शीत लहरींची महाराष्ट्रावर स्वारी

 शीत लहरींची महाराष्ट्रावर स्वारी
शीत लहरींची महाराष्ट्रावर स्वारी

पुणे : उत्तर भारतील राज्यांकडून येणाऱ्या शीत लहरींनी महाराष्ट्रावर अक्षरश: स्वारी केली आहे. राज्यात सर्वदूर किमान तापमानात घट होत विदर्भ, मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यासह राज्याला हुडहुडी भरली आहे. थंडीचा कडाका प्रचंड असल्याने भर दुपारीही गारठा जाणवत आहे. धुळे येथील कृषी महाविद्यालयात राज्यातील नीचांकी २.२ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. निफाड, परभणी, नागपूर येथे तापमान तब्बल ३ अंशांपर्यंत घसरले आहे. आज (ता.३०) राज्यात थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता वर्तविण्यात आली आहे.  जम्मू-काश्मीर व हिमालय पर्वताच्या भागात पश्चिमी चक्रावात सक्रिय आहे. त्यामुळे लगतच्या राज्यांमध्ये बर्फवृष्टी होत आहे. त्यामुळे उत्तर भारतामध्ये थंडीची तीव्र लाट आली असून, उत्तरेकडून शीत वाऱ्यांचे तीव्र प्रवाह महाराष्ट्राकडे येत आहेत. हे वारे जमीनलगतच्या भागातून वाहत असल्याने तापमानात मोठी घट होऊन राज्यात थंडीचा कडाका वाढला असल्याचे हवामान विभागाच्या सूत्रांनी सांगितले. थंडीमुळे महाबळेश्वरच्या वेण्णा लेक परिसरात दबबिंदू गोठले असून, स्ट्राॅबेरीच्या फळांवर आणि पानांवरही हिमकण जमा झाले होते. नाशिक जिल्ह्यात अतिथंडीमुळे द्राक्षमण्यांना तडे गेले आहेत. 

धुळ्यापाठोपाठ निफाड, परभणी, नागपूर येथेही तापमान खुपच घट झाली आहे. निफाडमधील गहू संशोधन केंद्रामध्ये ३ अंश सेल्सिअस, परभणीच्या वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठात ३ अशं सेल्सिअस तर नागपूरच्या हवामान केंद्रात ३.५ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. नागपूर येथे किमान तापमानात तब्बल ९ अंश सेल्सिअसची घट झाली आहे. किमान तापमान १० अंशांच्या खाली आले असताना सरासरीपेक्षा ४.५ अंशांची घट झाल्यास ‘थंडीची लाट’, तर ६.५ अंशांची घट झाल्यास ‘तीव्र लाट’ समजण्यात येते. 

उत्तर भारतात थंडीने कहर केला असून, शनिवारी (ता. २९) सकाळी राजस्थानच्या भिलवाडा येथे ऊणे १ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. तर नागपूर, अकोलासह विदर्भात तीव्र लाट आली आहे. तर मध्य महाराष्ट्रातील पुणे, जळगाव, मालेगाव, नाशिक, सोलापूर, मराठवाड्यातील औरंगाबाद, परभणी, नांदेड, विदर्भातील अमरावती, बुलडाणा, गोंदिया, वर्धा आणि यवतमाळ येथे थंडीची लाट आली आहे. धुळे येथे १७ वर्षांतील नीचांकी तापमान नोंदले गेले आहे. तर परभणी, नाशिक, औरंगाबाद, मालेगाव येथे दहा वर्षांतील नीचांकी तापमानाची नोंद झाल्याचे हवामान विभागातर्फे सांगण्यात आले. 

शनिवारी (ता. २९) सकाळी राज्यातील विविध ठिकाणचे किमान तापमान, कंसात सरासरीच्या तुलनेत तफावत (अंश सेल्सिअसमध्ये) : पुणे ५.९(-५.२), जळगाव ६.० (-५.३), कोल्हापूर १४.२(-१.१), महाबळेश्‍वर १०.५(-२.७), मालेगाव ५.४ (-४.९), नाशिक ५.१(-५), सांगली ११.०(-३.५), सातारा ९.१ (-३.८), सोलापूर १०.४(-५.५), सांताक्रुझ १७.६(०.२), अलिबाग १५.५(-२.५), रत्नागिरी १९.७(-२.४), डहाणू १३.०(-४.६), आैरंगाबाद ५.८(-५.६), परभणी ६.४ (-६.९), नांदेड ७.५(-५.२), उस्मानाबाद ९.१, अकोला ५.९(-७.४), अमरावती ९.६(-४.६), बुलडाणा ७.८ (-६.३), चंद्रपूर ९.०(-४.३), गोंदिया ६.०(-६.२), नागपूर ३.५(-९.१), वर्धा ८.५४(-४.३), यवतमाळ ९.०(-५.१).   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com