परभणी ः ‘‘परभणी जिल्हा परिषदेच्या यंदाच्या अर्थसंकल्पीय अंदाजपत्रकात कृषी तसेच पशुसंवर्धन
ताज्या घडामोडी
न्याहळोद येथे कोथिंबिरीचे भाव पडले
कोथिंबिरीचे भाव पडल्याने शेतकरी संकटात सापडला असून, कोथिंबीर लागवडीसाठी केलेला खर्चही कोथिंबीर विकून निघणार नाही, अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे.
न्याहळोद, जि. धुळे : कोथिंबिरीचे भाव पडल्याने शेतकरी संकटात सापडला असून, कोथिंबीर लागवडीसाठी केलेला खर्चही कोथिंबीर विकून निघणार नाही, अशी बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. दोन दिवसांपूर्वी अवकाळी पावसाचा फटका रब्बी हंगामातील पिकांना बसला असतानाच पिकविलेल्या शेतमालालाही आता भाव मिळत नाही, अशा दुहेरी संकटात शेतकरी सापडला आहे.
न्याहळोद येथील शेतकरी यशवंत माळी यांनी त्यांच्या शेतात कोथिंबीर लावली होती. कोथिंबिरीची देखरेख, मशागत करून त्यांना भरघोस उत्पादन आल्याने त्यांना कोथिंबीर विकून दोन पैसे हातात येतील व घेतलेले कर्जही फेडता येईल, अशी आशा होती. यामुळे त्यांनी १६ मजूर ६० रुपयांप्रमाणे कोथिंबीर काढण्यासाठी लावले.
काढलेली कोथिंबीर गोळा करण्यासाठी शंभर रुपये रोजंदारीने शेतमजूर लावला. त्यानंतर गोळा केलेली कोथिंबीर धुळे येथे मार्केट कमिटीत विकण्यासाठी आणली. यासाठी त्यांना गाडीभाडे पाचशे रुपये द्यावे लागले. असा सर्व मिळून खर्च त्यांना १ हजार ५६० रुपये आला. मात्र जेव्हा कोथिंबिरीची विक्री झाली तेव्हा केवळ १ हजार ८५ रुपये मिळाले. त्यातही हमाली व तोलाई वजा जाता हातात फक्त नऊशे रुपये आले, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
खर्च १ हजार ५६० व उत्पन्न केवळ ९०० रुपये येऊन तब्बल ६६० रुपयांची तूट आली. यात दोन महिन्यांचे राबणे जोडलेले नाही. अशाच प्रकारे जर शेतीचे गणित तुटीचे असेल तर शेती का आणि कशासाठी करायची? शेतकरी जेव्हा शेतमाल पिकवितो, तेव्हा योग्य दरात शेतमाल विकला जात नाही. अशातच सक्तीची वीजबिल वसुली, कर्जवसुलीसाठी शेतकरी पैसा कुठून आणणार, असा प्रश्न निर्माण होत आहे. त्यामुळे कोथिंबिरीचे उत्पादन करणाऱ्या शेतकरी बांधवांना ‘खायापिया कुछ नहीं ग्लास फोडा बारा आणा’ असे म्हणायची वेळ आली आहे.
- 1 of 1064
- ››