

भारतीय कृषी संशोधन परिषदेअंतर्गत असलेल्या भारतीय कृषी संशोधन संस्थेचे (आय.ए. आर.आय.) वार्षिक पुरस्कारांचे वितरण करताना शनिवारी (ता. २७) ते बोलत होते. देशभरातील ३५, तर महाराष्ट्रातील तीन नावीन्यपूर्ण शेतकऱ्यांचा या वेळी सन्मान करण्यात आला. ‘आयसीएआर’चे महासंचालक त्रिलोचन महापात्रा, संस्थेचे संचालक ए. के. सिंग, इंद्र मणि मिश्र यांच्या उपस्थितीत या पुरस्कारांचे वितरण झाले. 

मंत्री चौधरी पुढे म्हणाले, की केंद्र सरकारचे कृषी कायदे शेतकरी हिताचे आहेत. त्यांना काळे कायदे म्हणून हिणवले जाते. त्यात काळेबेरे काय आहे? हे मात्र आजपर्यंत कुणालाच सांगता आले नाही. केंद्र सरकारने शेतकरी हिताकरिता बजेटमध्ये तरतूद वाढविली आहे. ७५ हजार कोटी रुपये एकट्या किसान सन्मान योजनेवर खर्ची घातले जातात. त्यामुळेच केंद्र सरकार शेतकरी हिताला बांधील आहे हे सिद्ध होते.  त्रिलोचन महापात्रा यांनी शेतकरी आणि शास्त्रज्ञ संवाद वाढल्यास शेतकऱ्यांना नेमके काय हवे हे जाणता येईल अशी अपेक्षा व्यक्त केली. 

शेतीमध्ये यांत्रिकीकरण, पूरक व्यवसायाची जोड, शेतीमालाचे थेट मार्केटिंग अशा विविध पातळींवर काम करणाऱ्या देशभरातील शेतकऱ्यांना नावीन्यपूर्ण शेतकरी पुरस्काराने गौरविण्यात येते. दरवर्षी २५ ते २७ फेब्रुवारीदरम्यान आयोजित मेळाव्याच्या दरम्यान या पुरस्कारांचे वितरण केले जाते. गुरुवारी केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांच्या हस्ते मेळाव्याचे उद्‍घाटन झाले. या मेळाव्याच्या समारोपीय सत्रात देशभरातील ३५ शेतकऱ्यांना गौरविण्यात आले. त्यामध्ये आसाम आंध्र प्रदेश, छत्तीसगड, नागालँड, हिमाचल प्रदेश, हरियाना, उत्तराखंड, तेलंगणा, पश्‍चिम बंगाल, झारखंड प्रत्येकी एक, गुजरात, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, ओडिशा, पंजाब, प्रत्येकी दोन, राजस्थान, उत्तर प्रदेश चार अशा ३५ शेतकऱ्यांचा समावेश आहे.  महाराष्ट्रातील तिघांचा सन्मान  देशभरातील ३५ शेतकऱ्यांसोबत महाराष्ट्रातील तीन शेतकऱ्यांना यावेळी गौरविण्यात आले. त्यामध्ये नावीन्यपूर्ण शेतकरी गटात धाकली (अकोला) येथील विनोद इंगोले, कृषी माउली शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष रामदास ऊर्फ दिलीप फुके (चांभई, ता. मंगरूळपीर, वाशीम) तसेच अध्येता पुरस्कारार्थी रवींद्र मेटकर (अंजनगावबारी, अमरावती) यांचा समावेश आहे.   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com