काळजी घ्या ! 'चंद्र'पूर ठरले जगातील सर्वांत उष्ण ठिकाण !!

'चंद्र'पूर ठरले जगातील सर्वांत उष्ण ठिकाण !
'चंद्र'पूर ठरले जगातील सर्वांत उष्ण ठिकाण !

पुणे : सूर्य चांगलाच तापदायक ठरत असल्याने शुक्रवारी (ता. १२) सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये चंद्रपूर जगातील सर्वांत उष्ण ठिकाण ठरले आहे. चंद्रपूर येथे तापमानाचा पारा हंगामातील उच्चांकी ४५.२ अंशांवर पोचला आहे. जागातील सर्वांधिक तापमान असलेल्या पहिल्या दहा ठिकाणांमध्ये चंद्रपूरसह विदर्भातील अकोला, अमरावती, वर्धा, ब्रह्मपुरी या पाच शहरांचा समावेश आहे. ‘अलडोरॅडो वेदर’ या हवामानविषयक माहिती देणाऱ्या संकेतस्थळावर याबाबत नोंद घेण्यात आली आहे.   विदर्भात उन्हाच्या झळा चांगल्याच वाढल्या असल्याने अकोला ४४.३, अमरावती ४४.२, वर्धा येथे ४४.० अंश सेल्सिअस, तर ब्रह्मपुरी ४३.८ अंश, नागपूर ४३.५ अंश तापमानाची नोंद झाली आहे. मराठवाड्यातील परभणी ४३.८ आणि नांदेड ४३.०, तर मध्य महाराष्ट्रातील जळगाव ४३.०, सोलापूर ४३.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद होत चटका वाढला आहे. शुक्रवारी सकाळपर्यंतच्या २४ तासांमध्ये धुळे, मालेगाव, बीड, वाशीम, यवतमाळ येथेही तापमान ४२ अंशापेक्षा अधिक होते.

दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि परिसरावर चक्राकार वारे वाहत असून, या स्थितीपासून कोमोरीन भागापर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. यामुळे पूर्वमोसमी पावसाला पोषक हवामान आजपासून (ता. १३) मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाड्यात तर उद्यापासून कोकणात वादळी पावसाची शक्यता आहे. मंगळवारपर्यंत (ता. १६) विदर्भात सर्वच जिल्ह्यांत मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांत पावसाचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

शुक्रवारी (ता. १२) सकाळी साडेआठ वाजेपर्यंतच्या २४ तासांत राज्यातील विविध ठिकाणचे कमाल तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत वाढ, घट (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ४०.७ (३.१), धुळे ४२.२, जळगाव ४३.० (१.७), कोल्हापूर ३९.७ (२.६), महाबळेश्वर ३४.६ (२.९), मालेगाव ४२.२ (२.३), नाशिक ३८.९ (१.२), सांगली ४१.३ (३.०), सातारा ४०.६ (३.९), सोलापूर ४३.० (३.०), डहाणू ३२.९ (०.४), सांताक्रूझ ३३.० (०.४), रत्नागिरी ३३.५ (१.५), औरंगाबाद ४१.२ (२.७), बीड ४२.५ (३.२), नांदेड ४३.० (२.०), परभणी ४३.८ (३.३), अकोला ४४.३ (३.६), अमरावती ४४.२ (३.०), बह्मपुरी ४३.८ (३.३), चंद्रपूर ४५.२ (३.८), गोंदिया ४१.० (०.८), नागपूर ४३.५ (३.०), वाशीम ४२.२, वर्धा ४४.० (२.९), यवतमाळ ४२.५ (२.२). 

उन्हाचा पिकांवर होणार परिणाम  तापमानात वाढ झाल्यामुळे पिकांच्या पानांतून बाष्प उत्सर्जन जास्त प्रमाणात होते. त्यामुळे पिके कोमेजलेली दिसतात. वाढीवर परिणाम होतो. फळ पिकांमध्ये उष्णतेचा ताण बसल्याने फळगळ दिसून येते.  उपाय :  शक्य असेल तेथे पिकांना संरक्षित पाणी द्यावे. फळबागांना पाला पाचोळ्याचे आच्छादन करावे. उन्हाचा जनावरांवर होणारा परिणाम  उष्णता वाढल्याने जनावरांच्या शरीरातील ऊर्जा तापमान नियंत्रणासाठी जास्त प्रमाणात खर्च  होते. त्याचा दुग्धोत्पादनावर परिणाम दिसून येतो. जनावरांमध्ये थकवा येतो.  उपाय :  जनावरांना हवेशीर गोठ्यात बांधावे. दुपारच्या वेळी जनावरे चरायला सोडू नये. पुरेसे गार पाणी पिण्यास द्यावे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com