सिंधुदुर्ग : गेले पाच दिवस जिल्ह्यात असलेल्या ढगाळ वातावरणामुळे आंबा बागांवर कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. त्यातच अजूनही आंब्यांना मोहर नसल्यामुळे जिल्ह्यातील आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे.
अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाल्यामुळे जिल्ह्यातील वातावरणात पाच दिवसांपूर्वी अचानक बदल झाला. जिल्ह्यात गेले पाच दिवस ढगाळ वातावरण, अधूनमधून पावसाच्या सरी आणि जोरदार वारे अशी स्थिती आहे. बदललेल्या या वातावरणाचा मोठा फटका आंबा बागांना बसला आहे. अगोदरच क्यार वादळामुळे पडलेल्या पावसामुळे बागांचे मोठे नुकसान झाले.
नोव्हेंबरच्या पहिल्या आठवड्यापासून थंडी सुरू होते. तशा स्वरूपाची थंडी अद्याप सुरू झालेली नाही. त्यातूनही विविध प्रयोग करीत बागायतदार आंबा पीक मिळण्याच्या दृष्टीने उपाययोजना करताना दिसत होते. आंब्याला आता पालवी फुटली होती. परंतु, गेल्या पाच दिवसांतील ढगाळ वातावरणामुळे पुन्हा कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढला आहे. आंब्याच्या पालवीवर बुरशी, तुडतुड्यांचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. ज्या भागात वाऱ्यांचा वेग अधिक आहे. तेथे काही अंशी कीड-रोगांचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात आहे.
दरम्यान, जिल्ह्यात अद्याप आंब्याला मोहर आलेला नाही. दरवर्षी काही बागांमधून डिसेंबर, जानेवारी महिन्यात आंब्याच्या पेट्या बाजारपेठांमध्ये रवाना होतात. परंतु, या वर्षी अजूनही मोहर नसल्यामुळे आंबा बागायतदारांची चिंता वाढली आहे. एकीकडे बागायतदार नैसर्गिक संकटाचा सामना करीत असताना दुसरीकडे आफ्रिकन आंबा बाजारपेठेमध्ये दाखल झाला आहे. हापूसचा हंगाम जरी सुरू होण्यास विलंब असला, तरी या आंब्याचे आव्हानदेखील येथील आंबा बागायतदारांसमोर असेल.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.