काटकर रजेवर; कर्मचारी धास्तावले

काटकर रजेवर; कर्मचारी धास्तावले
काटकर रजेवर; कर्मचारी धास्तावले

पुणे : राज्याच्या कृषी खात्यातील गुण नियंत्रण विभागाची चौकशी सुरू असताना महत्त्वाची कागदपत्रे हाताळणारे वादग्रस्त मुख्य गुणवत्ता नियंत्रण अधिकारी सुभाष काटकर यांना रजेवर पाठविण्यात आले आहे. या चौकशीमुळे काही कर्मचारी धास्तावले आहेत.  “काटकर यांच्या चौकशीचे आदेश देण्यात मंत्रालयातून यापूर्वीच देण्यात आलेले आहेत. मात्र, चौकशी प्रक्रिया अद्याप संपलेली नाही. त्यांना सक्तीच्या रजेवर पाठविण्यात आले असले तरी, तसे कागदोपत्री नमूद करण्यात आलेले नाही. कौटुंबिक कारणास्तव रजेवर जाण्याचा अर्ज त्यांनी दिला आहे,” अशी माहिती आस्थापना विभागाच्या सूत्रांनी दिली.  गुणनियंत्रण खात्यातील कामकाजाच्या विरोधात राज्यातील खते, बियाणे, कीटकनाशके क्षेत्रांतील काही घटकांना मंत्रालयात तक्रारी केल्या होत्या. परवाने वाटपासाठी कृषी उद्योजकांचा कोण, कसा छळ करतो याची चौकशी करण्याचा आग्रह लोकप्रतिनिधींनी देखील धरला आहे. विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखेपाटील, खासदार राजू शेट्टी यांनीदेखील चौकशी अहवालाची मागणी केल्याने कृषी खात्यात सध्या चांगलीच धावपळ सुरू आहे.   पुणे जिल्ह्यातील सिमेंट नालाबांध कामामध्ये कृषी खात्याने मलिदा लाटल्याच्या तक्रारी आल्यानंतर मृदसंधारण उपसंचालक बी. एन. मगर आणि तंत्र अधिकारी बाळासाहेब चौगुले समिती नियुक्त करण्यात आली होती. समितीच्या गोपनीय अहवालात पहिलेच नाव तत्कालीन जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी म्हणून सुभाष काटकर यांचे आहे. "सिमेंट नालाबांध कामाच्या गैरव्यवहाराला नियंत्रण अधिकारी म्हणून श्री. काटकर हे जबाबदार आहेत. त्यांच्याकडून २६ लाख रुपये वसूल करण्यात यावे," असा उल्लेख या अहवालात आहे. मात्र, ही चौकशी एकतर्फी व मला बदनाम करणारी असल्याचे श्री. काटकर यांचे म्हणणे होते.  गुण नियंत्रण विभागातील कामकाजाबाबत श्री. काटकर यांच्या विरोधात तक्रारी आल्यानंतर त्यातदेखील तथ्य नसल्याचा पावित्रा त्यांनी घेतला. “आपल्याला टार्गेट केले जात आहे. मी नियमात व कायद्याने कठोरपणे काम करणारा अधिकारी आहे. बेकायदा कामे करणारी मंडळी माझ्या विरोधात कुभांड रचतात. गुण नियंत्रण विभागात सर्वांनी जसे काम केले तेच मी करतो आहे. इतरांचे चालते. मग माझे का नाही,’’ असा युक्तिवाद श्री. काटकर यांच्याकडून होत असल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले.  उच्चपदस्थ सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, “श्री. काटकर यांच्या कामकाजाची चौकशी करण्यासाठी कृषी आयुक्त सुहास दिवसे यांनी घावटे समिती नियुक्त केली आहे. समितीला अहवाल सादर करण्यासाठी एक महिन्याचा कालावधी दिला आहे. चौकशी कालावधीतच श्री. काटकर यांची रजा आहे. त्यांच्या जागेवर आत्माचे उपसंचालक किसनराव मुळे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. याचाच अर्थ श्री. काटकर यांच्या कार्यालयात किंवा कक्षेत असलेली सर्व कागदपत्रे आता घावटे समितीला दिली जातील.”, असे सूत्रांनी स्पष्ट केले.  काटकर यांना रजेवर पाठविणे, त्यांच्या पदावर दक्षता पथकाचा अधिकारी आणणे, घावटे समिती सक्रिय करणे या सर्व घडामोडी कुणाला तरी वाचविण्यासाठी होत आहेत की कुणाला बळीचा बकरा बनविण्यासाठी, अशा संभ्रमात गुण नियंत्रण विभागाचे कर्मचारी पडले आहेत. दुसऱ्या बाजूला “गुण नियंत्रण संचालक विजयकुमार इंगळे व काटकर हे दोघेही या चौकशीतून निर्दोष सुटतील आणि खालच्या कर्मचाऱ्यांना आरोपीच्या पिंजऱ्यात ढकतील. तो पिंजरा म्हणजेच घावटे समिती आहे,” अशीदेखील भीती कर्मचारी व्यक्त करीत आहेत.  सारे सोडून मी एकटा दोषी नाही “गुण नियंत्रण विभागात वर्षानुवर्षे चालणारी प्रथापरंपरा मी पुढे चालविली आहे. मी नव्याने काहीही सुरू केले नाही. वरिष्ठांना सोडून किंवा कायदा मोडून कोणालाही त्रास दिलेला नाही. संकटाचा सामना सर्वांनी करायला हवा. मात्र, सारे सोडून मला एकट्याला दोषी धरता येणार नाही अशी भूमिका श्री. काटकर यांनी घेतली आहे,” असे सूत्रांनी स्पष्ट केले. “मला एकट्याला पकडाल तरी मी सर्वांनाच मिठी मारू शकतो असे सांगत या प्रकरणातून बाहेर पडण्यासाठी श्री. काटकर यांनीही इतरांकडे मदतीचा हात मागितला आहे,” असेही सूत्रांचे म्हणणे आहे.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com