पूरस्थितीवर मात करण्यासाठी शाश्वत पुनर्वसन आराखडा: मुख्यमंत्री फडणवीस

मुख्यमंत्री
मुख्यमंत्री

मुंबई: जागतिक बँक आणि एडीबी (एशियन डेव्हलपमेंट बँक) यांच्या सहकार्यातून सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांतील पूरस्थितीवर कायमस्वरूपी उपाययोजना म्हणून शाश्वत पुनर्वसन आराखडा तयार करण्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्नशील असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता. १२) सांगितले. यातून पूरस्थिती उद्भवणाऱ्या भागातील पाणी दुष्काळी भागात वळविण्यासाठीची योजनाही तयार करता येईल, त्यामुळे हा आराखडा इतरांसाठी ''रोल मॅाडेल'' ठरेल, असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला. कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात निर्माण झालेल्या पूरस्थितीची जागतिक आणि एडीबी बँकेच्या पथकाने नुकतीच पाहणी केली आहे. या पथकाची गुरुवारी वर्षा या शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. बैठकीस मुख्य सचिव अजोय मेहता, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्याचे विशेष पुनर्वसन अधिकारी प्रवीण परदेशी, जलसंपदा विभागाचे प्रधान सचिव आय. एस चहल, ऊर्जा विभागाचे सचिव  अरविंद सिंह, महावितरणचे संजीवकुमार, मदत व पुनर्वसन विभागाचे सचिव किशोरराजे निंबाळकर, आपत्ती नियंत्रण कक्षाचे संचालक अभय यावलकर, संबंधित अधिकारी तसेच या दोन्ही बँकांच्या प्रतिनिधी मंडळातील सदस्य अनुप कारनाथ, दीपक सिंघ, सौरभ दानी, अशोक श्रीवास्तव, चंद्रशेखर सिंघ, सौरभ शाह आदी उपस्थित होते. मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की महाराष्ट्रात एकीकडे तीव्र दुष्काळ आणि दुसरीकडे अतिवृष्टी अशी परिस्थिती निर्माण होते. अगदी अलीकडेच महाबळेश्वरमध्ये जगातील सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. तर याच जिल्ह्यातील साठ ते सत्तर किलोमीटरवरील परिसरात तीव्र पाणीटंचाईची परिस्थिती होती. या हवामान बदलामुळे या आपत्तीच्या व्यवस्थापनासाठी आणि पुनर्वसनाबाबत वेगळ्या दृष्टिकोनातून विचार करण्याची वेळ आली आहे. यावर कायमस्वरूपी उपाययोजना सर्वंकष आणि शाश्वत आराखडा तयार करणे आवश्यक आहे. जागतिक बँक आणि एशियन डेव्हलपमेंट बँकेकडे आपत्ती व्यवस्थापनातील जगभरातील अनेक ठिकाणांचा अनुभव पाठीशी असतो. त्यांच्या सहकार्याने महाराष्ट्रातील या आपत्तींवर सर्वंकष आणि शाश्वत असा पुनर्वसन आराखडा तयार करण्यास मदत होईल. या आराखड्यात पायाभूत सुविधा, कृषी, आर्थिक अशा सर्वंच बाबींचा समावेश असेल. एकीकडे दुष्काळ  असतो. तर दुसरीकडे पूरस्थिती उद्भवते. यातून अचानक येणाऱ्या पुराचे पाणी दुष्काळी भागात वळविण्याची आवश्यकता आहे. असा सर्वंकष आराखडा तयार केल्यास तो देशातील अन्य राज्यांसह जागतिक स्तरावरही उत्तम ठरेल. त्यासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करत आहे. बॅंकांसोबतच्या समन्वयनासाठी नोडल अधिकारीही नियुक्त करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. विशेष पुनर्वसन अधिकारी श्री. परदेशी यांनी सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यात महापुरामुळे झालेले नुकसान आणि करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात सविस्तर सादरीकरण केले. शिवाजी विद्यापीठाने पूरस्थितीचा अभ्यास करून, त्याबाबतचा विश्लेषणात्मक अहवाल आणि निष्कर्ष सादर केल्याचेही त्यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com