राज्यात आठवडाभर अंशतः ढगाळ वातावरण 

गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील काही भागांत निवार चक्रीवादळाचा प्रभाव झाला आहे. या वादळामुळे हवामानात बदल होत आहेत.
Hawaman
Hawaman

पुणे ः गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील काही भागांत निवार चक्रीवादळाचा प्रभाव झाला आहे. या वादळामुळे हवामानात बदल होत आहेत. राज्यात ढगाळ वातावरण तयार होऊन काही भागांत हलक्या स्वरूपाचा पाऊस पडत आहे. राज्यात ढगाळ वातावरण पाच डिसेंबरपर्यंत कायम राहणार आहे. त्यामुळे थंडी गायब झाली आहे, असे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. 

बंगालच्या उपसागरात गेल्या आठवड्यापासून वारंवार कमी दाबाचे पट्टे, तसेच वादळे तयार होत आहेत. पंधरा दिवसांपूर्वी गती नावाचे वादळ तयार झाले. या वादळाची तीव्रता कमी झाल्यानंतर लागलीच ‘निवार’ नावाचे दुसरे वादळ तयार झाले. या वादळांमुळे अगदी अंदमान, निकोबार बेटासह दक्षिण भारतामधील केरळ, तमिळनाडू ते आंध्र प्रदेशाच्या किनारपट्टीपर्यंत जोरदार पाऊस हजेरी लावली आहे. याचा परिणाम गोवा आणि महाराष्ट्रात झाला असून बहुतांश भागात ढगाळ वातावरण, थंड वारे आणि पाऊस पडत आहे. 

भारतीय हवामानशास्त्र विभागातील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार दक्षिण अंदमानाचा समुद्र, दक्षिण बंगालचा उपसागर त्याचबरोबर हिंदी महासागर या भागात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. रविवारी (ता.२९) या पट्ट्याचे रूपांतर तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात होणार आहे. त्यानंतर बुधवारी (ता.२) हा तीव्र कमी दाबाचा  पट्टा दक्षिण तामिळनाडूच्या किनारपट्टीवर धडकणार आहे. याच्या परिणामामुळे तमिळनाडू, केरळ, दक्षिण आंध्र प्रदेश, दक्षिण रायलसीमा या भागात मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वाढली आहे. उत्तर भारतात बिहार, उत्तर प्रदेश, हिमालयीन भाग, राजस्थान, दिल्ली, ईशान्य भारतामधील राज्यांमध्ये दाट धुके वाढणार असून, किमान तापमान सरासरीपेक्षा खाली म्हणजेच उणे १.६ ते ५.१ अंश सेल्सिअस एवढे घसरण्याची शक्यता आहे, असा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.  दरम्यान, तामिळनाडू राज्यातही पावसामुळे दाट धुके वाढणार असल्याचे हवामान विभागाने स्पष्ट केले आहे. 

किमान तापमानात वाढ  महाराष्ट्रात गेल्या चार ते पाच दिवसांपासून हळूहळू ढगाळ वातावरण वाढले आहे. त्यामुळे थंडीची तीव्रता कमी झाली असून, मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागांत हलक्या स्वरूपाच्या पावसाने हजेरी लावली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार राज्यात २ डिसेंबरपर्यंत ढगाळ वातावरणामुळे किमान तापमानात वाढ राहणार आहे. तर लागलीच वातावरणात बदल होऊन थंडी देखील जाणवण्याची शक्यता आहे. रविवारी (ता.२९) सकाळी आठ वाजेपर्यंत गोंदिया येथे १४.४ अंश सेल्सिअसची सर्वांत कमी किमान तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सुत्रांनी सांगितले.  रविवारी (ता.२९) सकाळपर्यंत विविध शहरातील किमान तापमान, कंसात वाढ, घट झालेले तापमान. (अंश सेल्सिअस) ः मुंबई (सांताक्रुझ) २३.० (३), ठाणे २४.०, रत्नागिरी २३.८ (३), डहाणू २४.४ (५), पुणे २०.५ (८), जळगाव १९.६ (७), कोल्हापूर २०.२ (४), महाबळेश्वर १४.५, मालेगाव २०.२ (७), नाशिक १८.२ (६), निफाड १६.३, सांगली २०.२ (४), सातारा १९.६ (५), सोलापूर १९.२ (३), औरंगाबाद १९.५ (६), परभणी १८.९ (४), परभणी कृषी विद्यापीठ १७.७, उ्स्मानाबाद १७.४ (३), अकोला १९.१ (३), अमरावती १५.१ (-२), बुलडाणा १८.२(२), चंद्रपूर १८.४ (४), गोंदिया १४.४ (-१), नागपूर १६.८ (३), वर्धा १८.४ (३), यवतमाळ १८.५ (३).   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com