धुळे ः जिल्ह्यासह नंदुरबार भागात मागील दोन ते तीन दिवसांपासून ढगाळ हवामान असून, उष्णता वाढली आहे. याचा परिणाम शिरपूर (जि. धुळे) व शहादा (जि. नंदुरबार) भागातील पपई, केळी पिकावर होत आहे. जळगाव जिल्ह्यातही विषम वातावरण असून, केळी पिकावर त्याचा प्रतिकूल परिणाम होत आहे. केळीची वाढ हवी तशी नाही. तसेच घड सटकण्याचे प्रमाण वाढले आहे.
मध्यंतरी सुसाट वाऱ्याने कापणीवरील पिकांमध्ये झाडांची पडझड झाली. पाऊस व गारपिटीच्या भीतीने कापणीवरील बागांमधून घड काढून व्यापाऱ्यांना त्यांची विक्री सुरू आहे. सध्या आगाप बागा व पिलबागांमध्ये यावल, रावेर येथे कापणी सुरू झाली आहे. एक ते दोन महिन्यांच्या बागांमध्ये झाडांची वाढ खुंटली असून, रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो, असे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे.
नंदुरबार, शहादा, शिरपूर भागांत पपईच्या बागांमध्ये फळे पक्व होण्याच्या प्रक्रियेवर उष्ण व ढगाळ हवामानामुळे परिणाम झाला असून, लहान, कच्ची फळे शेतकरी व्यापाऱ्यांना दोन रुपये प्रतिकिलो दरात विक्री करीत आहेत. दर्जेदार फळे निघत नसल्याने काही शेतकऱ्यांनी बागा मोडल्या असून, क्षेत्र रिकामे केले आहे.
शहादा तालुक्यातील ब्राह्मणपुरी, जवखेडा व परिसरात केळीच्या बागांचे काटेकोर व्यवस्थापन शेतकरी उष्णतेपासून बचावासाठी करू लागले असून, बागोभोवती हिरवी नेट, कडबा वारा अवरोधक म्हणून वापरला जात आहे. उंच वाढणारे गवतही शेतकऱ्यांनी मागील महिन्यातच बागेभोवती पश्चिम व दक्षिण दिशेला लावल्याची माहिती मिळाली. उष्णतेमुळे कांदा, उशिरा लागवड केलेला मका व केळी या पिकांच्या सिंचनाचा कालावधी बदलला असून, अधिक वेळ सिंचनही शेतकऱ्यांनी सुरू केले आहे.