पुणे ः उत्तर भारताकडून मध्य महाराष्ट्र व विदर्भाच्या दिशेने थंड वाऱ्याचे प्रवाह वाहत आहेत. दरम्यान राज्यात काही प्रमाणात असलेले कोरडे हवामान यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात कडाक्याची थंडी वाढली आहे. या वाढलेल्या थंडीमुळे चालू वर्षाला निरोप मिळणार असून, वर्षाच्या अखेरीस शेकोट्या पेटल्या आहेत. रविवारी (ता. २९) सकाळी विदर्भातील चंद्रपूर येथे ५.१ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नीचांकी नोंद झाली आहे. हिमालय पर्वत आणि लगतच्या राज्यामध्ये बर्फवृष्टी होत असून, उत्तर भारतातही तीव्र थंडीची लाट आली आहे. यामुळे पंजाब, हरियाना, चंडीगड, दिल्ली, उत्तर राजस्थान आणि उत्तर प्रदेशात तापमानात झालेल्या घटीमुळे थंड दिवसही अनुभवता येत आहेत. आज (रविवारी) आणि उद्या (सोमवारी) या भागात अति तीव्र थंडीची लाट कायम राहणार आहे. रविवारी (ता. २९) सकाळी पूर्व राजस्थानमधील सिकर येथे शून्य अंश सेल्सिअसची देशातील सर्वाधिक कमी तापमानाची नोंद झाली आहे. अतितिव्र आलेल्या थंडीचा परिणाम मध्य प्रदेश व विदर्भातील काही भागांतही होत आहे. त्यामुळे या भागातील किमान तापमानात चांगलीच घट झाली असून, विदर्भातील नागपूर येथे ५.१ अंश सेल्सिअसपर्यंत तापमान खाली आले आहे. थंड वाऱ्यांच्या प्रवाहामुळे मध्य महाराष्ट्रात धुळे कृषी महाविद्यालय आणि विदर्भातील गोंदिया येथे ६.० अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. अनेक ठिकाणी कडाक्याची थंडी वाढली आहे. गेल्या दोन दिवसांपासून थंडीत वाढ झाली असून, सरासरीच्या तुलनेत किमान तापमानात आठ अंश सेल्सिअसने घट झाली आहे. त्यामुळे विदर्भातील बहुतांशी भागांत थंडी वाढली असून, किमान तापमानाचा पारा चांगलाच घसरला आहे. विदर्भातील चंद्रपूर, गोंदिया, अकोला, अमरावती, बुलडाणा, वर्धा, यवतमाळ येथील किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसच्या खाली आहे. सध्या कोकण, मध्य महाराष्ट्र व मराठवाड्याच्या काही भागांत ढगाळ हवामान, कोरडे हवामान असले तरी उत्तरेकडून वाहत असलेल्या थंड वाऱ्यांमुळे अचानक थंडीत वाढ झाली आहे. गेल्या दोन दिवसांपासून राज्यात ढगाळ हवामानाची स्थिती होत असून दुपारनंतर काही प्रमाणात ऊन पडल्याने ढगाळ हवामानाची स्थिती निवळत आहे. मात्र, संध्याकाळी काही प्रमाणात गारठा वाढण्यास सुरुवात होते. वाढलेल्या गारठ्यामुळे राज्यातील बहुतांशी भागातील किमान तापमानाचा पारा दहा अंश सेल्सिअसपर्यंत खाली येत आहे. कोकणातील अलिबाग, रत्नागिरी, ठाणे, मुंबई या परिसरात थंडी काही प्रमाणात कमी झाली आहे. त्यामुळे या भागात २० ते २३ अंश सेल्सिअसच्या दरम्यान किमान तापमान होते. मध्य महाराष्ट्रासह खानदेशातही ढगाळ हवामानामुळे गारठा कमी अधिक स्वरूपात आहे. तर धुळे कृषी महाविद्यालयात दोन दिवसांपासून सर्वात कमी ६.० अंश सेल्सिअस तापमान नोंदविले गेले. उर्वरित भागात किमान तापमान ११ ते १८ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मराठवाड्यातही ढगाळ हवामानाची स्थिती असली तरी थंड वाऱ्यामुळे किंचित गारठा आहे. यामुळे किमान तापमान १० ते १३ अंश सेल्सिअसपर्यंत होते. मराठवाडा, विदर्भात पावसाचे सावट मध्य प्रदेशाचा नैऋत्य भाग व परिसरात चक्राकार चक्राकार स्थिती आहे. तसेच त्रिपुरा ते बंगालच्या उपसागर या दरम्यान कमी दाबाचे क्षेत्र आहे. त्याचा परिणाम राज्यातील हवामानावर होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भाच्या काही भागात हवामान अंशतः ढगाळ असून पावसाचे सावट आहे. आज (ता.३०) मध्य महाराष्ट्र, मराठवाडा व विदर्भात हवामान हवामान ढगाळ राहणार आहे. त्यामुळे किमान तापमानात चढउतार सुरू असून विदर्भात व मध्य महाराष्ट्रातील काही भागात किमान तापमानात चांगलीच घट झाली आहे. पुढील दोन ते तीन दिवस कोकण व मध्य महाराष्ट्र वगळता मराठवाडा व विदर्भातील अनेक भागात अंशतः ढगाळ हवामान राहणार असून तुरळक ठिकाणी पावसाचा शिडकावा होण्याची शक्यता आहे. रविवारी (ता. २९) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासातील विविध ठिकाणचे किमान तापमान, अंश सेल्सिअसमध्ये, कंसात वाढ, घट ः अकोला ८.६ (-५), अलिबाग २१.६ (४), अमरावती ८.६ (-६), औरंगाबाद १०.७ (-१), बीड १३.५ (१), बुलढाणा १०.४ (-४), चंद्रपूर ५.१ (-८), डहाणू १९.४ (२), गोंदिया ६.० (-६), जळगाव ९.५ (-२), कोल्हापूर २०.१ (५), महाबळेश्वर १४.८ (२), मालेगाव ११.८ (१), मुंबई २२.३ (५), नागपूर ५.३ (-७), नांदेड १३.०, नाशिक १३.६ (३), निफाड ११.२, धुळे कृषी महाविद्यालय ६.०, उस्मानाबाद १०.९ (-३), परभणी १०.४ (-३), लोहगाव १३.० (१), पाषाण १६.० (५), पुणे १५.४ (५), रत्नागिरी २३.९ (४), सांगली १९.५ (५), सातारा १८.४ (५), सोलापूर १८.१ (२), ठाणे २०.०, वर्धा ६.६ (-६), यवतमाळ ९.४ (-५)
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.