मदतीबाबत प्रशासकीय यंत्रणेची चौकशी करणार : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

सांगली  : ब्रह्मनाळ येथील दुर्घटना दुर्दैवी असून तेथे तहसील कार्यालय अपयशी ठरले का, याची माहिती मागविण्यात आलेली आहे. पूरस्थितीत मदत देण्यास प्रशासकीय यंत्रणा कमी पडली आहे का याचीही मी स्वत: चौकशी करणार आहे. त्यामध्ये कोणी दोषी आढळल्यास त्यांच्यावर कारवाई करणार करण्यात येईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

सांगली येथे शनिवारी (ता. १०) जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित महापूर आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, पालकमंत्री सुभाष देशमुख, जलसंपदामंत्री गिरीश महाजन, सामाजिक न्यायमंत्री सुरेश खाडे, जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी उपस्थित होते.

यावेळी श्री. फडणवीस म्हणाले, की सांगलीमध्ये २००५ मध्ये पूर आला त्यावेळी ३१ दिवसांत २१७ टक्के पाऊस झाला होता. परंतु २०१९ मध्ये ९ दिवसांत तिप्पट म्हणजे ७५८ टक्के पाऊस झाला आहे. कृष्णा, पंचगंगा, कोयना अशा एकत्रित विसर्गामुळे ही स्थिती निर्माण झाली आहे. महापुरात अडकलेल्या नागरिकांना बाहेर काढण्यासाठी ९३ बोटी काम करत आहेत. १०१ गावांमधील २१,५०० कुटुंबे आणि १ लाख ४३ हजार लोक विस्थापित आहेत. केंद्र सरकारची पूर्ण मदत मिळते आहे. सांगलीवाडीत हेलिकॉप्टरने अन्न पाकिटे दिली जात आहेत. परंतु अन्न खराब होत असल्याने बोटीच्या मदतीने अन्न पाकिटे देण्याच्या सूचना यावेळी दिल्या.

आजघडीला जेथे महापुराचे पाणी आले आहे ते गृहीत धरून नव्याने पूरनियंत्रण रेषेचा आराखडा तयार करावा लागेल. तसे निर्देश प्रशासनाला दिले आहेत. कर्नाटक शासनाचे महाराष्ट्राला चांगले सहकार्य असून त्यांनी त्यांच्या राज्यात पूरस्थितीचा धोका पत्करून सध्या पाच लाख तीन हजार क्युसेक विसर्ग सुरू ठेवलाय. त्यामुळे कृष्णेची पातळी उतरण्यास प्रारंभ झाला आहे. नजीकच्या ४८ तासांत पाणीपातळी निश्चितपणे कमी होईल. पूरग्रस्तांना याआधी २ ते ४  हजार रुपयांची मदत मिळत होती. आता १२ ते १५ हजार रुपये देण्यात येणार आहे. ज्यांना रोखीने मदत देण्याची गरज आहे, त्यांना रोखीने मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला असून, तसे निर्देश मुख्य सचिवांना दिले आहेत. कर्नाटकमधून पाण्याचा विसर्ग सुरू आहे. पूरस्थितीचे राजकारण करू नये. विरोधी पक्षनेत्यांनी सूचना कराव्यात, इतर वेळी राजकारण करावे, असा त्यांनी विरोधकांना चिमटा काढला.

मागणीकडे मुख्यमंत्र्यांचे दुर्लक्ष मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस शनिवारी सकाळी हिराबाग कॉर्नर येथे पूरस्थिती पाहण्यासाठी गेले. दरम्यान सांगलीवाडीतील नागरिक येथे दाखल झाले. ‘आम्ही सांगलीवाडीत राहतोय, नावेतून आमच्याकडे चला, आमची परिस्थिती पाहा’ अशी मागणी त्यांनी केली, परंतु या मागणीकडे मुख्यमंत्र्यांनी दुर्लक्ष केले.    मुख्यमंत्री म्हणाले...

  • शेतातील गाळ काढण्यासाठी प्रति हेक्टर १३ हजार रुपये देणार.  
  • खरडून गेलेल्या जमिनीसाठी प्रति हेक्टरी ३८ हजार रुपये देणार.
  • वाहून गेलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपये देणार.
  • सांगली जिल्ह्यातील २७ हजार ४६७ हेक्टरवरील पिके बाधित.
  • मदत करणाऱ्यांनी गावं दत्तक घ्यावीत.
  • सांगली, कोल्हापूर जिल्ह्यांत प्रत्येकी १०० डॉक्टरांची टीम पाठवणार.
  • जनावरांच्या नुकसानीबाबत ३० हजार रुपयांची मदत देणार.
  • Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

    ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

    Related Stories

    No stories found.
    Agrowon
    agrowon.esakal.com