युती कधी होर्ईल हे कळणारही नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
पत्रकार परिषदेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

बीड : लोकसभा निवडणुकी अगोदरही माध्यमांनी भाजप - शिवसेना युतीबाबत चर्चा केली. पण, आम्ही एकाच दिवसात चर्चा करून युती केली. या वेळीही युती कधी होईल हे कळणारही नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. 

श्री. फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील महाजनादेश यात्रा दोन दिवस जिल्ह्यांत होती. मंगळवारी (ता. २७) सकाळी त्यांनी महाजनादेश यात्रेबाबत पत्रकार परिषदेत माहिती दिली. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे, खासदार डॉ. प्रीतम मुंडे, यात्रेचे संयोजक आमदार सुरजितसिंह ठाकूर, संगीता ठोंबरे, भीमराव धोंडे, आर. टी. देशमुख, लक्ष्मण पवार, सुरेश धस, सविता गोल्हार, रमेश पोकळे, केशव उपाध्ये या वेळी उपस्थित होते. 

श्री. फडणवीस म्हणाले, की भाजपमध्ये मेगा भरती आणि विरोधकांची मेगा गळती सुरू आहे. प्रवेशाबाबत आमची फिल्ट्रेशन पॉलिसी आहे. जे लोक जास्त दिवस आमच्यासोबत राहू शकतात, जिथे आमच्या वाट्याची जागा आहे, अशाच ठिकाणी आम्ही प्रवेश देत आहोत. काही ठिकाणी शिवसेनेतही प्रवेश होत असल्याचेही त्यांनी सांगितले. 

आघाडीच्या यात्रांची मुख्यमंत्र्यांकडून खिल्ली  भाजपच्या महाजनादेश यात्रेला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. आम्हाला रस्त्यावर स्वागताला झालेल्या गर्दीच्या ठिकाणीही सभा घ्याव्या लागत आहेत. तर, काँग्रेसला त्यांच्या यात्रेची सुरवात मंगल कार्यालयात करून सभा छोट्या सभागृहांत घ्याव्या लागत आहेत. राष्ट्रवादीतही शिवस्वराज्य आणि संवाद अशा दोन यात्रा सुरू असल्याची खिल्ली मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उडविली. 

श्री. फडणवीस म्हणाले, की महाजनादेश यात्रेत आत्तापर्यंत १६४१ किलोमीटरच्या प्रवासात ६० मतदारसंघांत पोचलो आहोत. शेवटपर्यंत ३२ जिल्ह्यांतील १५० मतदारसंघांमध्ये यात्रा पोचणार आहे. आम्ही सर्वच कामे केल्याचा दावा नसून, पूर्वीच्या सरकारपेक्षा उत्तम कामे केली. महाजनादेश यात्रेच्या निमित्ताने लोकांच्या अपेक्षा समजून घेऊन कामे करणार आहोत. आम्हीच प्रश्न सोडवू शकतो हे लोकांच्या लक्षात आल्याने आम्हाला प्रतिसाद मिळत आहे. 

विरोधकांनी सुरू केलेल्या यात्रेतून त्यांचाच पर्दाफाश होत असल्याची टीका करत काँग्रेसला त्यांची यात्रा मंगल कार्यालयात सुरू करावी लागल्याचा टोला मुख्यमंत्र्यांनी लगावला. राष्ट्रवादीने शिवस्वराज्य यात्रेनंतर आता संवाद यात्रा काढली आहे. त्यांनी सत्तेत असताना लोकांशी संवाद साधण्याऐवजी स्वत:शीच संवाद साधला म्हणून त्यांच्यावर ही वेळ आल्याचेही ते म्हणाले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com