दुष्काळ, पीकविम्याचे आठ हजार कोटी शेतकऱ्यांना वितरित ः मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मुंबई ः लोकसभा निवडणूक निकालाच्या पार्श्वभूमीवर आम्ही आत्मविश्वासाने पावसाळी अधिवेशनाला सामोरे जात आहोत. गेली पाच वर्षे समाजाला समोर ठेवून कामकाज केले. सर्व आव्हानांना सामोरे गेलो, त्यामुळे जनता आमच्या पाठिशी राहिली. आगामी काळातही प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करू. राज्याला पुढे नेणारा अर्थसंकल्प विधिमंडळात मांडला जाईल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले. तसेच दुष्काळ आणि पीक विम्याचे सुमारे आठ हजार कोटी शेतकऱ्यांना वितरित करण्यात आल्याचेही मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.  

दरम्यान, विरोधकांची जमिनीशी असलेली नाळ तुटली आहे. त्यामुळेच त्यांचा लोकसभेत पराभव झाला. आता तरी त्यांनी विरोधी पक्षाची भूमिका योग्यरीतीने पार पाडावी, असा टोलाही मुख्यमंत्र्यांनी लगावला. 

विधिमंडळाच्या पावसाळी अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर सह्याद्री राज्य अतिथीगृहात रविवारी (ता.१६) आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी महसूलमंत्री चंद्रकांत पाटील, दिवाकर रावते, सुभाष देसाई, सुभाष देशमुख आदींसह सर्व मंत्रिमंडळ सदस्य उपस्थित होते. 

मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, की अधिवेशनात विविध विषयांवर चर्चा होईल. प्रामुख्याने राज्यातील दुष्काळी स्थितीवर सत्ताधारी, विरोधकांकडून चर्चा केली जाईल. दुष्काळ निवारणासाठी राज्य सरकारने केलेल्या उपाययोजनांची माहिती आम्ही विधिमंडळात देऊ. शासनाने दुष्काळी मदतीचे ४,७०० कोटी रुपयांचे अनुदान शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा केले आहे. पीकविम्यापोटी सुमारे ३२०० कोटींपैकी बहुतांश पैसे वितरीत झाले आहेत. दुष्काळी भागात शासनाने पुरेशा चारा छावण्या सुरू केल्या. जनावरांसाठीच्या अनुदानात भरीव वाढ केली. जनावरांसाठी टँकरने पाणी उपलब्ध करून दिले. शासनाने दुष्काळग्रस्तांच्या सर्व अडचणी सोडवल्या. जनावरांचे टॅगिंग करून चारा छावण्यांतील गैरव्यवहाराला प्रतिबंध घातला. पहिल्यांदाच छोट्या जनावरांसाठी छावण्या सुरू केल्या आहेत.  

पंतप्रधान किसान अनुदान योजनेअंतर्गत राज्यातील १ कोटी २० लाख शेतकरी अनुदानासाठी पात्र आहेत. लवकरच संबंधित शेतकऱ्यांच्या माहितीचे अपलोड पूर्ण होईल. चालू खरिपापूर्वी ही मदत सर्व शेतकऱ्यांना वितरीत करण्याचा आमचा प्रयत्न आहे. निती आयोगाच्या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी याबाबत स्पष्ट सूचना दिलेल्या आहेत. शेतकऱ्यांची माहिती तातडीने अपलोड करण्याच्या सर्व राज्यांना सूचना आहेत, त्यानुसार अनुदानाचे पैसे वितरीत केले जातील असे पंतप्रधानांनी स्पष्ट केले असल्याचे श्री. फडणवीस यांनी सांगितले.

२८ विधेयके मांडणार अधिवेशनात इतरही अनेक विषयांवर चर्चा होईल, विरोधकांच्या सर्व प्रश्नांना उत्तरे देण्याची राज्य शासनाची तयारी आहे. अधिवेशनात एकूण २८ विधेयके मांडली जाणार आहेत. तेरा नवीन विधेयके तर उर्वरित १५ प्रलंबित विधेयके चर्चेला मांडली जातील. विरोधकांनी १५ वर्षे जनतेला फसवले. आम्ही प्रत्येक समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न करू. मराठा आरक्षणाचा घोळ इतकी वर्षे कुणी केला हे समाजाने पाहिले आहे. धनगर समाजाला आम्ही जे आश्वासन दिले त्याचे प्रतिबिंब येत्या अर्थसंकल्पात दिसेल. राज्याला पुढे नेणारा अर्थसंकल्प विधिमंडळात मांडला जाईल, असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com