सिंधुदुर्ग जिल्ह्यात ढगाळ वातावरणाचा आंबा बागांना फटका

ढगाळ वातावरणाचा परिणाम आंबा, काजू पिकावर होणार आहे. या वातावरणामुळे दोन्ही पिकांवर बुरशी आणि कीड-रोगांचा प्रादुर्भाव होईल. त्यामुळे कृषी विभागामार्फत सध्या जिल्हाभर शेतकऱ्यांचे प्रशिक्षण वर्ग सुरू आहेत. त्यात दोन्ही पिकांची कशा प्रकारे काळजी घ्यावी, यासंदर्भात मार्गदर्शन सुरू आहे. - सी. डी. बागल, जिल्हा कृषी अधीक्षक, सिंधुदुर्ग. आंब्याला मोहर येण्यासाठी आवश्‍यक थंडी अद्याप नाही. त्यामुळे जिल्ह्यात कुठेही आंब्याला मोहर नाही. आता काही झाडांना पालवी येत आहे. त्यातच आता गेले चार-पाच दिवस ढगाळ वातावरण आहे. त्याचा मोठा परिणाम आंबा बागांना होणार आहे. या वर्षीचा आंबा हंगाम अडचणीत आहे. - माधव साटम, आंबा उत्पादक शेतकरी, शिरगाव, ता. देवगड. आंबा हंगाम आता लांबणीवर पडणार हे निश्‍चित आहे. लांबलेल्या पावसाचा हा परिणाम आहे. थंडीचा पत्ता नाही. यानंतर मोहरलेला आंबा मे महिन्याच्या मध्यानंतर तयार होईल. त्या वेळी कदाचित जिल्ह्यात पाऊस सुरू झालेला असेल. त्यामुळे आंब्याला दरही मिळणार नाही. वातावरणाच्या बदलाची मोठी किंमत बागायतदारांना मोजावी लागेल. - संजय नाईक, आंबा उत्पादक शेतकरी, वेतोरे, ता. वेंगुर्ला.
Cloudy weather hit the mangoes gardens in Sindhudurga
Cloudy weather hit the mangoes gardens in Sindhudurga

सिंधुदुर्ग : गेले पाच दिवस जिल्ह्यात असलेल्या ढगाळ वातावरणामुळे आंबा बागांवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यातच अजूनही आंब्यांना मोहर नसल्यामुळे जिल्ह्यातील आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे.

अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे जिल्ह्यातील वातावरणात पाच दिवसांपूर्वी अचानक बदल झाला. जिल्ह्यात गेले पाच दिवस ढगाळ वातावरण, अधूनमधून पावसाच्या सरी आणि जोरदार वारे अशी स्थिती आहे. बदललेल्या या वातावरणाचा मोठा फटका आंबा बागांना बसला आहे. अगोदरच क्यार वादळामुळे पडलेल्या पावसामुळे बागांचे मोठे नुकसान झाले. 

नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून थंडी सुरू होते. तशा स्वरूपाची थंडी अद्याप सुरू झालेली नाही. त्यातूनही विविध प्रयोग करीत बागायतदार आंबा पीक मिळण्याच्या दृष्टीने उपाययोजना करताना दिसत होते. आंब्याला आता पालवी फुटली होती. परंतु, गेल्या पाच दिवसांतील ढगाळ वातावरणामुळे पुन्हा कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. आंब्याच्या पालवीवर बुरशी, तुडतुड्यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ज्या भागात वाऱ्यांचा वेग अधिक आहे. तेथे काही अंशी कीड-रोगांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात आहे.

दरम्यान, जिल्ह्यात अद्याप आंब्याला मोहर आलेला नाही. दरवर्षी काही बागांमधून डिसेंबर, जानेवारी महिन्यात आंब्याच्या पेट्या बाजारपेठांमध्ये रवाना होतात. परंतु, या वर्षी अजूनही मोहर नसल्यामुळे आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे. एकीकडे बागायतदार नैसर्गिक संकटाचा सामना करीत असताना दुसरीकडे आफ्रिकन आंबा बाजारपेठेमध्ये दाखल झाला आहे. हापूसचा हंगाम जरी सुरू होण्यास विलंब असला, तरी या आंब्याचे आव्हानदेखील येथील आंबा बागायतदारांसमोर असेल. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com