दुष्काळी उपाययोजनांसाठी सात हजार कोटींचा प्रस्ताव

दुष्काळी उपाययोजनांसाठी सात हजार कोटींचा प्रस्ताव
दुष्काळी उपाययोजनांसाठी सात हजार कोटींचा प्रस्ताव

उस्मानाबाद ः दुष्काळी परिस्थितीत चाराटंचाईवर प्रभावी उपाययोजना करण्यासाठी पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांना चारा पिके घेण्यासाठी अनुदान दिले जाणार आहे. राज्यातील दुष्काळी उपाययोजनांसाठी सुमारे सात हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला आहे. लवकरच केंद्राचे पथक राज्यात येऊन परिस्थितीचा आढावा घेईल, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.   उस्मानाबाद येथील जिल्हाधिकारी कार्यालयात मंगळवारी (ता. ६) पत्रकार परिषदेत ते बोलत होते. कामगार कल्याणमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, पालकमंत्री अर्जून खोतकर आदी या वेळी उपस्थित होते.  जिल्ह्यातील दुष्काळी परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मुख्यमंत्री शहरात आले होते. सकाळी ११ वाजल्‍यापासून त्यांनी महसूल तसेच गृह विभागाच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की पशुधन जगविण्यासाठी शासनाचे प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक स्तरावर चारा उपलब्ध व्हावा, यासाठी पाणी उपलब्ध असलेल्या शेतकऱ्यांना चारापिकांसाठी अनुदान दिले जाईल. पिण्याच्या पाण्यासह इतर उपाययोजनासाठी सुमारे सात हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्राकडे पाठविला आहे. काँग्रेसकडून पीकविमा योजनेवर आरोप केले जात असले तरी काँग्रेसपेक्षा आमच्या कार्यकाळात जास्तीचा विमा शेतकऱ्यांना दिल्याचेही मुख्यंत्र्यांनी या वेळी सांगितले.  उस्मानाबाद-लोहारा तालुक्यांना मदत मिळणार  गेल्यावर्षी प्रशासनाच्या चुकीने उस्मानाबाद तसेच लोहारा तालुक्यातील शेतकऱ्यांना पीकविमा मिळाला नसल्याची कबुली मुख्यमंत्र्यांनी दिली. लवकरच त्याची रक्कमही अशा शेतकऱ्यांना दिली जाईल, असेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.  नाबार्डकडून २२०० कोटी येणार?  कृष्णा-मराठवाडा सिंचन प्रकल्पासाठी निधी मिळणार नव्हता. यावर उपायोजना म्हणून आम्ही नाबार्डकडे २२०० कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठविला आहे. त्यामुळे मराठवाड्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प मार्गी लागणार आहे. तसेच दुष्काळी परिस्थितीमुळे यंदा अनेक तलावांतील गाळ काढण्याची प्रक्रिया केली जाईल. तेव्हा अशा तलावातील गाळ छोट्या शेतकऱ्यांच्या शेतापर्यंत दिला जाईल. त्यासाठी आर्थिक मदत करणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.  फरकाची रक्कमही पाठविली  गेल्या वर्षी हमीभावापेक्षा कमी दराने शेतकऱ्यांच्या हरभरा तसेच तुरीची खरेदी झाली. ज्या शेतकऱ्यांनी शासनाकडे विक्रीची नोंदणी केली आणि माल खरेदी करता आला नाही, अशा शेतकऱ्यांची फरकाची एक हजार रुपयांची मदत जिल्हास्तरावर वर्ग केल्याचेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com