लातूर, उस्मानाबाद जिल्हे दुष्काळमुक्त करू ः मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

किल्लारी, जि. लातूर  ः किल्लारीच्या भूकंपानंतर ज्येष्ठ नेते शरद पवार यांचे काम संकटमोचकाचेच राहिले आहे. ते आपत्ती व्यवस्थापनात निष्णात आहेत. राज्याच्या आपत्ती व्यवस्थापनावर त्यांच्याकडे एखादे पुस्तक असेल तर त्यांनी मला द्यावे. त्याचा निश्चित उपयोग केला जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे केले. तसेच, भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनात काही प्रश्न बाकी राहिले आहेत, हे प्रश्न लवकरच सोडविण्यात येतील. तसेच, जूनपर्यंत भारतीय जैन संघटनेच्या सहकार्याने लातूर व उस्मानाबाद जिल्हा दुष्काळमुक्त करण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

राज्य शासन व भारतीय जैन संघटनेच्या संयुक्त विद्यमाने लातूर व उस्मानाबाद जिल्हे संपूर्ण दुष्काळमुक्त करण्याच्या उद्देशाने किल्लारी येथे रविवारी (ता. ३०) झालेल्या सुजलाम् सुफलाम् कार्याच्या निर्धार समारंभात मुख्यमंत्री फडणवीस बोलत होते. अध्यक्षस्थानी माजी केंद्रीय कृषिमंत्री शरद पवार होते. प्रमुख पाहुणे म्हणून माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर, लातूरचे पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर, उस्मानाबादचे पालकमंत्री अर्जुन खोतकर, भारतीय जैन संघटनेचे वल्लभ भन्साळी, शांतिलाल मुथा आदी उपस्थित होते.

या वेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की भूकंपग्रस्तांच्या पुनर्वसनात काही समस्या राहिल्या आहेत. कुटुंबे मोठी झाली आहेत. या वाढीव कुटुंबांना घर किंवा प्लॉट देण्यात येतील. ज्यांनी पुनर्वसनसाठी जमिनी दिल्या आहेत, त्यांनाही यात सामावून घेण्यासाठी लवकरच निर्णय घेऊ. या भागातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजना बंद आहेत. त्या सुरू करून सौरऊर्जेचा त्याकरिता वापर केला जाईल. जलयुक्त शिवार योजनेमुळे मराठवाड्यातील भूजल पातळी चार मीटरने वाढली आहे. या योजनेवर काही जणांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते; पण तज्ज्ञ समितीकडून अहवाल घेण्यात आला आहे. वैज्ञानिक दृष्टीनेच हे काम होत आहे.

‘जलयुक्त’ची कामे तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच करा ः  पवार जलयुक्त शिवार योजनेच्या कामांवर काही जलतज्ज्ञ अनुकूल नाहीत, त्यामुळे तज्ज्ञांचा सल्ला घेऊनच लातूर व उस्मानाबाद जिल्ह्यात दुष्काळमुक्तीचे काम हाती घ्यावे, असा सल्ला श्री. पवार यांनी या वेळी मुख्यमंत्री फडणवीस यांना दिला. भूकंप ही मोठी आपत्ती होती. आपण सर्वांनी धैर्याने तोंड दिले आहे. अनेकांची येथे मदत आली; पण सामूहिक शक्तीमुळे येथे चांगले काम करता आले. आता दुष्काळाचे संकट आहे. यातही लोकांनी एकत्र येण्याची गरज आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com