जळगाव ः कुकुंबर मोसॅक विषाणूमुळे (सीएमव्ही) रावेर तालुक्यात केळी बागांचे मोठे नुकसान झाले आहे. याबाबत प्रशासनाने पंचनामे पूर्ण केले आहेत. नुकसान भरपाई तातडीने मिळावी, अशी मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
रावेरात केळीची लागवड मृग बहारात अधिक असते. लागवड मे, जून, जुलै यादरम्यान केली जाते. रावेर केळी लागवडीत जिल्ह्यात आघाडीवर आहे. यंदा लहान केळी किंवा जून, जुलैमध्ये लागवडीच्या केळी बागांमध्ये ‘सीएमव्ही’चा प्रादुर्भाव झाला. यात झाड पिवळे, काळे पडले. त्याची वाढ खुंटली. झाडाचा बुंधा कुजून पूर्णतः नुकसान झाले. अशात बागा वाचविण्यासाठी किडनाशकांची फवारणी सतत घ्यावी लागली.
केळी संशोधन केंद्रातील शास्त्रज्ञ, पाल (ता.रावेर) येथील कृषी विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ, कृषी विभाग, लोकप्रतिनिधी आदींनी रावेरात पाहणी केली.
अनेक शेतकऱ्यांच्या केळी बागांमध्ये तब्बल ७० ते ७५ टक्के नुकसान झाले. रोगग्रस्त झाडे उपटून फेकावी लागत होती. त्यांच्या जागी नव्याने लागवड करावी लागली. मोठे नुकसान झाले. पंचनामेही प्रशासनाने सुरू केले. रावेर तालुक्यातील १०५ गावांमध्ये केळी बागांवर सीएमव्ही रोग फोफावला होता. त्यात साडेतीन हजार हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्राला फटका बसला आहे, असे पंचनाम्यानंतर समोर आले आहे.
अहवाल प्रशासनाला सादर
केळीला एकरी सर्व मिळून ५० हजार रुपये किमान खर्च लागतो. उतिसंवर्धित रोपांची लागवड रावेरात होते. रावेरातील केऱ्हाळे, मंगरूळ, पाडळे, लोहारा, थेरोळा, अहिरवाडी, रेंभोटा, विवरे बुद्रूक, ऐनपूर, विवरे खुर्द आदी गावांमधील नुकसानीचे पंचनामे करून त्याचा संयुक्त अहवाल तयार करण्यात आला आहे. महसूल व कृषी विभागाने हा अहवाल प्रशासनाला सादर केल्याची माहिती मिळाली.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.