म्हैसाळ योजनेचे आवर्तन बंद होण्याची शक्यता

म्हैसाळ योजनेचे आवर्तन बंद होण्याची शक्यता
म्हैसाळ योजनेचे आवर्तन बंद होण्याची शक्यता

सांगली ः तब्बल आठ महिने सुरू असलेले म्हैसाळ योजनेचे आवर्तन पाऊस सुरू झाल्याने पुढील आठवड्यात बंद होण्याची शक्यता आहे. गतवर्षी ऑक्टोबरपासून सुरू झालेल्या म्हैसाळ योजनेतून तब्बल १३ टीएमसी पाणी उपसा करून मिरज, कवठेमहांकाळ व जत तालुक्यांत पिण्यासाठी व सिंचनासाठी पाणीपुरवठा करण्यात आला. म्हैसाळच्या पाण्याचे ४० कोटी रुपये वीजबिल झाले आहे.

मिरज, कवठेमहांकाळ व जत तालुक्यांत पाणीटंचाईमुळे गतवर्षी ऑक्टोबरमध्ये म्हैसाळचे आवर्तन सुरू करण्यात आले. म्हैसाळचे आवर्तन सुरू झाल्यानंतर पाच टप्प्यात सुमारे ७५ पंपांद्वारे उपसा करून जतपर्यंत पाणी पोचविण्यात आले. मार्च महिन्यात मुख्य कालव्याच्या अस्तरीकरणाच्या कामासाठी आवर्तन बंद ठेवण्यात आले.

एप्रिल महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पुन्हा आवर्तन सुरू केले. आवर्तन सुरू असताना जत तालुक्यात पाणी द्या, अशी मागणी  केली. त्यामुळे मुख्य कालव्यातून जतला विसर्ग सुरू आहे. आजही योजनेतून जत तालुक्यात पाणी दिले जाते आहे. पोटकालव्यासह डोंगरवाडी, गव्हाण यासह सिंचन योजना सुरू आहेत.

ऐन उन्हाळ्यात तीन तालुक्यांतील १६४ गावांतील तलाव म्हैसाळच्या पाण्याने भरण्यात आल्याने पिण्याच्या पाण्याची व्यवस्था झाली. परंतु या १६४ गावांतील तलावातील पाणीसाठा कमी झाला आहे. त्यामुळे भविष्यात पाणीटंचाई भासणार आहे. जिल्ह्यात पावसाला प्रारंभ झाला आहे. गेल्या चार दिवसांत जत, तासगाव, कवठेमहांकाळ तालुका वगळता चांगला पाऊस झाला आहे. त्यामुळे पाटंबधारे विभागाने या योजनेचे आवर्तन बंद करण्याचा निर्यण घेतला आहे. 

वास्तविक पाहता जिल्ह्यात अद्यापही जोरदार पाऊस नाही. मिरज, वाळवा, शिराळा, पलूस, तालुक्यांत दमदार पावसाने हजेरी लावली आहे. परंतु दुष्काळी पट्ट्यात अद्यापही अपेक्षित पाऊस झाला नाही. या गावात आजही पाणीटंचाई आहे. पाटंबधारे विभागाने घेतलेल्या निर्णयानुसार योजना बंद केली तर दुष्काळी पट्ट्यातील शेतकऱ्यांना पाणी मिळणार नाही. त्यामुळे ही योजना अजून सुरू ठेवावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

आठ कोटी भरावे लागणार आठ महिन्यांचे सुमारे ४० कोटी रुपये वीजबिल असून, यापैकी १९ टक्के म्हणजे आठ कोटी रुपये शेतकऱ्यांना भरावे लागणार आहेत. लाभार्थी शेतकऱ्यांकडून सुमारे अडीच कोटी रुपये जमा झाले आहेत. दोन टप्प्यांत आठ महिने आवर्तन सुरू ठेवण्याची ही पहिलीच वेळ असून, जूनच्या अखेरीस पाऊस सुरू झाला आहे. पाऊस सुरू राहिल्यास पुढील आठवड्यात आवर्तन बंद होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com