द्राक्षपंढरी गारठली; थंडीने मण्यांची वाढ थांबली

नीचांकी तापमानामुळे द्राक्षवेलीची मुळांवाटे जीवनद्रव्ये घेण्याची, तसेच पानांतील अन्ननिर्मितीची प्रक्रिया मंदावली आहे. शक्‍य तिथे फ्लड पाणी देणे योग्य राहील. बोदावर जास्तीत जास्त आच्छादन करावे. ज्यामुळे मुळ्यांजवळील तापमान नियंत्रित राहील. - रवींद्र बोराडे, विभागीय अध्यक्ष- महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ, नाशिक विभाग.
थंडी परिणाम
थंडी परिणाम

नाशिक  : निफाडला गुरुवारी (ता. २७) पहाटे १.८ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. या वेळी निफाड तालुक्‍यासह नाशिक जिल्ह्यातील द्राक्षबागांतील पाने व घडांवर बर्फाची चादरच पसरली होती. यामुळे द्राक्षवेल ‘शॉक'मध्ये गेली असून, वेलीतील चयापचयाची क्रिया मंदावली आहे. अजून काही दिवस थंडीचा अंमल असाच राहणार असल्याचा अंदाज यंत्रणेने दिला आहे. पक्वतेच्या अवस्थेत द्राक्षबागा आहेत. या स्थितीत द्राक्ष उत्पादकांच्या तोंडचे पाणीच पळाले आहे. नाशिक विभागातील २ लाख एकरांवरील द्राक्ष क्षेत्र अडचणीत सापडले आहे. मागील सप्ताहात निफाड कृषी संशोधन केंद्रावर किमान ६ अंश सेल्सियसच्या दरम्यान होते. बुधवार (ता. २६) संध्याकाळपासून परिसरातील गारव्यात जोरदार वाढ होत गेली. दरम्यान गुरुवारची (ता. २७) पहाट मात्र थंडीचा मोठाच कडाका घेऊन आली. १.८ अंशावर तापमान आल्याने परिसरातील द्राक्षासहित सर्व पिकांवर धुके आणि बर्फाची दुलई पसरली. गव्हासारख्या रब्बी पिकांना ही थंडी लाभदायक असली तरी, सर्वाधिक भांडवली खर्चाचे पीक म्हणून ओळखल्या जाणाऱ्या द्राक्षांसाठी मात्र हानिकारक असल्याने द्राक्ष उत्पादकांची चिंता वाढली आहे. मणी वाढ थांबली; पाने करपली निफाड तालुक्‍यातील नैताळे येथील द्राक्ष उत्पादक संजय तळेकर यांचे द्राक्ष पीक पक्वतेच्या अवस्थेत आहेत. नीचांकी तापमानामुळे व्यवस्थापन करणे अवघड बनले असल्याचे त्यांनी सांगितले. पक्वतेच्या आणि मणीवाढीच्या अवस्थेत पाने सक्रिय असणे अत्यंत आवश्‍यक असते. थंडीमुळे मात्र द्राक्षवेलीची शरीरक्रियाच थांबली आहे. मुळ्यांचे कार्यही थांबले असल्याने त्याचा "शॉक'' वेलीला बसला आहे. पाने करपल्यामुळे त्याचा फटका उत्पादनाला बसणार आहे. या वेळी उपाययोजना म्हणून बागेत शेकोटी पेटवली जात आहे. तसेच लोट पाणी देऊन बागेतील तापमान नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र दीर्घकाळ थंडी राहिल्यास नुकसान थांबविणे अवघड होणार असल्याचे चांदवड तालुक्‍यातील वडनेर भैरव येथील अरविंद भालेराव यांनी सांगितले.  रंगीत वाणांचे मणी तडकले नाशिक जिल्ह्यातील काळ्या रंगीत वाणांच्या बागा पाणी उतरण्याच्या आणि खुडणीच्या अवस्थेत आहे. "अर्ली'' हंगामातील या द्राक्षांना बाजारात चांगल्या दराची अपेक्षा होती. मात्र नीचांकी तापमानामुळे बहुतांश बागांतील मणी तडकले. उत्तर भारतात हा माल पाठविण्यात येत आहे. थंडीमुळे हा उठावही घटला असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. प्रतिक्रिया अतिथंडीमुळे द्राक्ष मणीवाढ थांबली आहे. मण्यांतील साखरनिर्मितीची प्रक्रिया मंदावली आहे. ज्या बागांमध्ये सेंद्रिय तसेच प्लॅस्टिक मल्चिंग केले आहे. तेथील नुकसान कमी होऊ शकते. - दीपक ठुबे, खेडगाव, ता. दिंडोरी, जि. नाशिक 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com