विदर्भात दहा हजार कृषी केंद्रांना टाळे
नागपूर : कृषी विक्रेत्यांच्या न्याय्य मागण्यांसाठी पुकारलेल्या बंदला विदर्भात देखील शंभर टक्के प्रतिसाद मिळाला. विदर्भाच्या अकरा जिल्ह्यातील दहा हजारावर कृषी सेवा केंद्र बंद असल्याने शेतकऱ्यांना गैरसोयीचा सामना करावा लागला.
पश्चिम विदर्भातील अकोला वाशिम बुलढाणा अमरावती यवतमाळ या पाच जिल्ह्यांमध्ये सोयाबीन लागवड क्षेत्र सर्वाधिक आहे. सध्या सोयाबीन पिकात तणांचा प्रादुर्भाव वाढीस लागला असून त्याच्या नियंत्रणासाठी शेतकऱ्यांना तणनाशकाची गरज आहे. माफदाने पुकारलेल्या राज्यव्यापी संपात अमरावती विभागातील पाच हजार ४९२ कृषी व्यवसायिक सहभागी झाले आहेत. त्यामध्ये बुलढाणा जिल्ह्यातील १३३६, अकोला ६४०, वाशिम ६२६, अमरावती १५५२, यवतमाळ १२३८ याप्रमाणे कृषी व्यावसायिकांची संख्या आहे.
या सर्व व्यावसायिकांनी संपात सहभाग घेतल्याने शेतकऱ्यांना ऐन हंगामात अडचणीचा सामना करावा लागत आहे. सध्या पिकात तणांचा प्रादुर्भाव झाल्याने तणनाशकांची शेतकऱ्यांची मागणी वाढती आहे. त्यासोबतच पिकाच्या वाढीसाठी शेतकऱ्यांकडून खरेदीलाही वेग आला आहे. धान लागवड क्षेत्र असलेल्या पूर्व विदर्भात देखील खताची मागणी आहे. परंतु, दुकाने बंद असल्याने शेतकऱ्यांना त्रास सहन करावा लागत आहे.
पूर्व विदर्भातील नागपूर, चंद्रपूर या जिल्ह्यात सर्वाधिक कृषी सेवा केंद्रे असून भंडारा, गडचिरोली, गोंदिया, वर्धा या जिल्ह्यांमध्ये कृषी सेवा केंद्राची संख्या कमी असल्याची माहिती कृषी विभागाच्या सूत्रांनी दिली. नागपूर विभागातील सहा जिल्ह्यात कृषी सेवा केंद्राची संख्या ५६२० आहे. या सर्व व्यवसायिकांनी संपात सहभाग नोंदविल्याने शेतकऱ्यांची चांगलीच कोंडी झाली आहे.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.