पीक पेरणी कालावधीने चिंतेचे ढग गडद

पीक पेरणी कालावधीने चिंतेचे ढग गडद
पीक पेरणी कालावधीने चिंतेचे ढग गडद

औरंगाबाद : काही प्रमुख पिकांचा उशिरात उशिरा पेरणी करण्याचा कालावधी संपायला काही दिवसच शिल्लक आहेत. अशात पावसाने मारलेल्या दडीमुळे यंदा पीकनिहाय अपेक्षित पेरणीचा टप्पा गाठता येईल का, पाऊस त्यासाठी साथ देईल का, या प्रश्नांमुळे मराठवाड्यातील खरिपाच्या पेरणीविषयी चिंतेचे ढग गडद झाल्याचे चित्र आहे.

या संदर्भात तज्ज्ञांशी केलेल्या संवादातून मिळालेल्या माहितीनुसार, प्रचलित पावसाळ्यानुसार ७ जुलैपर्यंत खरिपातील कोणत्याही पिकाची पेरणी करणे व त्यामधून अपेक्षित उत्पादन मिळविणे शक्‍य आहे. परंतु एकाच वेळी धो धो पडून सरासरी गाठणारा वा ओलांडणारा पाऊस, सातत्याने कमी होत चाललेले पावसाचे दिवस, यामुळे ७ जुलैनंतर मात्र पेरणी लांबल्यास काही पिकांना ब्रेक लावण्याशिवाय शेतकऱ्यांकडे पर्याय उरत नाही. त्यामुळे पीकनिहाय प्रस्तावित केलेल्या पेरणीक्षेत्राचा टपा गाठणे शक्‍य होत नाही. मराठवाड्यातील ४२१ मंडळांपैकी  २२५ मंडळात २ जुलैपर्यंत अपेक्षीत पावसाच्या तुलनेत पुढे जाऊन पाऊस झाला. मात्र १९६ मंडळात अपेक्षित पाऊस झालाच नाही. काही मंडळांत पेरणीयोग्य पाऊस व जमिनीत पुरेसी ओलच नसल्याने रानं तयार होऊन मोकळी पडून आहेत.

मराठवाड्यात प्रस्तावित ४९ लाख १० हजार ९१४ हेक्‍टर क्षेत्रामध्ये १७ लाख १७ हजार हेक्‍टवर कपाशी, १० लाख ३८ हजार हेक्‍टरवर सोयाबीन, ४ लाख १७ हजार हेक्‍टरवर खरीप ज्वारी, २ लाख ३४ हजार हेक्‍टरवर बाजरी, २ लाख ५३  हजार हेक्‍टरवर मका, ५ लाख २० हजार हेक्‍टरवर तूर, १ लाख ६२ हजार हेक्‍टरवर मूग, १ लाख ६७ हजार हेक्‍टरवर उडीदाची पेरणी प्रस्तावित करण्यात आली होती. प्रस्तावित क्षेत्राच्या तुलनेत जुनच्या शेवटच्या आठवड्यापर्यंत १६ लाख ५३ हजार हेक्‍टरवर खरिपाची पेरणी झाली होती. प्रस्तावित क्षेत्राच्या तुलनेत ज्वारीची केवळ ९ टक्‍के, बाजरीची ८ टक्‍के, मकाची ३३ टक्‍के, तुरीची २७ टक्‍के, मुगाची ३४ टक्‍के, उडदाची २७ टक्‍के, सोयाबीनची ५९ टक्‍के पेरणी आटोपली होती. तर कपाशीची ३७ टक्‍के क्षेत्रावर लागवड झाली होती. पावसाने दडी मारल्याने खोळंबलेली पेरणी व आधीच्या पेरणी केलेल्याला पावसाने दिलेल्या दग्यामुळे दुबार पेरणीचे संकट ओढविण्याची स्थिती, त्यातच प्रमुख पिकांच्या पेरणीचा संपत चाललेला कालावधी यामुळे शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे.

तज्ज्ञांच्या मते प्रचलित पावसाळ्यानुसार ७ जुलैपर्यंत खरिपाच्या कोणत्याही पिकाची पेरणी वा लागवड करता येते. ७ जुलैनंतर मात्र मग, उडदाची पेरणी टाळावी लागते, १५ जुलैनंतर पेरणीची वेळ आल्यास मूग, उडदासोबतच ज्वारी, कपाशीचीही लागवड करता येत नाही. २१ जुलैनंतर सोयाबीनची पेरणी करता येत नसल्याची माहिती राष्ट्रीय कृषी संशोधन प्रकल्प औरंगाबादचे सहयोगी संचालक संशोधन डॉ. सूर्यकांत पवार यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com