युतीची चिंता आम्हालाही; लवकरच निर्णय : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई ः राज्यात भाजपचेच सरकार पूर्ण बहुमताने येईल आणि देवेंद्र फडणवीस हेच पुढचे मुख्यमंत्री होतील, असे भाजप अध्यक्ष आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी युतीच्या विषयाला बगल देत जाहीर केले असले, तरी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मात्र युतीची चिंता आम्हालाही असल्याचे म्हटले. युतीची आवश्यकता असल्याचे अधोरेखित करत मुख्यमंत्र्यांनी युतीबाबतचा निर्णय लवकरच जाहीर होईल, असेही स्पष्ट केले. युतीबाबत चर्चा लवकरच सुरू होणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

मुंबईत सोमवारी (ता.२३) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी पत्रकारांनी नारायण राणे यांच्या भाजपप्रवेशाबाबत प्रश्न विचारल्यानंतर, राणे यांच्या पक्षप्रवेशाबाबतचा निर्णय लवकरच जाहीर करण्यात येईल, असेही मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केले. या वेळी त्यांनी केंद्र सरकारने घेतलेल्या विविध निर्णयांचे स्वागत केले.

मुख्यमंत्र्यांनी अर्थमंत्र्यांच्या कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्याच्या निर्णयाचे कौतुक केले. याबाबत मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की केंद्रीय अर्थमंत्र्यांनी कॉर्पोरेट टॅक्स कमी करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेतल्याने उद्योगांना मोठा दिलासा मिळाला आहे. या निर्णयाचा महाराष्ट्राला मोठा फायदा होणार आहे. गेल्या २ वर्षांत जागतिक कंपन्या महाराष्ट्रात आल्या. अमेरिका-चीनमधील ट्रेडवॉरमुळे भारतातील गुंतवणूक वाढत आहे. महाराष्ट्र हे देशातले सर्वांत मोठे कॉर्पोरेट हब असून त्याचा राज्याला फायदा होईल. जे पैसे वाचतील त्याच्यातून नव्याने गुंतवणूक होण्यास मदत मिळेल; तसेच रोजगारवाढीलाही हातभार लागणार आहे. 

भारतीय रिझर्व्ह बँकेने रेपो रेट कमी केल्यानंतर पहिल्यांदा सरकारने निर्णय घेतला की रेपो रेट कमी झाल्यानंतर ग्राहकालाही त्याचा थेट फायदा व्हावा. हा निर्णय महत्त्वाचा असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. याबरोबरच, ७० हजार कोटी रुपयांची तरतूद अर्थसंकल्पात केली गेल्याने सार्वजनिक क्षेत्रातील बँकांची कर्ज देण्याची क्षमता ५ लाख कोटींनी वाढली आहे. शिवाय, १० बँकांचे ४ बँकांमध्ये विलीनीकरण करण्याचाही केंद्राचा मोठा निर्णय असून यामुळे बँकांच्या तोट्यात घट होऊन नफा वाढणार असल्याचेही ते म्हणाले. ‘‘त्याशिवाय राष्ट्रवाद हा आमचा एकमेव अजेंडा नसून, अजेंड्याचा एक भाग आहे. कलम ३७० हा जम्मू काश्मीरचा नाही; तर राष्ट्रीय एकात्मतेचा मुद्दा असून कलम ३७० आणि राष्ट्रवाद आमचा अजेंडा असल्याचा अभिमान आहे,” असेही मुख्यमंत्री फडणवीस यांनी म्हटले आहे.

आरे कारशेडला विरोध करत काहीजण आपले मनसुबे पूर्ण करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप केला आहे. आरेसंबंधी काही लोकांची चिंता समजू शकतो. पण जेव्हा पर्यायी जागा आहे सांगितले जाते तेव्हा अतिरिक्त पैसे खर्च करून ती घ्यावी लागेल हे महत्त्वाचे आहे. एक रुपया जरी जास्त खर्च केला तर त्याचा परिणाम तिकिटाच्या दरावर आणि मुंबईकरांवर होईल, असे मुख्यमंत्र्यांनी म्हटले आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com