लवकरच नवीन सरकार स्थापन होईल : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सत्तेच्या समीकरणाच्या संदर्भात कोण काय बोलत आहे, यावर मी काहीही प्रतिक्रिया देणार नाही. भाजपमधील कोणीही बोलणार नाही. महाराष्ट्राला नव्या सरकारची आवश्‍यकता असून, नक्कीच सरकार स्थापन होईल. लवकरात लवकर नवे सरकार बनेल. आम्ही त्यासाठी आश्‍वस्त आहोत. - देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्री
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मुख्यमंत्री  देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भेट घेतली

नवी दिल्ली  ः "महाराष्ट्रात लवकरात लवकर नवे सरकार स्थापन होईल. आम्ही त्याबाबत पूर्णपणे आश्‍वस्त आहोत,'' असा आत्मविश्‍वास काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी भाजप अध्यक्ष आणि गृहमंत्री अमित शहा यांच्या भेटीनंतर व्यक्त केला. शिवसेनेच्या आक्रमक दाव्यांची दखल घेण्याचेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी टाळले. अर्थात, गृहमंत्र्यांशी झालेली भेट ही राज्यात पावसामुळे झालेल्या नुकसानभरपाईसाठी असल्याची पुस्ती त्यांनी जोडली.

महाराष्ट्रात युतीचे भागीदार भाजप आणि शिवसेना या दोन्हीही पक्षांमध्ये तुंबळ वाक्‌युद्ध पेटल्यामुळे सरकार स्थापनेचा तिढा अजूनही सुटलेला आहे. या पार्श्‍वभूमीवर काळजीवाहू मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी (ता.४) अमित शहा यांची दिल्लीत भेट घेऊन सरकार स्थापनेच्या रणनीतीची चर्चा केली आणि "लवकरात लवकर आम्ही नवे सरकार देऊ,' असे आत्मविश्‍वासाने भरलेले विधान केले. अमित शहा यांच्या निवासस्थानी चाळीस मिनिटे दोन्ही नेत्यांची बंद दरवाजाआड खलबते झाली. भाजपच्या अन्य कोणत्याही नेत्याचा त्यात सहभाग नव्हता. या भेटीनंतर महाराष्ट्र सदनात मुख्यमंत्र्यांनी पत्रकारांशी संवाद साधला. या वेळी त्यांनी युतीच्या कोंडीवर भाष्य करण्याचे टाळताना सरकार स्थापनेच्या हालचालींवर आणि शिवसेनेकडून होणाऱ्या आक्रमक दाव्यांबद्दल बोलण्यास नकार दिला.

महाराष्ट्रात बिगरमोसमी पावसामुळे मोठे नुकसान झाले असून, ३२५ तालुक्‍यांमध्ये ८० ते १०० टक्‍क्‍यांपर्यंत हानी झाली आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून मदत मिळावी, अशी मागणी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडे केली असून, पावसामुळे झालेल्या हानीचा अंदाज त्यांना सादर केल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. हानीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय पथक पाठविले जाणार असून, पीकविमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देण्यासाठी मदतीची भूमिका घ्यावी, नियमांचा उगाच बाऊ करू नये, यासाठी केंद्र सरकारने विमा कंपन्यांची बैठक घेऊन सूचना द्याव्यात, अशीही मागणी केली. शहा यासाठी विमा कंपन्यांशी चर्चा करणार आहेत, असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी या वेळी सांगितले.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com