थंडीचा कडाका वाढला

cold
cold

पुणे ः राज्यात तयार झालेले कोरडे हवामान आणि उत्तरेकडून पुन्हा वाहत असलेला थंड वाऱ्यांचा प्रवाह यामुळे राज्यात थंडीचा कडाका वाढला आहे. यामुळे ऊब मिळविण्यासाठी पुन्हा राज्यात ठिकठिकाणी शेकोट्या पेटल्या आहेत. शुक्रवारी (ता. १०) सकाळी खानदेशातील धुळे येथील कृषी महाविद्यालयामध्ये सर्वांत कमी ५.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले.      विदर्भात गुरुवारी (ता. ९) मध्यरात्रीनंतर कमी दाबाचे चक्रावातामध्ये रूपांतर झाले होते. शुक्रवारी (ता. १०) दुपारपर्यंत अनेक भागात ढगाळ हवामानाची स्थिती होती. त्यातच सकाळी अनेक ठिकाणी धुके पडले होते. दुपारनंतर ही स्थिती निवळल्याने राज्यातील बहुतांशी भागात ऊन पडले होते. मात्र, उत्तर भारतातील दिल्ली, हरियाणा, चंडीगड, उत्तर प्रदेश, पंजाब, राजस्थान या भागात थंडीची लाट आली असून या भागात रात्रीसह थंड दिवस जाणवत आहे. त्यामुळे उत्तर भारतातील अनेक भागात कडाक्याची थंडी पडली आहे.  उत्तरेकडून महाराष्ट्राच्या दिशेने थंड वारे वाहत असल्याने राज्यातही थंडी वाढली आहे. यामुळ किमान तापमानाचा पारा पाच अंश सेल्सिअसपर्यंत खाली आला आहे. राज्यात काही भागात दिवसभर गारवा असला तरी उन्हाच्या झळा हव्याहव्याशा वाटत आहेत. सायंकाळी सहानंतर थंडी वाढत जाऊन मध्यरात्रीनंतर चांगलीच थंडी वाढत आहे. सकाळीही चांगलीच थंडी जाणवत असली सकाळचे कोबळे ऊन हवेहवेस वाटत आहे.  कोरड्या हवामानामुळे थंडीचा पारा सरासरीच्या तुलनेत सात ते आठ अंश सेल्सिअसने खाली आला आहे. कोकणातील मुंबई, सांताक्रूझ अलिबाग, रत्नागिरी, डहाणू भागातही कोरड्या हवामानामुळे पुन्हा थंडी वाढली आहे. यामुळे किमान तापमानाचा पारा सरासरीच्या तुलनेत दोन ते तीन अंश सेल्सिअसने कमी होऊन तापमान १६ ते १९ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. मध्य महाराष्ट्रातही थंडीने चांगलाच जम बसविला आहे. त्यामुळे नाशिक, पुणे, मालेगाव, जळगाव, महाबळेश्वर, सातारा या भागात थंडीत वाढ झाली आहे. त्यामुळे किमान तापमानाचा पारा कमी झाला असून अनेक भागात ५ ते १६ अंश सेल्सिअसच्या दरम्यान तापमान होते.  सोलापूर, कोल्हापूर, सांगली या भागातही किंचित थंडी होती. यामुळे या भागात १८ अंश सेल्सिअस या दरम्यान तापमान होते. मराठवाड्यातही औरंगाबाद, परभणी या भागात किमान तापमानाचा पारा किंचित कमी झाला असून किमान तापमान १० ते ११ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होते. उर्वरित नांदेड, बीड भागात थंडी कमी होती. विदर्भात किमान तापमानाचा पारा पुन्हा वाढला आहे. विदर्भात गोंदिया येथे सर्वात कमी तापमान नोंदविले गेले. तर ब्रह्मपुरी, गोंदिया, यवतमाळ, वाशीम, वर्धा, नागपूर, अकोला या भागात चांगलीच थंडी वाढली आहे. यामुळे किमान तापमानाचा पारा ८ ते ११ अंश सेल्सिअसच्या दरम्यान होता.   शुक्रवारी (ता. १०) सकाळी आठ वाजेपर्यंतच्या चोवीस तासातील विविध ठिकाणचे किमान तापमान, अंश सेल्सिअसमध्ये ः मुंबई १९.०, सांताक्रूझ १८.२, अलिबाग १८.३, रत्नागिरी १९.७, डहाणू १६.४, पुणे १२.८, अकोला १०.७, औरंगाबाद १०.६, नांदेड १७.०, जळगाव १०.०,  कोल्हापूर १८.२, महाबळेश्वर १२.४, नागपूर १०.१, नाशिक १०.८, मालेगाव ११.२, निफाड ९.०, परभणी ११.५, परभणी कृषी विद्यापीठ १२.०, सांगली १८.२, सातारा १६.५, सोलापूर १८.७,  अमरावती १०.०,  बुलढाणा १०.२, वाशीम १०.२, ब्रह्मपुरी ९.४, गोंदिया ८.२, वर्धा १०.४, यवतमाळ ११.०.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com