पुणे : गेल्या दोन दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील काही भागांत वाढत असलेले ऊन व ढगाळ हवामान यामुळे भाजीपाला आणि फलोत्पादक शेतकऱ्यांमध्ये चिंतेचे वातावरण असून, काढलेला शेतीमाल सुरक्षित ठेवण्यास ते प्राधान्य देत आहेत.
सध्या उन्हाळी हंगामातील बाजरी, भुईमूग, मका, मूग ही पिके वाढीच्या अवस्थेत आहेत. तसेच आंबादेखील काढणीच्या अवस्थेत आहे. जिल्ह्याच्या उत्तर व पूर्व भागातील जुन्नर, आंबेगाव, खेड, शिरूर, दाैंड, इंदापूर, बारामती तालुक्यांत द्राक्षांची काढणी सुरू आहे, तर काही ठिकाणी डाळिंब पिकाची काढणी सुरू आहे. मात्र, गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा पारा चांगलाच वाढला आहे.
जिल्ह्यात सकाळपासून उन्हाचा चटका वाढत आहे. हा चटका दुपारी चार वाजेपर्यंत कायम राहत आहे. त्यानंतर अचानक वातावरणात बदल होत हवामान ढगाळ होत आहे. ढगाळ हवामानामुळे कमाल तापमानात किंचित घट होऊन नागरिकांना दिलासा मिळत आहे; परंतु शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढत आहे.
अनेक ठिकाणी भाजीपाला, कांदा, आंबा यांसारख्या पिकांची काढणी सुरू आहे. अचानक होत असलेल्या हवामान बदलामुळे शेतकऱ्यांची धावपळ सुरू आहे. तसेच जुन्नर, आंबेगाव, खेड तालुक्यांत मोठ्या प्रमाणात खर्च करून अनेक शेतकऱ्यांनी टोमॅटो पीक घेतले आहे. हे पीक वाढीच्या अवस्थेत आहे. ढगाळ हवामान होत असल्याने टोमॅटो उत्पादकांमध्येही चिंतेचे वातावरण आहे.
याबाबत शेतकरी रघुनाथ शिंदे म्हणाले, की आम्ही नुकतीच टोमॅटो पिकाची लागवड केली आहे. शनिवारपासून होत असलेल्या ढगाळ हवामानामुळे शेतकऱ्यांमध्ये पावसाची चिंता लागून आहे. ढगाळ हवामानामुळे पिकांवर रोग- किडीचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता आहे. शेतकरी पिकांची काळजी घेत आहेत.