नांदेड : जिल्ह्यात यंदा रब्बी हंगाम सुरू होताच थंडीची चाहूल सुरू झाली. तापमानाचा पारा १३.५ अंशापर्यंत खाली आला होता. परंतु मागील दोन दिवसांपासून ढगाळ वातावरण असल्यामुळे थंडी कमी होऊन पारा १९ अंश सेल्सिअसवर पोचला आहे. यामुळे गव्हाची पेरणी करणारे शेतकरी थंडीची प्रतिक्षा करीत आहेत. नांदेड जिल्ह्यात ऑक्टोबरनंतर किमान तापमानात घट होण्यास सुरवात होते; मात्र यंदा अद्यापपर्यंत कमाल तापमानात फारशी घट झाली नाही. नोव्हेंबर महिन्याच्या प्रारंभी एक तारखेला १६.५ अंश सेल्सिअस किमान तापमानाची नोंद झाली होती. या नंतर यात वाढ होऊन दोन तारखेला १७.५, तीन तारखेला १७.०, चार तारखेला १७.०, पाच तारखेला १६.०, सहा तारखेला १६.०, सात तारखेला १६.०, आठ तारखेला १६.०, नऊ तारखेला १६.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली होती. यानंतर मात्र पारा खालावत गेला.
दहा तारखेला १३.५ अंश सेल्सिअसची नोंद झाली. अकरा तारखेला १३.५, बारा तारखेलाही १३.५ पर्यंत पारा खालावला होता. यानंतर तेरा तारखेला कमाल तापमानात वाढ होऊन पारा १९.० अंशावर पोचला. तर १४ तारखेलाही १९.० अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाल्याची माहिती नांदेड येथील भारतीय हवामान विभागाच्या हवामान नोंदणी केंद्राकडून देण्यात आली आहे.
दरम्यान, जिल्ह्यात सध्या रब्बी पिकांची पेरणी सुरू आहे. पहिल्यांदा शेतकऱ्यांनी हरभरा पेरणीचे काम हाती घेतले होते. या नंतर जमीन वाफशावर येताच गव्हाच्या पेरणीकडे शेतकरी वळतात. परंतु सध्या तापमान वाढल्यामुळे गहू उगवणीसाठी पोषक वातावरण नसल्यामुळे पेरणीला ब्रेक लागल्याचे खुड्याची वाडी येथील कैलास खुडे यांनी सांगितले.
Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.
ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम , टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.